![]() |
Courtesy:Unsplash-Jonathan Kho |
होय....बरोबर वाचलंत तुम्ही."होम्या" हेच त्याचं नाव.आज तो वयाच्या पन्नाशीत तरी असावा.पण तुम्हा- आम्हासारखा, तो वाढत्या वयानुसार'श्री..श्रीमान..राव..'झाला नाही.सर्वांसाठी तो आजही "होम्याचं"आहे.वीस-पंचेवीस वर्षांपूर्वी, मी पाहिलेला व आज दिसणारा "होम्या" यात म्हणाल तर, फक्त 'उन्नीस-बीसचा फरक'. याअर्थी "होम्या"देवानंद या सदाबहार अभिनेत्यापेक्षाही चिरतरुण..
![]() |
Courtesy:Unsplash-Lakshya Jain |
आई-वडील, भाऊ-बहीण,ही रक्ताची नाती एकेकाळी जपणारा,आज रस्त्याने दिसणाऱ्या प्रत्येकात 'माणूस' शोधत फिरत असतो. त्याने रक्ताची नाती अजूनही जपून ठेवलीत.. त्याच्या हृदयाच्या बंदिस्त कप्प्यात..म्हणून कधी-कधी त्याची पावलं आपसूक वळतात,घराच्या दिशेने..इतर वेळी मात्र, "हे विश्वची माझे घर "असाच असतो त्याचा मुक्तसंचार....
![]() |
Courtesy:Unsplash-Shail Sharma |
सर्वसामान्यांसारखं, शिकावं, नोकरी-धंदा करावा, लग्न करून संसार थाटावा, असं चौकटीबद्ध आयुष्य कदाचित त्याच्या प्राक्तनी नसावं..म्हणून,'ऊन,वारा,पाऊस,थंडी'कशाचीही तमा न बाळगता,तो वर्षभर मोकळ्या आकाशाखाली बिनधास्तपणे वावरतअसतो.गावातील कुत्र्यांशी त्याचं जिवाभावाचं मैत्र.अंधारात फिरताना,'साप,विंचू'त्याला चावतील तर मजाल..दिवसाच्या उजेडापेक्षा रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधाराशी त्याची खास दोस्ती..
![]() |
Courtesy:Unsplash-Dynamic Wang |
गावातलं,शेंबडं पोरंही तुम्हाला त्याची ओळख हिरहिरीने सांगेल,एवढी त्याची ख्याती.. लहान मुलं झोपत नसतील,तर "होम्या"येईल,झोप लवकर,जणू "होम्या"म्हणजे, शोले चित्रपटातला गब्बर असल्यासारखा,त्याचा 'धाक' दाखवून लहान मुलांना झोपविणाऱ्या 'आया'गावात कमी नाहीत.अख्ख्या आयुष्यात, साधा मच्छरही न मारणाऱ्या "होम्याचं"नाव ऐकून लहान मुलं झोपतातचं कसे??हे मला कधीही न उलघडलेलं कोडं आहे.
![]() |
Courtesy:Unsplash-Patric Hendry |
हिमालयात न जाता,कुठलीही तपस्या-तप,न करता,विरक्त,आयुष्य जगणारा,"होम्या" एखाद्या 'योग्यापेक्षा'मला कमी भासत नाही.कारण, त्याला ना कशाचा मोह, ना कुठली अभिलाषा. त्याला कुणी हिणवल्यास,झिडकारल्यास,रागावतो तो काहीवेळेस..पण लगेच विसरूनही जातो.मानापमान,अहंकार,छद्मीपणा,या गोष्टी त्याच्यापासून कोसो दूर..त्याचा स्वतःचीच सुरू आहे मुक्तसंवाद ...वर्षानुवर्षे..तरी,कधीकाळी, हरवलेला "होमराज"अजूनही "होम्याला" गवसला नाही,हेही तितकंच खरं..
![]() |
Courtesy:Unsplash-Parij Borgohain |
गावात वाटलं त्या,घरी जावं,कुणी भाकरतुकडा दिला,तर तो खाऊन पुढची वाट धरावी.. चहाच्या टपरीजवळ किंवा पानटपरीवर तासनतास उगाचंच बसावं.. मग,कुणाला दया आल्यास,मिळतो त्याला घोटभर चहा व खर्रा.एवढीच काय ती त्याची चंगळ.इतरांचं अनुकरण करत,तोही चघळत बसतो, खर्रा बराचवेळ. त्यामुळं,मिळतं त्याला काही वेळापूरतं समाधान..आपणही'सर्वसामान्य'असल्याचं.गावात लग्न समारंभ व कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असल्यास,ती असते त्याच्यासाठी, मेजवानी.मग काय, जेवतो तो मनसोक्त, तृप्तीची ढेकर येईस्तोवर...
![]() |
Courtesy:Unsplash-Richard Saunders |
कधीकधी त्याच्या रक्ताच्या नात्यातले व गावातील संवेदनशील लोकं,देतात त्याची नखशिखांत आंघोळ घालून,तर कधी कुणी देतो त्याला,नवीन कापडं..कोणी कटिंग-दाढीचा खर्च करतात.मग काय,"होम्या"तुम्हाला गावात शोधूनही सापडायचा नाही."होमराज"म्हणाल तर मात्र लगेच सापडेल. एकेकाळी अभ्यासात गती असणारा,देखणा "होमराज"गावाला पुन्हा एकदा नव्याने भेटतो.परंतु "होम्याला"तो सापडत नाही.पुढे,दोन-चार दिवसात "होमराजला", "होम्या"पुन्हा कडकडून मिठी मारतो व "होमराज"पुन्हा एकदा,काही महिन्यांसाठी अंतर्धान पावतो.
![]() |
Courtesy:Unsplash-Anna Vi |
"होम्याला" कधी ताप-ज्वर आल्याचं,निदान मी तरी ऐकलं नाही.आलाही असेल कधी,मात्र आपल्यासारखी दवाखान्याची पायरी त्याला खचितच चढावी लागते."होम्यासारखी" मानसिक संतुलन गमावलेली माणसं,गावा- गावात,शहरांत,खितपत पडलेली आपल्याला दिसतात.काहींना साखळदंडाने बांधून कोंडलं जातं, त्यांच्याच घरी,एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखं...कुणी दिसतो भररस्त्यात बेभान फिरतांना, तर कुणी एखाद्या पुलाशेजारी निचपत पडलेला दिसतो. कुणी साधत असतो ,अदृश्याशी संवाद.त्यांना स्वतःचं भान नसतं. मळक्या- फाटक्या,कपड्यात वावरणारी,वाढलेली दाढी व लांब,मेणचट केस असलेली,कधीकधी तर..डुकरांसोबत, उकिरड्यावर उष्ट फेकलेलं अन्न खाणारी...हाडामासाची माणसं आपल्याला अवतीभवती दिसतात.त्यातली काही अवलिया म्हणून समाजात पूजली जातात. पुढे त्यांची भव्य-दिव्य मंदिरं,दर्गे बनतात. स्वतःच्या आयुष्याचा अर्थही न गवसणाऱ्यांच्या,प्रवचनांची,उपदेशांची पुस्तकं बाजारात येतात. खिशात दमडी न बाळगणार्यांना लोकं,लाखोंची देणगी,हयात असताना व नसतानाही देतात. दुसरीकडे, त्यांचे बांधव,दोन वेळेच्या जेवणासाठी व अंगभर कपड्यांसाठी,फकिराचंं जिणं जगत असतात.व "मूकनायक"बनून आपल्याला सांगत असतात,जीवनाचा खरा अर्थ..
![]() |
Courtesy:Unsplash-K.Mitch Hodge |
आजच्या घडीला,जगात जवळपास पंधरा टक्के लोकसंख्या, शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंग असणाऱ्यांची आहे.भारत सरकारने अपंगांसाठीच्या UNCRPWD(Convention on 'Rights of person with disability') या संयुक्त राष्ट्रांच्या कराराला 2007 मधे मान्यता दिली.शिवाय, अपंगांसाठी PWD(Person with disability)act 1995,व संशोधित कायदा,(Revised),RPWD act, 2016, पारीत करून शारीरिक व मानसिकरित्या अक्षम असणाऱ्या व्यक्तींच्या हक्क व अधिकारांची त्यात तरतूद केली आहे.असे असले तरी,खासकरून, मानसिकरित्या अक्षम व्यक्तींच्या समस्या, महिला,मागासवर्ग व अल्पसंख्यांकांपेक्षा गंभीर स्वरूपाच्या आहेत.कारण, त्यांना त्यांच्या,आजाराची व अधिकारांची काहीच कल्पना नसते.जगाच्या तुलनेत, आपण अशा लोकांसाठी आजतागायत फार काही भरीव करू शकलेलो नाही.आज या सर्वांसाठी सामाजिक व शासकीय पातळीवर तात्काळ उपाययोजना करणे,गरजेचे झाले आहे. असे असतांना,आपण मात्र होम्यासारख्या लोकांचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार अजूनही पदोपदी नाकारत असतो..त्यांच्यातल्या माणसाला व त्यांच्या कुटुंबाला गरज आहे,मायेची,सहकार्याची व खंबीर पाठिंब्याची.कारण, समाज म्हणून आपल्याकडून त्यांच्या कुटुंबाची कळत - नकळत,अवहेलना झालेली असते.त्यांच्या कुटुंबाने अनंत संकटांचा मुकाबला केलेला असतो.त्यांच्या कष्टांची व संघर्षाची आपण कल्पनाही करू शकत नाही.म्हणून,संविधानाने दिलेला समानतेचा अधिकार जर आपण समाज म्हणून अशा, व्यक्तींना देऊ शकलो तर यापेक्षा उत्तम कार्य दुसरं असू शकत नाही.