रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

जपान व महाराष्ट्र ??

Courtesy:Unsplash-Jaikishan Patel

नुकतीच एक बातमी वाचण्यात आली.
"महाराष्ट्र शासन 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करणार..." खाजगीकरणाचे समर्थक यामुळे भलतेच खुश झाले असणार!!
नाहीतरी लोकं म्हणतच असतात,
दहा-बारा विद्यार्थ्यांसाठी महिन्याला लाख रुपये पगार असणारे शिक्षक हवेत कशाला??शिवाय
एवढे कमी विद्यार्थी असूनही सर्वच मुलं कुठे प्रगत असतात.. त्यातही असतातच काही अभ्यासात मागे..तर मग काय,यावर एकच उपाय,नव्या शैक्षणिक धोरणात प्रस्तावित असलेल्या ,केंद्रीय शाळेच्या संकल्पनेप्रमाणे ,जोडून देता येईल, अशा लहान -लहान शाळा, केंद्रीय शाळेशी...
मग काय बघायलाच नको.. 'प्रत्येक वर्गाला स्वतंत्र वर्गखोली व  शिक्षक, संगणक कक्ष ,मोठं क्रीडांगण, विषयवार व तासिकेनुसार अध्यापक.. सारं कसं आलबेल असेल..मूलं येतील खाजगी वाहनात बसून.. अगदी शहरी इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांप्रमाणे..स्कूल बॅग, वॉटर बॅग, सूटबूट घालून.. सगळं कसं .."ऑल इज वेल!!"
  
Courtesy:Unsplash-Jaikishan Patel

असं झाल्यास आनंदच आहे,परंतु वास्तविक परिस्थिती काही औरच आहे.गेली पंधरा वर्षे ग्रामीण,आदिवासी भागात,शिक्षक म्हणून काम करताना आलेला अनुभव बघता,नव्या शैक्षणिक धोरणात रंगविण्यात आलेलं, हे गुलाबी चित्र अंतर्मनाला काही केल्या पटत नाही. भारताची किंबहुना महाराष्ट्राची एकंदरीत समाजरचना बघता आपल्या लक्षात येतं की,शेकडो वर्षांच्या सामाजिक व आर्थिक घुसळणीतून निर्माण झालेल्या विकासाच्या संधीचा लाभ समाजातील, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या संपन्न घटकांनी घेतलेला आपल्याला दिसतो व समाजातल्या या घटकाने कधीचेच शहराकडे किंबहुना त्याहीपलीकडे..भारताबाहेर.. प्रस्थान केलेलं आढळतं.मात्र,मागे उरलेला, आदिवासी व मागास समाज अजूनही लहान-लहान खेड्यांत वसलेला व  विखुरलेला आहे.असंख्य खेडी अशी आहेत की ज्यांमध्ये तुम्हाला संपन्न घटकांचे वास्तव्य अजिबात दिसणार नाही.जे असतील त्यांनी त्यांची पर्यायी व्यवस्था नजीकच्या शहरात केलेली आहे किंवा त्यांच्या मुलांना शहरातील शाळांमध्ये दाखल तरी केलेले आहे.सांगायचे तात्पर्य, आजच्या घडीला दुर्गम, आदिवासी व ग्रामीण भागातील लहान लहान खेड्यांत,सरकारी शाळेत शिकणारी मुलं,प्रामुख्याने तळागाळातील समाजाची आहेत. त्यांच्यासाठी शाळा हे विकासाचे मंदिर आहे.शाळेतूनच त्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त होत असतो.शाळा म्हणजे आशा, स्वप्न,महत्त्वाकांक्षा.. सारंच काही आहे,त्यांच्यासाठी... शाळा एखाद्या दीपस्तंभासारखी त्यांच्यासाठी आजतागायत काम करत आलेली आहे .याच लहान लहान शाळांमध्ये बाराखडी गिरवणारे आज समाजाला दिशा देण्याचे काम करीत आहेत.या भागात रोजगाराची पुरेशी साधने नाहीत तसेच  दारिद्र्य व कुपोषण त्यांच्या पाचवीला पुजलेलं आहे. अशा समाजासाठी, शिक्षण हे अति आवश्यक व जीवनावश्यक अशी बाब आहे.मग महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय बहुसंख्य मागास समाजाला मिळालेली विकासाची संधी हिरावून घेणारा आहे,असं काहीसं चित्र या निर्णयामुळे निर्माण झालेलं आहे. कोठारी कमिशनने शिक्षणावर जीडीपीच्या सहा टक्के खर्च करण्याचे सुचवले असताना तो आपण आजतागायत करू शकलेलो नाही. दोन-तीन टक्क्यांच्या वर हा खर्च गेला नाही. असे असतानाही आपण आखडता हात का घेत आहोत??हे न उलगडलेलं कोडं आहे.खर्च वाचवायचाच असेल तर अनेक मार्ग आहेत. मात्र शिक्षणावर केलेला खर्च एखाद्या वस्तूच्या स्वरूपात समजण्यात येऊ नये.ही गुंतवणूक देशाचं उज्ज्वल भवितव्य घडविण्याचं काम करत असते.
  
Courtesy:Unsplash-Himanshu Singh

एकीकडे आपल्या महाराष्ट्रात 20 पेक्षा कमी  पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जात असताना ,दुसरीकडे जगाच्या एका कोपऱ्यातील.. एक चिमुकला देश, जपान.. येथून एक वेगळी बातमी  कानावर आली..ती बातमी म्हणजे .."जपानमध्ये 'शिराताकी' गावात राहणाऱ्या 'काना हराडा'या  विद्यार्थिनीसाठी जपान शासन , रेल्वे स्टेशन बंद करण्याचं नियोजन असताना,एकटीसाठी ट्रेन सुरू ठेवते. ती विद्यार्थिनी पस्तीस किलोमीटर अंतर पार करून  ट्रेनने दररोज शाळेत जाते व जपान शासन ती पदवीधर होईपर्यंत ,पुढील पाच वर्षे म्हणजे 2021 पर्यंत रेल्वे स्टेशन व ट्रेन सुरू ठेवतं.. अशी मानसिकता व विचारसरणी असणारा देशचं राखेतून भरारी घेवू शकतो. म्हणूनच हा चिमुकला देश जगातील प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आज मिरवतो आहे व दुसरीकडे आपल्या देशात,महाराष्ट्रात आपण, 20 पेक्षा कमी विद्यार्थी असणाऱ्या सरकारी शाळा फक्त आर्थिक कारणास्तव बंद करण्याचं ठरवतो, हा विरोधाभास भारत व जपान
त्यांच्या विकासातील फरका बद्दल बरच काही सांगून जातो...

To watch more interesting videos,do visit,"Glocal Marathi"youtube channel.




शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०

आम्ही नागपूरकर-भाग-2 (तर्री पोहा)

 


आम्हा नागपूरकरांच्या जिभेचे ,जरा जास्तच चोचले आहेत.असं-तसं आम्हाला अजिबात जमत नाही. साधे कांदे पोहे घ्या ...


 


जगाच्या पाठीवर पोह्यांमध्ये तर्रीदार रस्सा टाकून खाणारे फक्त आम्ही नागपूरकरच.पोह्यांमध्ये तर्रीदार रस्सा टाकून खाल्ल्या जाणाऱ्या पोह्यांना आम्ही नागपूरकर "तर्री पोहा"किंवा "चना पोहा" या नावाने संबोधतो. सकाळ झाली रे झाली की,तुम्हाला नागपुरातल्या चौकाचौकात टपऱ्यांवर तर्री पोहा विकणारे भेटतील. मॉर्निंग वॉकला जाणारे,बाहेरगावाहून नागपुरात येणारे,होस्टेल मध्ये राहणारे विद्यार्थी,बॅचलर्स,अशांसाठी तर्री पोहा म्हणजे आवडीचा ब्रेकफास्ट.नागपुरात,दहा रुपयांत एक हाफ तर वीस रुपयात एक प्लेट पोहे,अगदी सहज मिळतात.जोपर्यंत प्लेटमध्ये घेतलेले पोहे तर्रीदार रस्स्यात तरंगत नाही व त्यात अर्धे चिरलेले लालचुटूक टमाटर(टमाटे) विराजमान होत नाही, तोपर्यंत अस्सल नागपूरकराला पोहे खाल्ल्याचे समाधान मिळत नाही,हे मात्र नक्की. शिवाय,जे पोहे खाल्ल्यानंतर, तर्रीचा ठसका लागत नाही व नाका-डोळ्यांत पाणी येत नाही,अशा पोह्यांना अस्सल नागपूरकर पोहेच मानत नाही.एवढा मान खवय्या नागपूरकरांच्या लेखी तर्री पोह्यांना आहे.नागपुरात पोहे खातांना रस्सा वारंवार मागण्यात.. ग्राहक व तो देण्यात.. विक्रेता, अजिबात संकोच करत नाही.जणू तो नागपूरकरांचा मूलभूत हक्कच आहे,असा सर्वांचा समज आहे.


   


सांगायचं तात्पर्य,नागपूरचं हवामान जरी "कोरडं"असलं तरी पोहे मात्र आम्हाला तर्रीदार रस्स्याने "ओले" झालेलेच आवडतात.अशा तर्री पोह्यांचे नागपूरकर 'दिवाने' आहेत. कामधंद्या निमित्त आम्ही नागपूरकर जगात,कुठेही गेलो तरी,साधं "तर्री पोहे"हे नाव जरी ऐकलं तरी, आम्हाला नागपूरची ओढ लागल्यापासून राहत नाही.   

                 


 आधी सांगितल्याप्रमाणे, नागपुरात तर्री पोहे विकणारे असंख्य आहेत.तसेच नागपुरातल्या प्रत्येक भागात त्या-त्या भागातले तर्री पोहेवाले प्रसिद्ध आहेत.या सर्वांमधले, हॉट डेस्टिनेशन म्हणजे केपी ग्राउंडचे पोहे.के. पी.ग्राऊंड म्हणजे कस्तुरचंद पार्क. आमच्या नागपूरचं जणू "शिवाजी पार्क".जिथे देशातल्या मोठमोठाल्या राजकारण्यांनी सभा गाजवल्या ते ठिकाण.केपी ग्राउंड जवळ मिळणारे तर्री पोहे खाण्यासाठी नागपुरातल्या श्रीमंतांपासून ते सामान्यातले सामान्य लोकं गर्दी करतात.नागपुरात येऊन इथल्या तर्री पोह्यांचा आस्वाद न घेता जाणारा सेलेब्रिटी विरळाच.राजकारणी,बॉलीवूड स्टार, मराठी सिनेस्टार.. सर्वांनी इथल्या तर्री पोह्यांची चव कधी ना कधी चाखली आहे.इथल्या तर्री पोह्यांचे वैशिष्ट्य म्हणजे इथला ठसकेबाज रस्सा व पोह्यांवर अलगदपणे पेश केले जाणारे अर्धे लाल टमाटर(टमाटे). टमाटरमुळे पोह्यांना आंबट-तिखट अशी चव प्राप्त होते व आपल्या जिभेचे सर्व टेस्ट बड्स तृप्त होतात.एवढेच नाही तर इथले काही पोहेवाले दरवर्षी इमानेइतबारे इन्कम टॅक्स भरतात व  काही त्यांच्या मिळकतीच्या जोरावर जगभ्रमंतीही करतात.अशी माहिती आहे. टी. व्ही. चॅनेल्सवर तसेच प्रसिद्ध youtube चॅनेल्सवर सुद्धा हे पोहेवाले झळकलेले आहेत.                                   यावरून,तुम्हा सर्वांना,नागपुरातल्या प्रसिद्ध तर्री पोह्यांचा महिमा नक्कीच कळला असेल... नागपुरात येणाऱ्या प्रत्येकाने तर्री पोह्यांचा आवर्जून आस्वाद घ्यावा,यासाठी ...एक अस्सल नागपूरकर म्हणून...अल्पसा प्रयत्न!!

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

आम्ही नागपूरकर-भाग 1(नागपुरी बोली)



Courtesy:Unsplash-Harish Fulpadia

मित्रांनो,खरं तर आजवर नागपूरकरांची वैशिष्ट्ये नागपूरकरांनी कमी व नागपूर बाहेरच्या लेखकांनीच जास्त सांगितलेली आपल्याला दिसतात. त्यामुळे "अस्सल नागपूरकर" कसा असतो? याचे त्यांनी केलेले वर्णन अगदी वरवरचे व ऐकीव माहितीवरून केल्याचे आपणांस दिसते. मुंबईकर,पुणेकर, सातारकर... इत्यादी.बद्दल मी बोलणार नाही,मात्र या सर्वांबद्दल आदर बाळगून,"आम्ही नागपूरकर"काय चीज आहोत?हे गुणदोषांसह सांगण्याचा हा अल्पसा प्रयत्न..

                           


 सर्वप्रथम,नागपूरकरांची जडणघडण जाणून घ्यायची असेल तर आपल्याला नागपूरचे भौगोलिक स्थान जाणून घ्यावे लागेल.नागपूर जिल्ह्याची उत्तरेकडील सीमा मध्यप्रदेशला लागून असल्याने व एकेकाळी नागपूर ही "सीपी अँड बेरार"प्रांताची राजधानी असल्याने तिथे पूर्वापार हिंदी भाषिक लोक कामा-धंद्यानिमित्त येत आलेले आहेत. त्यामुळे नागपूरवर हिंदीचा प्रभाव ओघाने आलाच व ते नैसर्गिकही आहे.कारण नदीच्या वाहत्या प्रवाहाप्रमाणे भाषा सुद्धा प्रवाही असते. प्रवाह थांबला तर त्याचे डबके होते,म्हणून नागपूरमध्ये मराठी व हिंदीचा अद्भुत संगम होवून हा प्रवाह अखंड वाहत आलेला आहे. ज्याप्रमाणे इंग्रजीने जगातल्या सर्व भाषा स्वतःमध्ये सामावून घेतल्या, त्याप्रमाणे आम्ही नागपूरकरांनी मराठी सोबत हिंदीला आपलेसे केले.मग आमच्या भाषेवर एखादा पुणेकर म्हणतो,"काय राव,तुमची भाषा,अगदी भेसळ आहे. ना धड हिंदी ना धड मराठी.मग अशा पुणेकराला, भूगोल नव्याने शिकण्याची नितांत गरज आहे,असं मला वाटतं.कारण, उदाहरण द्यायचं झाल्यास, पुण्याला एकही हिंदी भाषिक प्रदेशाची सीमा खेटून नसल्याने व चहूबाजूंनी मराठीभाषी जिल्ह्यांच्या सीमा असल्याने त्यांनी मराठीचे शुद्ध रूप जपले तर त्यात काय एवढं नवल??त्यापेक्षा आम्ही नागपूरकरांनी हिंदीला,आपलंसं करून, आमची स्वतःची "नागपुरी बोली"जन्माला घातली,याची साधी दखल कुणी आजतागायत घेतली नाही.शिवाय हिंदी आत्मसात करून केंद्रीय सेवांत,स्वतःचा ठसा उमटविला व महाराष्ट्राचा मान वाढविला, याचेही कुणी कौतुक करत नाही.

                                       

Courtesy:Unsplash-Mayank Mishra

  ते सोडा.. सोलापुरात बोलली जाणारी कानडीचा प्रभाव असलेली मराठी,खान्देशातली अहिराणी,खानदेशी मराठी,कोकणातली कोकणी,मालवणी मराठी,मराठवाड्यातली मराठी...यादी बरीच मोठी होईल,या मराठीला बोल लावलेलं फारसं ऐकण्यात येत नाही.मात्र नागपुरी मराठीची नेहमीच चेष्टा केली जाते.या सर्व शुद्ध मराठी आहेत काय?नक्कीच नाही. कारण प्रत्येक बोलीला अंगभूत सौंदर्य असतं व तिने ते आत्मसन्मानाने मिरवायला हवं,आम्ही ते मिरवतो, कोण काय म्हणेल याची आम्ही फिकीर करत नाही.म्हणून आम्ही नागपूरकर जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तर, आपल्या खास नागपुरी मित्रांसोबत,"का बे, काहून बे,कायले बे..." बोलणारच.ही आहे अस्सल नागपूरकराची ओळख. अगदी पुणे,मुंबई, पॅरिस,लंडन,न्यूयॉर्क..कुठेही असू द्या,असं बोलण्याने आमची "wavelength"लगेच जुळते. नाही तर, " कशाला?काय रे ?.. "हे आमच्यासाठी अगदी मिळमिळीत,फिक्क्या वरणासारखं....असं नव्हे की आम्हाला "काय रे?कसा आहेस ?कशाला रे?.. असे बोलता येत नाही,परंतु त्यामुळे आमच्या बोलण्यातून सहजता,उत्स्फूर्तता पार निघून जाते.


आता फळांचंच बघा, द्राक्षांना अस्सल नागपूरकर कधीच द्राक्षं म्हणणार नाही...बरोबर ओळखलंत,तो "अंगुर" म्हणेल.आता काही म्हणतील हा तर हिंदी शब्द आहे.अगदी बरोबर. पण आम्ही नागपूरकरांनी त्याला एवढं आपलंसं केलं आहे की कुणाचाही तो हिंदी शब्द आहे,यावर विश्वास बसत नाही.द्राक्षं म्हणणारा नागपुरात तुम्हाला दिवा घेऊन शोधलं तरी सापडायचा नाही.द्राक्षाप्रमाणे सफरचंदाचेही तसेच.नागपुरात त्याला कुणीही सफरचंद म्हणत नाही,इथे हिंदीतला "सेब",..अपभ्रंश होवून मराठीत "सेप" बनतो.'सेफ'नाही बरं का.अशी अनेक उदाहरणे देता येतील.पालेभाज्यांना आमच्या नागपुरात उर्वरीत महाराष्ट्रापेक्षा स्वतंत्र ओळख आहे.तुमची स्त्रीलिंगी कोथिंबीर आमच्या इथे पुल्लिंगी "सांभार"बनून ऐटीत मिरवते.उच्च विद्याविभूषित सुद्धा सर्रास सांभार म्हणतो व त्यात त्याला अजिबात संकोच वाटत नाही.बटाटे हे "आलू"व टमाटे "टमाटर"या हिंदी नावांनी ओळखले जातात.शिवाय जुने-जाणते "भेदरं"या नावाने टमाट्यांना संबोधतात.माकडासारख्या प्राण्याला आम्ही नागपूरकरांनी हिंदीतील "बंदर" व नागपुरी मराठीत "वांनेर"हे नवीन नाव दिलंआहे.बकरी हा हिंदी शब्द "शेळी"ला पर्यायी शब्द म्हणून आमच्या कित्येक पिढ्यांनी स्वीकारला आहे.नागपुरात बऱ्याचदा चहाचा "चाय" व सरबतचे "शरबत"झालेलं तुम्हाला दिसेल. औषधांच्या दुकानाच्या बोर्डावर "औषधी" कमी व "दवाई"हे जास्त लिहिलेलं आढळेल.इतकेच नाही तर"पटता है तो टेक नही तो रामटेक"अशा म्हणीही आमच्या नागपुरात प्रचलित आहेत.असे अनेक दाखले देता येतील.त्यावर तुम्ही म्हणाल ही मराठी मिश्रित हिंदी आहे का हिंदी मिश्रित मराठी? असे वाटणे साहजिक आहे,परंतु याच रुपात आमच्या इथे मराठी गेल्या कित्येक शतकांपासून नांदत आली आहे.

 

Courtesy:Unsplash-Sidharth Singh

नागपुरात वऱ्हाडी बोली, झाडी बोली या दोन्ही बोली एकाचवेळी अगदी लाडीगोडीने राहत आलेल्या आहेत.अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमेकडील भागावर वऱ्हाडी बोलीचा जास्त प्रभाव आहे.यात नरखेड,काटोल,कळमेश्वर व काही प्रमाणात सावनेर तालुक्याचा भाग येतो.तर भंडारा,चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेजवळच्या तालुक्यांवर झाडी बोलीचा प्रभाव आढळतो.यात कुही,मौदा,भिवापूर व उमरेड या तालुक्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. कामठी, पारशिवनी,रामटेक या तालुक्यांवर हिंदी भाषेचा प्रभाव जाणवतो.हिंगणा तालुक्याची बोली प्रामुख्याने वऱ्हाडी व काही अंशी झाडी बोलीचा प्रभाव असलेली भासते.नागपूर शहराचं म्हणाल तर इथे हिंदी,वऱ्हाडी,झाडी,व इतर बोलींचा मिलाफ झाल्याचे आपणास दिसते.काही भाषा तज्ज्ञ विदर्भाला मराठी भाषेची जननी संबोधतात.मराठीतील सर्वात प्राचीन काव्यग्रंथ "विवेकसिंधु" मुकुंदराज या श्रेष्ठ कवीने नागपूर जिल्ह्यातील "आंभोरा"येथे, वैनगंगा नदीच्या किनारी लिहिल्याच्या नोंदी आहेत.शिवाय मुकुंदराज यांचे जन्मस्थळ आमच्या विदर्भात भंडारा जिल्ह्यातील पवनी ही ऐतिहासिक नगरी असल्याचे दाखले प्राचीन  ग्रंथात मिळतात.म्हणून आमच्या मराठीवरील प्रेमावर कुणी शंका घेतलेलं आम्हाला अजिबात खपत नाही.

   


एवढा सगळा खटाटोप करण्याचं कारण म्हणजे,जागतिकीकरणाच्या लाटेत नागपूरकर तरुण,देशाच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात कामधंद्यांतनिमित्त पोचलेला आहे.तिथे वास्तव्य करीत असतांना,नागपूरकरांना,त्यांच्या भाषेविषयी मस्करीचा सामना करावा लावतो. "आपला तो बाळू,दुसऱ्याचं ते कारटं"या न्यायाने नागपुरी मराठीची अवहेलना काही संकुचित विचारसरणी असणाऱ्यांकडून नेहमी केली जाते.अशा अल्पज्ञानी लोकांची तोंडं कायमची बंद करण्यासाठी व त्यांच्या बुद्धीचा आवाका अधिक व्यापक करण्यासाठी हा लेख.आवडल्यास आपल्या नागपूरकर मित्रांना नक्की शेयर करा.

To watch more interesting stories do visit ,my youtube channel"Glocal Marathi".

Best of glocal marathi

गनिमीकावा

        गनिमीकावा संकटे बहु येतील, हरणे तुला ठाव नाही.. कोंडीत सापडाया, गड्या तू कुणाचा साव नाही..!!     भेटतील सरडे,      पदोपदी तुला रे.. ...