मंगळवार, ३० जुलै, २०२४

नागपूर मेट्रो..निबंध स्पर्धा





नागपूर सारख्या शहराला मेट्रो सेवेची गरज काय?पासून सुरू झालेली चर्चा..2012 साली नागपूर शहराला मेट्रो रेल्वेची गरज आहे...इथे येऊन थांबली...2014 मध्ये,केंद्र शासनाने नागपूर मेट्रोला तात्विक मंजुरी दिली... मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 ऑगस्ट 2014 ला नागपूर मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी केली... व खऱ्या अर्थाने मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामाची सुरुवात 31 मे 2015 ला झाली...पुढे देशातील सर्वात वेगाने उभारला जाणारा मेट्रो प्रकल्प म्हणून नागपूर मेट्रोची नोंद झाली...30 सप्टेंबर 2017 ला नागपूर मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली.. ८ मार्च 2019 ला नागपूर मेट्रो नागपूरकरांच्या सेवेत दाखल झाली...व नागपूर मेट्रो भारतातील 13 वी कार्यरत असणारी मेट्रो सेवा बनली... एवढचं नाही तर आज नागपूर मेट्रो एकूण ऊर्जेपैकी 60% सौरऊर्जा वापरून भारतातील सर्वात हरीत रेल्वे म्हणून नावाजली गेलेली आहे... नागपूर मेट्रोचा हा सर्व प्रवास स्वप्नवत असा आहे. 

  मेट्रोचा हा प्रवास आठवण्याचे कारण म्हणजे,ज्यावेळी छत्रपती चौकातला जुना उड्डाणपूल मेट्रो प्रकल्पासाठी पाडला जाणार होता,त्यावेळी नागपूर मेट्रोद्वारे उड्डाणपुलाची आठवण म्हणून व मेट्रो प्रकल्पाला शुभेच्छा देण्यासाठी भल्या मोठ्या बॅनरवर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती.त्यावेळेस शुभेच्छा संदेश लिहिताना स्वप्नवत वाटणारी मेट्रो,एवढ्या लवकर प्रत्यक्षात उतरेल असं कधी वाटलं नव्हतं. मात्र नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर असो,मेट्रोस्टेशनची निर्मिती करताना विचारात घेतलेली स्थानिक संस्कृती व युनिक अशा थीमचा केलेला वापर असो,सतत नाविन्याचा ध्यास धरून, मेट्रोने नागपूर शहराला चार चाँद लावले आहेत,असं म्हणणं वावगं ठरणार नाही.नागपूर शहरातील उष्ण हवामानाचा विचार करता,नागपूर मेट्रो नागपूरकरांच्या आयुष्यात थंडगार वाऱ्याची झुळूक घेऊन आली आहे.मिहान,हिंगणा एमआयडीसी, पारडी,गांधीबाग,सीताबर्डी इत्यादी अत्यंत गर्दीच्या ठिकाणांना सुलभरीत्या जोडण्याचे शिवधनुष्य महामेट्रोने लीलया पेललं आहे. येत्या काळात मेट्रो रिच दोन टप्पा पूर्ण झाल्यास नागपूर सभोवतालचा जवळपास 20-25 किलोमीटर पर्यंतचा भाग मेट्रोशी जोडला जाणार आहे.अशाप्रकारे येणाऱ्या काळात नागपूर शहराच्या विकासाच्या प्रवासात,नागपूर मेट्रो मैलाचा दगड ठरल्यापासून राहणार नाही.

   'नागपूर' हे भारत देशाच्या हृदय स्थानी वसलेलं शहर आहे.त्यामुळे नागपूर शहराला विकासाच्या अमाप संधी आहेत.अतिशय वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीत नागपूर अग्रस्थानी आहे .लॉजिस्टिक हब, टायगर कॅपिटल ऑफ इंडिया,ऑरेंज सिटी.. यांसारख्या अनेक बिरुदांनी यापूर्वी नागपूरला अलंकृत केलेलं आहे.या सर्व कारणांनी नागपूरच्या लोकसंख्येचा वाढता वेग लक्षात घेता,नागपूर शहराला मेट्रोसिटी बनविण्यात मेट्रो नक्कीच हातभार लावत आहे. जसजशी शहराची लोकसंख्या वाढत जाईल, तसतशी वाहने प्रचंड संख्येने रस्त्यांवर उतरतील आणि यामुळे वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण वाढीस लागेल.याला रोखायचं असेल तर जास्तीत जास्त लोकांनी मेट्रोचा वापर करायला हवा,याचा आदर्श नागपूरकरांनी,1 जानेवारी 2023 ला,एकाच दिवशी तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त संख्येने मेट्रोने प्रवास करून घालून दिला.

  नागपूर मेट्रोने व्यक्तिशः मला प्रवासाचा नित्य,निखळ आनंद दिला आहे.एक नोकरदार म्हणून मला नियमितपणे लोकमान्य नगर ते कस्तुरचंद पार्क यादरम्यान प्रवास करावा लागतो. शिवाय बऱ्याचदा गांधीबाग,पारडी, मिहान,एम्स,खापरी येथे वेगवेगळ्या कारणांसाठी मेट्रोने प्रवास करण्याचे प्रसंग येतात. मात्र मेट्रो असल्याने प्रवासाचा शीण जाणवत नाही.मेट्रो स्टेशनवर मिळणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा, कर्मचाऱ्यांची वागणूक व सुरक्षित प्रवासाची हमी या सर्व गोष्टी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत.मेट्रोने केलेला प्रवास म्हणजे आपण पर्यावरण संवर्धनास हातभार लावत आहोत, याचंही मला मानसिक समाधान देऊन जातो. मेट्रोने गरीब-श्रीमंत,विविध जाती-धर्माची लोकं,एकत्रित प्रवास करतात व यामुळे सामाजिक ऐक्याला सुद्धा बळकटी मिळते. अतिशय माफक दरात मिळणारा आनंददायी प्रवास कधी संपूच नये,असं मला नेहमी वाटतं.दररोजचे प्रवास करणारे सहप्रवासी,कधी सुखदुःखाचे साथीदार बनलेत,हे माझं मलाच कळलं नाही. मेट्रोने प्रवास करून केलेल्या आर्थिक बचतीची, कुटुंबाच्या सुखात गुंतवणूक करून, मी मेट्रो प्रवासाचा आनंद द्विगुणीत केला आहे. 

  बोलण्यासाठी मेट्रो विषयी तक्रार करावी, असे काहीच नाही.कारण अलीकडे तर व्हाट्सॲपवर तिकीट काढण्याची सेवा सुध्दा मेट्रोने उपलब्ध करून दिलेली आहे. प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा कशी देता येईल, असाच प्रयत्न कायम मेट्रोने केलेला आहे.शेवटी एवढंच सांगावसं वाटतं की, मेट्रोचा दुसरा टप्पा लवकरात लवकर पूर्ण व्हावा,जेणेकरून नागपूर शहराचा मोठा भाग मेट्रोसेवेच्या कक्षेत येईल.शिवाय रिंग रेल्वेद्वारे नागपूरचा उर्वरीत भाग,कसा जोडला जाईल,यादृष्टीने मेट्रो प्रशासनाने प्रयत्न करावे.

    मेट्रोचा नियमित प्रवासी म्हणून मेट्रोने प्रवासाचा आंतरराष्ट्रीय दर्जा भविष्यातही असाच कायम ठेवावा,ही मेट्रो प्रशासनाला नम्र विनंती व महामेट्रोला पुढील वाटचालीस मनःस्वी शुभेच्छा.

    

रविवार, १६ जून, २०२४

'बाप'माणूस


 एक हात जन्मापासून कायम तुमच्या पाठीशी असतो..तुम्ही रडता-पडता,तेव्हा कदाचित तो तुमच्याजवळ नसतो.. पण जेव्हा जेव्हा तुम्ही अडता- नडता,तेव्हा मात्र त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो.. अंगाई गीते तो तुमच्यासाठी गात नाही.. पण तुमचे सर्व लाड पुरवल्याशिवाय मात्र तो राहत नाही.. सबंध आयुष्य खर्ची घालतो कुटुंबासाठी.. नसतोच त्याच्याकडे वेळ  स्वतःसाठी... व्यक्त होतांना तो कदाचित कमी पडतो.. जीवनाच्या संघर्षात मात्र पुरेपूर लढतो.. ज्यांच्या फक्त असल्याने घराला घरपण येतं .. ज्याचं वागणंही तुम्हाला शहाणपण देतं.. ज्याला वाटतं,तुम्ही त्याच्यापेक्षाही मोठं व्हावं,असं वाटणारी जगातली एकमेव व्यक्ती,तो असतो..

जीवनात हार मानायची नाही,हे तो कायम मनी ठसतो..रुसतो, भांडतो बऱ्याचदा... न पटताही मांडतो म्हणणे अनेकदा.. तरी तुमच्यासाठी बऱ्याचदा माघार घेतो...न मागताही आधार देतो.. डोळ्यांत स्वप्न ठेवून तो जगत असतो.. शाश्वती नसतांनाही आपलं सर्वस्व उधळून देणारा केवळ तोच असतो..  चार व्यावहारिक गोष्टी,काळानुरूप शिकतो.. तुम्हाला खाजगी स्पेस देणारा कुटुंबात तोच पहिला असतो.. तटस्थ व स्थितप्रज्ञ राहून आपल्या अंगावर उचलून धरतो घर सबंध आयुष्यभर...सुखाचे चार दिवस यावे,मिळावी विश्रांती क्षणभर..हा असा बापमाणूस प्रत्येकात दडला आहे..ज्याच्यावाचून कुटुंबाचा गाडा अडला आहे..

Best of glocal marathi

गनिमीकावा

        गनिमीकावा संकटे बहु येतील, हरणे तुला ठाव नाही.. कोंडीत सापडाया, गड्या तू कुणाचा साव नाही..!!     भेटतील सरडे,      पदोपदी तुला रे.. ...