शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

फुटपाथ

 


अखेर महाराष्ट्र शासनाने," इयत्ता 5 ते 8 चे वर्ग 27 जानेवारीपासून सुरु होणार.."अशी घोषणा केली. जवळपास 10 महिन्यानंतर शाळा सुरू होणार असल्याने,आता मला दररोज 50-60 किलोमीटर अंतर अपडाऊन करावे लागणार होते. म्हणून मी माझ्या बाईकची सर्व्हिसिंग करण्याचे ठरविले. याआधी अनेक ठिकाणी सर्व्हिसिंगचा अनुभव घेतल्यानंतर, शेवटी मित्राच्या ओळखीने निझामभाईंकडे जाण्याचे निश्चित केले. 

अजनी चौकातून,FCI गोडाऊनच्या रोडने गेल्यास,चुनाभट्टी भागात निझामभाईंचे फुटपाथवर दुकान आहे.त्यांचा मोबाईल नंबर मिळविला व त्यांना कॉल केला."आऊ क्या,बाईक लेके,आज अर्जंट सर्व्हिसिंग करनी है"मी म्हटले."खाली बैठा हूं, कोई बाईक नही है,आओ कभीभी"निझामभाई बोलले.मी अर्ध्या तासाच्या आत तिथे हजर झालो.तसं म्हणाल तर तिथे आणखी दुसरी दुकानं आहेत.तीही फुटपाथवरचं.मी मात्र यांपैकी निझामभाईंकडे बाईक सर्व्हिसिंग करणार होतो. दुकान कसलं,लाकडी-टिनांनी जोडलेला मोठा ठेलाच तो.त्यासमोर मोडक्या-तोडक्या, जुन्या, भंगार गाड्या अस्ताव्यस्त ठेवलेल्या... काही नव्या गाड्या दुरुस्तीसाठी आलेल्या... व अशा जुन्या-नव्या गाड्यांच्या गराड्यात पन्नाशीच्या आसपास असलेले निझामभाई,त्यांच्या कामात गढलेले मला दिसले.मित्राचा संदर्भ दिल्यावर व लांबून आलो असे सांगितल्यावर,त्यांनी माझी गाडी लगेच सर्व्हिसिंगला घेतली.सर्वप्रथम गाडी वॉशिंग सेंटर मधून धुवून आणण्यात आली व त्यानंतर गाडीच्या एकेक भागाची चाचपणी करून, निझामभाईंनी आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या."गाडीमें कुछ नया सामान डालना है क्या?"मी विचारलं."अभी जरूरत नही,बाद मे आओगे तो देखेंगे"निझामभाई म्हणाले.दरवेळी गाडी सर्व्हिसिंगला नेल्यावर,"साहाब,गाडी का ये पार्ट गया है..वो खराब हो गया है.."असं म्हणत शेकडो रुपये विनाकारण उकळणाऱ्या मेकॅनिकचा यापूर्वीचा अनुभव असल्याने, निझामभाईंचे हे शब्द मला आश्चर्यचकित करीत होते."आजकल की नई गाडीया एकदम भंगार आ रही है,पुरानीच गाडी मजबुत है"अशी पुस्तीही त्यांनी जोडली.व "नई गाडीयो का इंजन बहुत हलका है,पांच साल के अंदर खराब होता है."असं सांगून त्यांनी, माझ्या सामान्य ज्ञानात भर टाकली.


 सर्व्हिसिंग झाल्यावर,"बिल कितना हुआ?"मी विचारलं."250 रु."निझामभाईंनी उत्तर दिलं. पैसे दिल्यावर ते म्हणाले,"चलो चाय पिते है"असं म्हणत त्यांनी त्यांच्या नेहमीच्या चहाच्या टपरीवर नेलं व दोन हाफ चहा मागितला.चहाचे घोट घेता-घेता त्यांनी आपला जीवनप्रवास सांगायला सुरुवात केली."मेरे पिताजी रेल्वे मे ड्रायव्हर थे,उन्होने चुनाभट्टी झोपडपट्टीमें घर बनाया.रोज के झगडे और शराबी लोगो की बस्ती होने की वजहसे,पढाई छुट गयी.मेरे दोस्त कोईभी नही पढे, और मैं भी.इसलिए,आज फुटपाथपर दुकान चला रहा हूं" लेकीन,मेरा लडका बी. कॉम.पढ रहा है और साथ में VCA(विदर्भ क्रिकेट असोसिएशन)के लिए अंडर 19,क्रिकेट खेलता है, अच्छा प्लेयर है,शायद,रणजी खेलेगा..दिनरात मेहनत करता है"पोराच्या कर्तृत्वाविषयी सांगतांना,निझामभाईंच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक जाणवत होती."लडकी मोहता सायन्स कॉलेजमे B.Sc पढ रही है"असं सांगून मुलीलाही उत्तम शिक्षण दिल्याचे निझामभाईंनी सांगितले. मी उत्सुकतेपोटी विचारलं,"निझामभाई ,ऑटोमोबाईल लाईन मे,जादातर,मुस्लिम लोग ही क्यों होते है?त्यावर त्यांनी अतिशय समर्पक उत्तर दिलं"मुस्लिम समाज मे लडके,जादा पढते नही,शायद इसिलिये..मगर आजकल कुछ-कुछ लडके पढ रहे है."असं सांगून समाधान व्यक्त केलं."वाठोडा मे प्लॉट खरीद रखा है,वहा एक दुकान और नया घर बनाना है,मैं मेरे परिवार को अच्छा भविष्य देना चाहता हूं."असा आशावाद निझामभाईंनी व्यक्त केला. फुटपाथवर दररोज हात काळे करून,मळक्या कपड्यात,उन्हा-तान्हात राबून,त्यांनी केलेली प्रगती व मुलांना दिलेलं उत्तम शिक्षण तसेच स्वतःच्या आयुष्याला दिलेली सोनेरी झळाळी,नक्कीच अचंबित करणारी वाटली. आपल्यातले पांढरपेशे,नोकरवर्ग, अतिशय कम्फर्टेबल जिणं जगूनही,कदाचित आयुष्याला आकार देऊ शकत नाही,इथे मात्र फुटपाथवर जगून, निझामभाईंनी,जीवनाचा विजयपथ गाठला,हे नक्कीच कौतुकास्पद आहे.मी बाईकला किक मारली,परंतु रस्त्याने जातांना,जॉली LLB मधला अर्षद वारसीचा डायलॉग मला आठवला,"कौन है ये लोग, कहासे आते है ये लोग.."व निझामभाईंच्या रूपाने, फुटपाथवर काम करणाऱ्या, दुकान थाटणाऱ्या,तमाम लोकांच्या अस्तित्वाची नव्याने ओळख करवून गेला....!!

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

जपान व महाराष्ट्र ??

Courtesy:Unsplash-Jaikishan Patel

नुकतीच एक बातमी वाचण्यात आली.
"महाराष्ट्र शासन 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करणार..." खाजगीकरणाचे समर्थक यामुळे भलतेच खुश झाले असणार!!
नाहीतरी लोकं म्हणतच असतात,
दहा-बारा विद्यार्थ्यांसाठी महिन्याला लाख रुपये पगार असणारे शिक्षक हवेत कशाला??शिवाय
एवढे कमी विद्यार्थी असूनही सर्वच मुलं कुठे प्रगत असतात.. त्यातही असतातच काही अभ्यासात मागे..तर मग काय,यावर एकच उपाय,नव्या शैक्षणिक धोरणात प्रस्तावित असलेल्या ,केंद्रीय शाळेच्या संकल्पनेप्रमाणे ,जोडून देता येईल, अशा लहान -लहान शाळा, केंद्रीय शाळेशी...
मग काय बघायलाच नको.. 'प्रत्येक वर्गाला स्वतंत्र वर्गखोली व  शिक्षक, संगणक कक्ष ,मोठं क्रीडांगण, विषयवार व तासिकेनुसार अध्यापक.. सारं कसं आलबेल असेल..मूलं येतील खाजगी वाहनात बसून.. अगदी शहरी इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांप्रमाणे..स्कूल बॅग, वॉटर बॅग, सूटबूट घालून.. सगळं कसं .."ऑल इज वेल!!"
  
Courtesy:Unsplash-Jaikishan Patel

असं झाल्यास आनंदच आहे,परंतु वास्तविक परिस्थिती काही औरच आहे.गेली पंधरा वर्षे ग्रामीण,आदिवासी भागात,शिक्षक म्हणून काम करताना आलेला अनुभव बघता,नव्या शैक्षणिक धोरणात रंगविण्यात आलेलं, हे गुलाबी चित्र अंतर्मनाला काही केल्या पटत नाही. भारताची किंबहुना महाराष्ट्राची एकंदरीत समाजरचना बघता आपल्या लक्षात येतं की,शेकडो वर्षांच्या सामाजिक व आर्थिक घुसळणीतून निर्माण झालेल्या विकासाच्या संधीचा लाभ समाजातील, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या संपन्न घटकांनी घेतलेला आपल्याला दिसतो व समाजातल्या या घटकाने कधीचेच शहराकडे किंबहुना त्याहीपलीकडे..भारताबाहेर.. प्रस्थान केलेलं आढळतं.मात्र,मागे उरलेला, आदिवासी व मागास समाज अजूनही लहान-लहान खेड्यांत वसलेला व  विखुरलेला आहे.असंख्य खेडी अशी आहेत की ज्यांमध्ये तुम्हाला संपन्न घटकांचे वास्तव्य अजिबात दिसणार नाही.जे असतील त्यांनी त्यांची पर्यायी व्यवस्था नजीकच्या शहरात केलेली आहे किंवा त्यांच्या मुलांना शहरातील शाळांमध्ये दाखल तरी केलेले आहे.सांगायचे तात्पर्य, आजच्या घडीला दुर्गम, आदिवासी व ग्रामीण भागातील लहान लहान खेड्यांत,सरकारी शाळेत शिकणारी मुलं,प्रामुख्याने तळागाळातील समाजाची आहेत. त्यांच्यासाठी शाळा हे विकासाचे मंदिर आहे.शाळेतूनच त्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त होत असतो.शाळा म्हणजे आशा, स्वप्न,महत्त्वाकांक्षा.. सारंच काही आहे,त्यांच्यासाठी... शाळा एखाद्या दीपस्तंभासारखी त्यांच्यासाठी आजतागायत काम करत आलेली आहे .याच लहान लहान शाळांमध्ये बाराखडी गिरवणारे आज समाजाला दिशा देण्याचे काम करीत आहेत.या भागात रोजगाराची पुरेशी साधने नाहीत तसेच  दारिद्र्य व कुपोषण त्यांच्या पाचवीला पुजलेलं आहे. अशा समाजासाठी, शिक्षण हे अति आवश्यक व जीवनावश्यक अशी बाब आहे.मग महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय बहुसंख्य मागास समाजाला मिळालेली विकासाची संधी हिरावून घेणारा आहे,असं काहीसं चित्र या निर्णयामुळे निर्माण झालेलं आहे. कोठारी कमिशनने शिक्षणावर जीडीपीच्या सहा टक्के खर्च करण्याचे सुचवले असताना तो आपण आजतागायत करू शकलेलो नाही. दोन-तीन टक्क्यांच्या वर हा खर्च गेला नाही. असे असतानाही आपण आखडता हात का घेत आहोत??हे न उलगडलेलं कोडं आहे.खर्च वाचवायचाच असेल तर अनेक मार्ग आहेत. मात्र शिक्षणावर केलेला खर्च एखाद्या वस्तूच्या स्वरूपात समजण्यात येऊ नये.ही गुंतवणूक देशाचं उज्ज्वल भवितव्य घडविण्याचं काम करत असते.
  
Courtesy:Unsplash-Himanshu Singh

एकीकडे आपल्या महाराष्ट्रात 20 पेक्षा कमी  पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जात असताना ,दुसरीकडे जगाच्या एका कोपऱ्यातील.. एक चिमुकला देश, जपान.. येथून एक वेगळी बातमी  कानावर आली..ती बातमी म्हणजे .."जपानमध्ये 'शिराताकी' गावात राहणाऱ्या 'काना हराडा'या  विद्यार्थिनीसाठी जपान शासन , रेल्वे स्टेशन बंद करण्याचं नियोजन असताना,एकटीसाठी ट्रेन सुरू ठेवते. ती विद्यार्थिनी पस्तीस किलोमीटर अंतर पार करून  ट्रेनने दररोज शाळेत जाते व जपान शासन ती पदवीधर होईपर्यंत ,पुढील पाच वर्षे म्हणजे 2021 पर्यंत रेल्वे स्टेशन व ट्रेन सुरू ठेवतं.. अशी मानसिकता व विचारसरणी असणारा देशचं राखेतून भरारी घेवू शकतो. म्हणूनच हा चिमुकला देश जगातील प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आज मिरवतो आहे व दुसरीकडे आपल्या देशात,महाराष्ट्रात आपण, 20 पेक्षा कमी विद्यार्थी असणाऱ्या सरकारी शाळा फक्त आर्थिक कारणास्तव बंद करण्याचं ठरवतो, हा विरोधाभास भारत व जपान
त्यांच्या विकासातील फरका बद्दल बरच काही सांगून जातो...

To watch more interesting videos,do visit,"Glocal Marathi"youtube channel.




शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०

आम्ही नागपूरकर-भाग-2 (तर्री पोहा)

 


आम्हा नागपूरकरांच्या जिभेचे ,जरा जास्तच चोचले आहेत.असं-तसं आम्हाला अजिबात जमत नाही. साधे कांदे पोहे घ्या ...


 


जगाच्या पाठीवर पोह्यांमध्ये तर्रीदार रस्सा टाकून खाणारे फक्त आम्ही नागपूरकरच.पोह्यांमध्ये तर्रीदार रस्सा टाकून खाल्ल्या जाणाऱ्या पोह्यांना आम्ही नागपूरकर "तर्री पोहा"किंवा "चना पोहा" या नावाने संबोधतो. सकाळ झाली रे झाली की,तुम्हाला नागपुरातल्या चौकाचौकात टपऱ्यांवर तर्री पोहा विकणारे भेटतील. मॉर्निंग वॉकला जाणारे,बाहेरगावाहून नागपुरात येणारे,होस्टेल मध्ये राहणारे विद्यार्थी,बॅचलर्स,अशांसाठी तर्री पोहा म्हणजे आवडीचा ब्रेकफास्ट.नागपुरात,दहा रुपयांत एक हाफ तर वीस रुपयात एक प्लेट पोहे,अगदी सहज मिळतात.जोपर्यंत प्लेटमध्ये घेतलेले पोहे तर्रीदार रस्स्यात तरंगत नाही व त्यात अर्धे चिरलेले लालचुटूक टमाटर(टमाटे) विराजमान होत नाही, तोपर्यंत अस्सल नागपूरकराला पोहे खाल्ल्याचे समाधान मिळत नाही,हे मात्र नक्की. शिवाय,जे पोहे खाल्ल्यानंतर, तर्रीचा ठसका लागत नाही व नाका-डोळ्यांत पाणी येत नाही,अशा पोह्यांना अस्सल नागपूरकर पोहेच मानत नाही.एवढा मान खवय्या नागपूरकरांच्या लेखी तर्री पोह्यांना आहे.नागपुरात पोहे खातांना रस्सा वारंवार मागण्यात.. ग्राहक व तो देण्यात.. विक्रेता, अजिबात संकोच करत नाही.जणू तो नागपूरकरांचा मूलभूत हक्कच आहे,असा सर्वांचा समज आहे.


   


सांगायचं तात्पर्य,नागपूरचं हवामान जरी "कोरडं"असलं तरी पोहे मात्र आम्हाला तर्रीदार रस्स्याने "ओले" झालेलेच आवडतात.अशा तर्री पोह्यांचे नागपूरकर 'दिवाने' आहेत. कामधंद्या निमित्त आम्ही नागपूरकर जगात,कुठेही गेलो तरी,साधं "तर्री पोहे"हे नाव जरी ऐकलं तरी, आम्हाला नागपूरची ओढ लागल्यापासून राहत नाही.   

                 


 आधी सांगितल्याप्रमाणे, नागपुरात तर्री पोहे विकणारे असंख्य आहेत.तसेच नागपुरातल्या प्रत्येक भागात त्या-त्या भागातले तर्री पोहेवाले प्रसिद्ध आहेत.या सर्वांमधले, हॉट डेस्टिनेशन म्हणजे केपी ग्राउंडचे पोहे.के. पी.ग्राऊंड म्हणजे कस्तुरचंद पार्क. आमच्या नागपूरचं जणू "शिवाजी पार्क".जिथे देशातल्या मोठमोठाल्या राजकारण्यांनी सभा गाजवल्या ते ठिकाण.केपी ग्राउंड जवळ मिळणारे तर्री पोहे खाण्यासाठी नागपुरातल्या श्रीमंतांपासून ते सामान्यातले सामान्य लोकं गर्दी करतात.नागपुरात येऊन इथल्या तर्री पोह्यांचा आस्वाद न घेता जाणारा सेलेब्रिटी विरळाच.राजकारणी,बॉलीवूड स्टार, मराठी सिनेस्टार.. सर्वांनी इथल्या तर्री पोह्यांची चव कधी ना कधी चाखली आहे.इथल्या तर्री पोह्यांचे वैशिष्ट्य म्हणजे इथला ठसकेबाज रस्सा व पोह्यांवर अलगदपणे पेश केले जाणारे अर्धे लाल टमाटर(टमाटे). टमाटरमुळे पोह्यांना आंबट-तिखट अशी चव प्राप्त होते व आपल्या जिभेचे सर्व टेस्ट बड्स तृप्त होतात.एवढेच नाही तर इथले काही पोहेवाले दरवर्षी इमानेइतबारे इन्कम टॅक्स भरतात व  काही त्यांच्या मिळकतीच्या जोरावर जगभ्रमंतीही करतात.अशी माहिती आहे. टी. व्ही. चॅनेल्सवर तसेच प्रसिद्ध youtube चॅनेल्सवर सुद्धा हे पोहेवाले झळकलेले आहेत.                                   यावरून,तुम्हा सर्वांना,नागपुरातल्या प्रसिद्ध तर्री पोह्यांचा महिमा नक्कीच कळला असेल... नागपुरात येणाऱ्या प्रत्येकाने तर्री पोह्यांचा आवर्जून आस्वाद घ्यावा,यासाठी ...एक अस्सल नागपूरकर म्हणून...अल्पसा प्रयत्न!!

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

आम्ही नागपूरकर-भाग 1(नागपुरी बोली)



Courtesy:Unsplash-Harish Fulpadia

मित्रांनो,खरं तर आजवर नागपूरकरांची वैशिष्ट्ये नागपूरकरांनी कमी व नागपूर बाहेरच्या लेखकांनीच जास्त सांगितलेली आपल्याला दिसतात. त्यामुळे "अस्सल नागपूरकर" कसा असतो? याचे त्यांनी केलेले वर्णन अगदी वरवरचे व ऐकीव माहितीवरून केल्याचे आपणांस दिसते. मुंबईकर,पुणेकर, सातारकर... इत्यादी.बद्दल मी बोलणार नाही,मात्र या सर्वांबद्दल आदर बाळगून,"आम्ही नागपूरकर"काय चीज आहोत?हे गुणदोषांसह सांगण्याचा हा अल्पसा प्रयत्न..

                           


 सर्वप्रथम,नागपूरकरांची जडणघडण जाणून घ्यायची असेल तर आपल्याला नागपूरचे भौगोलिक स्थान जाणून घ्यावे लागेल.नागपूर जिल्ह्याची उत्तरेकडील सीमा मध्यप्रदेशला लागून असल्याने व एकेकाळी नागपूर ही "सीपी अँड बेरार"प्रांताची राजधानी असल्याने तिथे पूर्वापार हिंदी भाषिक लोक कामा-धंद्यानिमित्त येत आलेले आहेत. त्यामुळे नागपूरवर हिंदीचा प्रभाव ओघाने आलाच व ते नैसर्गिकही आहे.कारण नदीच्या वाहत्या प्रवाहाप्रमाणे भाषा सुद्धा प्रवाही असते. प्रवाह थांबला तर त्याचे डबके होते,म्हणून नागपूरमध्ये मराठी व हिंदीचा अद्भुत संगम होवून हा प्रवाह अखंड वाहत आलेला आहे. ज्याप्रमाणे इंग्रजीने जगातल्या सर्व भाषा स्वतःमध्ये सामावून घेतल्या, त्याप्रमाणे आम्ही नागपूरकरांनी मराठी सोबत हिंदीला आपलेसे केले.मग आमच्या भाषेवर एखादा पुणेकर म्हणतो,"काय राव,तुमची भाषा,अगदी भेसळ आहे. ना धड हिंदी ना धड मराठी.मग अशा पुणेकराला, भूगोल नव्याने शिकण्याची नितांत गरज आहे,असं मला वाटतं.कारण, उदाहरण द्यायचं झाल्यास, पुण्याला एकही हिंदी भाषिक प्रदेशाची सीमा खेटून नसल्याने व चहूबाजूंनी मराठीभाषी जिल्ह्यांच्या सीमा असल्याने त्यांनी मराठीचे शुद्ध रूप जपले तर त्यात काय एवढं नवल??त्यापेक्षा आम्ही नागपूरकरांनी हिंदीला,आपलंसं करून, आमची स्वतःची "नागपुरी बोली"जन्माला घातली,याची साधी दखल कुणी आजतागायत घेतली नाही.शिवाय हिंदी आत्मसात करून केंद्रीय सेवांत,स्वतःचा ठसा उमटविला व महाराष्ट्राचा मान वाढविला, याचेही कुणी कौतुक करत नाही.

                                       

Courtesy:Unsplash-Mayank Mishra

  ते सोडा.. सोलापुरात बोलली जाणारी कानडीचा प्रभाव असलेली मराठी,खान्देशातली अहिराणी,खानदेशी मराठी,कोकणातली कोकणी,मालवणी मराठी,मराठवाड्यातली मराठी...यादी बरीच मोठी होईल,या मराठीला बोल लावलेलं फारसं ऐकण्यात येत नाही.मात्र नागपुरी मराठीची नेहमीच चेष्टा केली जाते.या सर्व शुद्ध मराठी आहेत काय?नक्कीच नाही. कारण प्रत्येक बोलीला अंगभूत सौंदर्य असतं व तिने ते आत्मसन्मानाने मिरवायला हवं,आम्ही ते मिरवतो, कोण काय म्हणेल याची आम्ही फिकीर करत नाही.म्हणून आम्ही नागपूरकर जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तर, आपल्या खास नागपुरी मित्रांसोबत,"का बे, काहून बे,कायले बे..." बोलणारच.ही आहे अस्सल नागपूरकराची ओळख. अगदी पुणे,मुंबई, पॅरिस,लंडन,न्यूयॉर्क..कुठेही असू द्या,असं बोलण्याने आमची "wavelength"लगेच जुळते. नाही तर, " कशाला?काय रे ?.. "हे आमच्यासाठी अगदी मिळमिळीत,फिक्क्या वरणासारखं....असं नव्हे की आम्हाला "काय रे?कसा आहेस ?कशाला रे?.. असे बोलता येत नाही,परंतु त्यामुळे आमच्या बोलण्यातून सहजता,उत्स्फूर्तता पार निघून जाते.


आता फळांचंच बघा, द्राक्षांना अस्सल नागपूरकर कधीच द्राक्षं म्हणणार नाही...बरोबर ओळखलंत,तो "अंगुर" म्हणेल.आता काही म्हणतील हा तर हिंदी शब्द आहे.अगदी बरोबर. पण आम्ही नागपूरकरांनी त्याला एवढं आपलंसं केलं आहे की कुणाचाही तो हिंदी शब्द आहे,यावर विश्वास बसत नाही.द्राक्षं म्हणणारा नागपुरात तुम्हाला दिवा घेऊन शोधलं तरी सापडायचा नाही.द्राक्षाप्रमाणे सफरचंदाचेही तसेच.नागपुरात त्याला कुणीही सफरचंद म्हणत नाही,इथे हिंदीतला "सेब",..अपभ्रंश होवून मराठीत "सेप" बनतो.'सेफ'नाही बरं का.अशी अनेक उदाहरणे देता येतील.पालेभाज्यांना आमच्या नागपुरात उर्वरीत महाराष्ट्रापेक्षा स्वतंत्र ओळख आहे.तुमची स्त्रीलिंगी कोथिंबीर आमच्या इथे पुल्लिंगी "सांभार"बनून ऐटीत मिरवते.उच्च विद्याविभूषित सुद्धा सर्रास सांभार म्हणतो व त्यात त्याला अजिबात संकोच वाटत नाही.बटाटे हे "आलू"व टमाटे "टमाटर"या हिंदी नावांनी ओळखले जातात.शिवाय जुने-जाणते "भेदरं"या नावाने टमाट्यांना संबोधतात.माकडासारख्या प्राण्याला आम्ही नागपूरकरांनी हिंदीतील "बंदर" व नागपुरी मराठीत "वांनेर"हे नवीन नाव दिलंआहे.बकरी हा हिंदी शब्द "शेळी"ला पर्यायी शब्द म्हणून आमच्या कित्येक पिढ्यांनी स्वीकारला आहे.नागपुरात बऱ्याचदा चहाचा "चाय" व सरबतचे "शरबत"झालेलं तुम्हाला दिसेल. औषधांच्या दुकानाच्या बोर्डावर "औषधी" कमी व "दवाई"हे जास्त लिहिलेलं आढळेल.इतकेच नाही तर"पटता है तो टेक नही तो रामटेक"अशा म्हणीही आमच्या नागपुरात प्रचलित आहेत.असे अनेक दाखले देता येतील.त्यावर तुम्ही म्हणाल ही मराठी मिश्रित हिंदी आहे का हिंदी मिश्रित मराठी? असे वाटणे साहजिक आहे,परंतु याच रुपात आमच्या इथे मराठी गेल्या कित्येक शतकांपासून नांदत आली आहे.

 

Courtesy:Unsplash-Sidharth Singh

नागपुरात वऱ्हाडी बोली, झाडी बोली या दोन्ही बोली एकाचवेळी अगदी लाडीगोडीने राहत आलेल्या आहेत.अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमेकडील भागावर वऱ्हाडी बोलीचा जास्त प्रभाव आहे.यात नरखेड,काटोल,कळमेश्वर व काही प्रमाणात सावनेर तालुक्याचा भाग येतो.तर भंडारा,चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेजवळच्या तालुक्यांवर झाडी बोलीचा प्रभाव आढळतो.यात कुही,मौदा,भिवापूर व उमरेड या तालुक्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. कामठी, पारशिवनी,रामटेक या तालुक्यांवर हिंदी भाषेचा प्रभाव जाणवतो.हिंगणा तालुक्याची बोली प्रामुख्याने वऱ्हाडी व काही अंशी झाडी बोलीचा प्रभाव असलेली भासते.नागपूर शहराचं म्हणाल तर इथे हिंदी,वऱ्हाडी,झाडी,व इतर बोलींचा मिलाफ झाल्याचे आपणास दिसते.काही भाषा तज्ज्ञ विदर्भाला मराठी भाषेची जननी संबोधतात.मराठीतील सर्वात प्राचीन काव्यग्रंथ "विवेकसिंधु" मुकुंदराज या श्रेष्ठ कवीने नागपूर जिल्ह्यातील "आंभोरा"येथे, वैनगंगा नदीच्या किनारी लिहिल्याच्या नोंदी आहेत.शिवाय मुकुंदराज यांचे जन्मस्थळ आमच्या विदर्भात भंडारा जिल्ह्यातील पवनी ही ऐतिहासिक नगरी असल्याचे दाखले प्राचीन  ग्रंथात मिळतात.म्हणून आमच्या मराठीवरील प्रेमावर कुणी शंका घेतलेलं आम्हाला अजिबात खपत नाही.

   


एवढा सगळा खटाटोप करण्याचं कारण म्हणजे,जागतिकीकरणाच्या लाटेत नागपूरकर तरुण,देशाच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात कामधंद्यांतनिमित्त पोचलेला आहे.तिथे वास्तव्य करीत असतांना,नागपूरकरांना,त्यांच्या भाषेविषयी मस्करीचा सामना करावा लावतो. "आपला तो बाळू,दुसऱ्याचं ते कारटं"या न्यायाने नागपुरी मराठीची अवहेलना काही संकुचित विचारसरणी असणाऱ्यांकडून नेहमी केली जाते.अशा अल्पज्ञानी लोकांची तोंडं कायमची बंद करण्यासाठी व त्यांच्या बुद्धीचा आवाका अधिक व्यापक करण्यासाठी हा लेख.आवडल्यास आपल्या नागपूरकर मित्रांना नक्की शेयर करा.

To watch more interesting stories do visit ,my youtube channel"Glocal Marathi".

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

होम्या

Courtesy:Unsplash-Jonathan Kho

 होय....बरोबर वाचलंत तुम्ही."होम्या" हेच त्याचं नाव.आज तो वयाच्या पन्नाशीत तरी असावा.
पण तुम्हा- आम्हासारखा, तो वाढत्या वयानुसार'श्री..श्रीमान..राव..'झाला नाही.सर्वांसाठी तो आजही "होम्याचं"आहे.वीस-पंचेवीस वर्षांपूर्वी, मी पाहिलेला व आज दिसणारा "होम्या" यात म्हणाल तर, फक्त 'उन्नीस-बीसचा फरक'. याअर्थी "होम्या"देवानंद या सदाबहार अभिनेत्यापेक्षाही चिरतरुण..


Courtesy:Unsplash-Lakshya Jain

आई-वडील, भाऊ-बहीण,ही रक्ताची नाती एकेकाळी जपणारा,आज रस्त्याने दिसणाऱ्या प्रत्येकात 'माणूस' शोधत फिरत असतो. त्याने 
रक्ताची नाती अजूनही जपून ठेवलीत.. त्याच्या हृदयाच्या बंदिस्त कप्प्यात..म्हणून कधी-कधी त्याची पावलं आपसूक वळतात,घराच्या दिशेने..इतर वेळी मात्र, "हे विश्वची माझे घर "असाच असतो त्याचा मुक्तसंचार....


Courtesy:Unsplash-Shail Sharma

सर्वसामान्यांसारखं, शिकावं, नोकरी-धंदा करावा, लग्न करून संसार थाटावा, असं चौकटीबद्ध आयुष्य कदाचित त्याच्या प्राक्तनी नसावं..म्हणून,'ऊन,वारा,पाऊस,थंडी'कशाचीही तमा न बाळगता,तो वर्षभर मोकळ्या आकाशाखाली बिनधास्तपणे वावरतअसतो.
गावातील कुत्र्यांशी त्याचं जिवाभावाचं मैत्र.अंधारात फिरताना,'साप,विंचू'त्याला चावतील तर मजाल..दिवसाच्या उजेडापेक्षा रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधाराशी त्याची खास दोस्ती..


Courtesy:Unsplash-Dynamic Wang

गावातलं,शेंबडं पोरंही तुम्हाला त्याची ओळख हिरहिरीने सांगेल,एवढी त्याची ख्याती.. लहान मुलं झोपत नसतील,तर "होम्या"येईल,झोप लवकर,जणू "होम्या"म्हणजे, शोले चित्रपटातला  गब्बर असल्यासारखा,त्याचा 'धाक' दाखवून लहान मुलांना झोपविणाऱ्या 'आया'गावात कमी नाहीत.अख्ख्या आयुष्यात, साधा मच्छरही न मारणाऱ्या "होम्याचं"नाव ऐकून लहान मुलं झोपतातचं कसे??हे मला कधीही न उलघडलेलं कोडं आहे.


Courtesy:Unsplash-Patric Hendry

हिमालयात न जाता,कुठलीही तपस्या-तप,न करता,विरक्त,आयुष्य जगणारा,"होम्या" एखाद्या 'योग्यापेक्षा'मला कमी भासत नाही.कारण, त्याला ना कशाचा मोह, ना कुठली अभिलाषा. त्याला कुणी हिणवल्यास,झिडकारल्यास,रागावतो तो काहीवेळेस..पण लगेच विसरूनही जातो.मानापमान,अहंकार,छद्मीपणा,या गोष्टी त्याच्यापासून कोसो दूर..त्याचा स्वतःचीच सुरू आहे मुक्तसंवाद ...वर्षानुवर्षे..तरी,कधीकाळी, हरवलेला "होमराज"अजूनही "होम्याला" गवसला नाही,हेही तितकंच खरं.. 


Courtesy:Unsplash-Parij Borgohain

गावात वाटलं त्या,घरी जावं,कुणी भाकरतुकडा दिला,तर तो खाऊन पुढची वाट धरावी.. 
चहाच्या टपरीजवळ किंवा पानटपरीवर तासनतास उगाचंच बसावं.. मग,कुणाला दया आल्यास,मिळतो त्याला घोटभर चहा व खर्रा.एवढीच काय ती त्याची चंगळ.इतरांचं अनुकरण करत,तोही चघळत बसतो, खर्रा बराचवेळ. त्यामुळं,मिळतं त्याला काही वेळापूरतं समाधान..आपणही'सर्वसामान्य'असल्याचं.गावात लग्न समारंभ व कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असल्यास,ती असते त्याच्यासाठी, मेजवानी.मग काय, जेवतो तो मनसोक्त, तृप्तीची ढेकर येईस्तोवर...


Courtesy:Unsplash-Richard Saunders

कधीकधी त्याच्या रक्ताच्या नात्यातले व गावातील संवेदनशील लोकं,देतात त्याची नखशिखांत आंघोळ घालून,तर कधी कुणी देतो त्याला,नवीन कापडं..कोणी कटिंग-दाढीचा खर्च करतात.मग काय,"होम्या"तुम्हाला गावात शोधूनही सापडायचा नाही."होमराज"म्हणाल तर मात्र लगेच सापडेल. एकेकाळी अभ्यासात गती असणारा,देखणा "होमराज"गावाला पुन्हा एकदा नव्याने भेटतो.परंतु "होम्याला"तो सापडत नाही.पुढे,दोन-चार दिवसात "होमराजला", "होम्या"पुन्हा कडकडून मिठी मारतो व "होमराज"पुन्हा एकदा,काही महिन्यांसाठी अंतर्धान पावतो.


Courtesy:Unsplash-Anna Vi

"होम्याला" कधी ताप-ज्वर आल्याचं,निदान मी तरी  ऐकलं नाही.आलाही असेल कधी,मात्र आपल्यासारखी दवाखान्याची पायरी त्याला खचितच चढावी लागते."होम्यासारखी" मानसिक संतुलन गमावलेली माणसं,गावा- गावात,शहरांत,खितपत पडलेली आपल्याला दिसतात.काहींना साखळदंडाने बांधून कोंडलं जातं, त्यांच्याच घरी,एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखं...कुणी दिसतो भररस्त्यात बेभान फिरतांना, तर कुणी एखाद्या पुलाशेजारी निचपत पडलेला दिसतो. कुणी साधत असतो ,अदृश्याशी संवाद.त्यांना स्वतःचं भान नसतं. मळक्या- फाटक्या,कपड्यात वावरणारी,वाढलेली दाढी व लांब,मेणचट केस असलेली,कधीकधी तर..डुकरांसोबत, उकिरड्यावर उष्ट फेकलेलं अन्न खाणारी...हाडामासाची माणसं 
आपल्याला अवतीभवती दिसतात.त्यातली काही अवलिया म्हणून समाजात पूजली जातात. पुढे त्यांची भव्य-दिव्य मंदिरं,दर्गे बनतात. स्वतःच्या आयुष्याचा अर्थही न गवसणाऱ्यांच्या,प्रवचनांची,उपदेशांची पुस्तकं बाजारात येतात. खिशात दमडी न बाळगणार्‍यांना लोकं,लाखोंची देणगी,हयात असताना व नसतानाही देतात. दुसरीकडे, त्यांचे बांधव,दोन वेळेच्या जेवणासाठी व अंगभर कपड्यांसाठी,फकिराचंं जिणं जगत असतात.व "मूकनायक"बनून आपल्याला सांगत असतात,जीवनाचा खरा अर्थ..

 

Courtesy:Unsplash-K.Mitch Hodge

आजच्या घडीला,जगात जवळपास पंधरा टक्के लोकसंख्या, शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंग असणाऱ्यांची आहे.भारत सरकारने अपंगांसाठीच्या UNCRPWD(Convention on 'Rights of person with disability') या संयुक्त राष्ट्रांच्या कराराला 2007 मधे मान्यता दिली.शिवाय, अपंगांसाठी PWD(Person with disability)act 1995,व संशोधित कायदा,(Revised),RPWD act, 2016, पारीत करून शारीरिक व मानसिकरित्या अक्षम असणाऱ्या व्यक्तींच्या हक्क व अधिकारांची त्यात तरतूद केली आहे.असे असले तरी,खासकरून, मानसिकरित्या अक्षम व्यक्तींच्या समस्या, महिला,मागासवर्ग व अल्पसंख्यांकांपेक्षा गंभीर स्वरूपाच्या आहेत.कारण, त्यांना त्यांच्या,आजाराची व अधिकारांची काहीच कल्पना नसते.जगाच्या तुलनेत, आपण अशा लोकांसाठी आजतागायत फार काही भरीव करू शकलेलो नाही.आज या सर्वांसाठी सामाजिक व शासकीय पातळीवर तात्काळ उपाययोजना करणे,गरजेचे झाले आहे.                                    असे असतांना,आपण मात्र होम्यासारख्या लोकांचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार अजूनही पदोपदी नाकारत असतो..त्यांच्यातल्या माणसाला व त्यांच्या कुटुंबाला गरज आहे,मायेची,सहकार्याची व खंबीर पाठिंब्याची.कारण, समाज म्हणून आपल्याकडून त्यांच्या कुटुंबाची कळत - नकळत,अवहेलना झालेली असते.त्यांच्या कुटुंबाने अनंत संकटांचा मुकाबला केलेला असतो.त्यांच्या कष्टांची व संघर्षाची आपण कल्पनाही करू शकत नाही.म्हणून,संविधानाने दिलेला समानतेचा अधिकार जर आपण समाज म्हणून अशा, व्यक्तींना देऊ शकलो तर यापेक्षा उत्तम कार्य दुसरं असू शकत नाही.

To watch "Homya",do visit my youtube channel-Glocal Marathi,at link below


मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

Cycology




 'सायकल ' शब्द उच्चारताच ,नकळत आपण भूतकाळात जातो.आठवतात आपल्याला,सायकलच्या सीटमागे असणारी सिनेमांची नावं..तिचा तो साजशृंगार..व सायकल मालकाची ती ऐट... ..सारंच कसं आता घडल्यासारखं...गावाकडच्या जुन्या बनावटीच्या जेन्ट्स व लेडीज सायकलला आम्ही 'बाजीराव -मस्तानी'म्हणायचो,हेही आठवतं..व आठवतात, 'सायकल चालवणे'शिकतांना घडलेले अपघात...अपघातही एक नाही तर अनेक...त्यांच्या तऱ्हाही निराळ्या...शिवाय आई-वडिलांच्या हातचा खाल्लेला मार वेगळाच...असे प्रसंग तुम्हा-आम्हा,सर्वांच्या जीवनात कमी-अधिक प्रमाणात घडलेले आहेत, हे मात्र नक्की.सायकल शिकताना अपघात न घडलेला,स्वतःचे हात-पाय न मोडून घेणारा,नाहीच काही तर,सायकलवरनं पडून 'हातापायाला खरचटलं' असे न म्हणणारा,जगात शोधुनही सापडायचा नाही. मला वाटतं, आपण जर एवढ्यांदा सायकलवरनं पडलो तर,सामान्यजनांसाठीसायकलरूपी स्वस्त, पर्यावरणपूरक, प्रवासाचं साधन निर्माण करणारा अवलिया, 'मॅकमिलन' सायकल तयार करताना, कितीदा खाली पडला असणार??याची गणतीच नाही.


सायकलच्या इतिहासाचा धांडोळा घेतल्यास,आपल्याला समजतं,की,दोन चाकं मागे-पुढे जोडून सहज चालू शकतात,ही कल्पनाच मुळी किती अद्भुत व अचाट होती. त्यामुळे सायकलचा शोध हा विमानाच्या शोधापेक्षा कमी नाही,असे मला नेहमीच वाटत आले आहे. 



एवढं सगळं, सायकलपुराण सांगायचं कारण म्हणजे,कोरोना विषाणूच्या महामारीमुळे ,पुन्हा एकदा गरीब, बिचाऱ्या, सायकलकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.लॉकडाउन ते अनलॉक, या कालखंडात सायकलचा खप पाचपट वाढल्याचे,अनेक जाणकार व्यक्तींच्या तोंडून आम्ही आमच्या, कानांनी ऐकलं आहे.एक वेळ नव्या-कोर्‍या 'पल्सर' गाडीकडे कुणी ढुंकूनही बघणार नाही. मात्र ,एखादी 'रेसिंग  सायकल' रस्त्याने कुणी चालवताना दिसल्यास, सामान्यांच्या नजरा,त्या सायकलवर खिळल्याशिवाय राहत नाही.असा अनुभव अनेकांना आला असेल,यात मला तिळमात्र शंका नाही.         
फिटनेस मिळवण्याचं,स्वस्त व आरोग्यदायी,साधन म्हणून संपूर्ण जग आज सायकलकडे बघत आहे.युरोपीय देश,अमेरिका ,चीन यांनी केव्हाच सायकलला स्वीकारले आहे. आम्ही मात्र गरीब देश असूनही, बुलेटने 'धुरळा'उडवीत आहोत. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या महापौरांनी नागपूरमध्ये 'डेडिकेटेड सायकल ट्रॅक' तयार करणार असल्याची व नागपूर शहराला 'सायकल कॅपिटल ऑफ इंडिया 'करण्याची घोषणा केली. पुढे या घोषणेचं काय होईल, ते काळच सांगेल.तूर्तास कुणाला येवो न येवो ,सायकलला मात्र "अच्छे दिन"आले आहेत,हे नक्की.


सहज वाटलं, आपणनही या 'सायकल अभियानात'आपला खारीचा वाटा उचलावा,  म्हणून आम्ही,मित्रांनी सायकलने एक लांब रपेट मारण्याचे ठरविले.मग काय,आदल्यादिवशी नियोजन केले व दुसऱ्या दिवशी सकाळी मोहगाव( झिल्पी) डॅमकडे जाण्याचे ठरले. दुसऱ्या दिवशी सकाळी जवळपास साडेसहा वाजता सगळ्यांनी आपापल्या सायकली काढल्या व घरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहगाव (झिल्पी )येथे जाण्यासाठी बायपास रोडवर  भेटलो.

एका टपरीवर नागपूरच्या प्रसिध्द 'तर्री पोह्याचा'आस्वाद घेतला व त्यानंतर कडक,वाफाळलेला चहा घेऊन मोहगावच्या रस्त्याने मार्गस्थ झालो.                                                                     


हिंगणा-मोहगाव रस्त्याच्या दुतर्फा, बागायती शेती,संत्र्यांच्या बागा व अनेक फार्म हाऊसेस असल्याने,तसेच रस्ता नव्याने तयार झालेला असल्याने ,सायकलिंग करण्यात वेगळीच मौज वाटत होती. मधे थांबत, बसत, गप्पागोष्टी करत, आम्ही पुढे जात होतो.कारण आमची ना कुणाशी स्पर्धा होती,ना आम्ही 'व्यावसायिक सायकलपटू' होतो.आम्ही होतो,हौशी सायकलपटू.सायकलीही बहुतेकांकडे साध्याच होत्या.पण उत्साह मात्र 'खास' होता.                               

लोकं पन्नास -शंभर किलोमीटर सायकलिंग करतात,आपण नाही तेवढे,पण दहा किलोमीटर तर जाऊच शकतो,असा विश्वास सर्वांच्या ठायी होता.पंधरा वर्षे या एकाच रस्त्याने नोकरीनिमित्त अपडाऊन केले असल्याने, रस्ता तसा नेहमीचा 'परिचित' होता. परंतु,सायकलने या रस्त्याने होणारा आमचा हा   'पहिलाच' प्रवास असल्याने,रस्ता जणू नव्याने आपली ओळख करून देत  असल्याची अनुभूती आम्हा सर्वांना येत होती.


   




 

 मजल- दरमजल करत मोहगावला पोहचलो.गाव ओलांडल्यावर आम्हाला, झिल्पी डॅम व मोहगावच्या दरम्यान ,तेथील स्थानिक युवकाने "आसरा"नावाचं एक नवंकोरं फॅमिली रेस्टॉरंट सुरु केलेलं दिसलं.सकाळची वेळ असल्याने ते बंद होतं, मात्र त्या रेस्टॉरंटचा थाट काही औरच होता.हिरवाईने नटलेल्या टेकडीच्या पायथ्याशी, अतिशय सुसज्ज, नीटनेटके व देखणे असे हे रेस्टॉरंट, पर्यटकांना नक्कीच खुणावत असणार,याची मनोमन खात्री पटली. शिवाय, इथे अस्सल गावरान जेवण व नाश्ता मिळतो,असे विचारपूस केल्यावर कळले.पुढे कधीतरी येथील जेवणाचा आस्वाद घेऊ,असे मनाशी ठरवून आम्ही झिल्पी डॅमच्या वाटेने जाऊ लागलो.                           


 दरम्यान, रस्त्याच्या कडेला विदर्भातील पाहिले 'डेट्स फार्म'अर्थात 'खजुराची शेती'दिसली.ही शेती 'थंगावेलू'आडनाव असणाऱ्या 'साऊथ इंडियन'माणसाची होती,हे कळल्यावर त्याचे विशेष कौतुक वाटले.कारण, आम्ही 'मराठी माणसं' गावची वेस ओलांडताना हजारदा विचार करतो. इथे मात्र,एक दक्षिणेतला माणूस नागपूर सारख्या शहरात,त्यातल्या त्यात एका खेड्यात येऊन,विदर्भात किंबहुना महाराष्ट्रात खजुराच्या शेतीचा पहिला प्रयोग काय करतो,तसेच 'ऍग्रो टुरिझम'सारख्या संकल्पना,शेतकरी आत्महत्या होणाऱ्या विदर्भात यशस्वीपणे राबवतो, हे सगळंच अचंबित करणारं आहे.             

 पुढे,काहीसा चढाई असलेला मार्ग मागे सारून आम्ही आमच्या "डेस्टिनेशन"ला पोहोचलो. नेहमीप्रमाणे इथेही फोटोग्राफी करण्यास आम्ही अजिबात कसूर केली नाही.                                       

डॅमच्या बाजूने, "मैत्रबन"या वृद्धांच्या निवासी ग्रामकडे जाणाऱ्या रस्त्याने आम्ही डॅमचं बॅकवॉटर बघत पुढे जात होतो.या परिसरात आम्हाला नागपूरच्या मोठया राजकीय पुढाऱ्यांचे फार्म हाऊस असल्याचे कळले.तसेच या परिसरात लवकरच सिद्धिविनायक मंदिराचं निर्माण कार्य सुरू होणार असल्याचे समजले. इथे आम्ही मंदिराच्या कारागिरांशी संवाद साधला.

       



आता आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.रस्त्याला उतार असल्याने हा प्रवास जलदगतीने होत होता.प्रवासाचा काहीसा क्षीण जाणवत होता,पण उत्साह अजूनही कायम होता.पुढच्या टूरचे नियोजन करीत,कधी आम्ही हिंगणा बायपासजवळ पोहोचलो, आमचे आम्हालाच कळले नाही.परत इथे,गरमागरम समोस्यावर आम्ही ताव मारला, चहा घेऊन,सर्वांनी आपापल्या घरची वाट धरली.

     


 या प्रवासात,'आनंद' हा पैशाने विकत घेता येत नाही,हे प्रकर्षाने जाणवलं.जीवनातल्या साध्या, सोप्या वाटणाऱ्या गोष्टींत लाखमोलाचा आनंद व आभाळभर सुख दडलेलं असतं,आपण मात्र ते घेण्यात कमी पडतो, हेही अनुभवलं. मोठमोठ्या कार ड्राईव्ह करून, जे थ्रील तुम्हा-आम्हाला येणार नाही,ते थ्रील सायकलिंग तुम्हाला देते,असे म्हणणे अतिशयोक्ती नाही,याची प्रचिती स्वतः अनुभवल्यावरच आली.म्हणून,कोरोना महामारीच्या निमित्ताने,पुन्हा एकदा जीवनाकडे डोळसपणे पाहूया व जीवनाच्या छोट्या छोट्या क्षणांना भरभरून जगुया,धन्यवाद.
To watch our more cycle stories,do visit,my youtube channel,Glocal Marathi,at link below



रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

मिहान

Courtesy:Unsplash-Alka Jha

 मी उमेश,'देवळी' या गावचा.माझं गाव तसं जुनं.अगदी ब्रिटिश काळापासून त्यानंआपलंअस्तित्व व रूप जपलेलं.

नागपूरपासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असूनही शहरीकरणाचं वारं न लागलेलं.गावचा रस्ता म्हणाल तर वीस वर्षांपासून जसाचा तसा.त्यात तसूभरही सुधारणार नाही.किंबहुना दिवसेंदिवस त्याची अवस्था वाईट झालेली.गावची लोकसंख्या बरी असल्यामुळे व परिसरातील प्रमुख गाव असल्यामुळे गावाचे राजकीय महत्त्व फार जास्त. पण या राजकीय शक्तीचा गावाच्या विकासासाठी म्हणाल तर वापर शून्य.

महाराष्ट्रातील सर्वसाधारण गावासारखं 'देवळी' हे  माझं गावं.

       

Courtesy:Unsplash-Madhuvan Yadav

गावाचं हेच रूप आजपर्यंत मी डोळ्यात साठवून होतो.कामानिमित्य बरीच वर्षे पुण्याला असल्यामुळे मी गावाला आलो नव्हतो. आज 'नागपूर-पुणे'सुपरफास्ट ट्रेनने नागपूरला पोहोचलो.रेल्वेस्टेशनच्या बाहेर येताच सायकल रिक्षाने बर्डी बसस्टॉपवर आलो.तेथून देवळी मार्गाने जाणाऱ्या बसमध्ये बसलो, तिकीट काढली.बस नागपूर शहराबाहेर येतांना, 

मी नागपूरचं बदललेलं रूप पाहून थक्क झालो.

Courtesy:Unsplash-Jani Godari

"उगाच आपण इतकी वर्षे पुण्याला घालवली.", असं नकळत माझ्या मनात आलं. "देर आये दुरुस्त आये"असं मनाला सांत्वन देऊन, गाव येण्याची वाट बघू लागतो.

           देवळीकडे जाणाऱ्या फाट्यावर बस थांबली.मी बसबाहेर उतरलो.तिथे ऑटोची वाट बघू लागलो.कारण या फाट्यावरून मला देवळीला जायचे होते. ऑटो निघायला उशीर होता. ऑटोचालक दहा-बारा सीट मिळाल्याशिवाय ऑटो पुढे नेणार नव्हता.म्हणून मी,पायीच गावचा रस्ता धरला. काही वेळ चालल्यानंतर,अचानक एक बाईकस्वार माझ्या बाजूला येऊन थांबला. "असेल कुणीतरी?"म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं.तो मात्र माझ्याकडे निरखून बघत होता.मी पुन्हा एकदा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण तो आता माझ्याशी नक्कीच बोलणार, असं मला त्याच्या चेहऱ्यावरून वाटलं. झालंही तसंच.तो म्हणाला,"उमेश ना तू ?"मी होकारार्थी मान डोलावली.मीही त्याची ओळख आठवू लागलो. 

     थोड्या वेळानंतर आठवलं,की तो गावात, माझ्या मित्राच्या घराशेजारी राहणारा, प्रकाश होता. त्याच्याकडे पाच-दहा एकर कोरडवाहू शेती होती, मात्र त्यातून फारसे उत्पन्न हाती येत नव्हते.म्हणून त्याची व त्याच्या कुटुंबीयांची सारी भिस्त दुधाच्या धंद्यावर होती.प्रकाशची ओळख पटल्यानंतर त्याच्याशी औपचारिक गप्पा केल्या.

"चल माझ्यासोबत,तुला सोडून देतो गावापर्यंत, रस्त्यात बोलणंही होईल." प्रकाश म्हणाला. मी लगेच तयार झालो व  त्याच्या बाईकवर बसलो. "कुठुन येतआहेस तू ?","सध्या काय करतोस?",  प्रकाशने मला  विचारलं.हा प्रश्न तसा अपेक्षित होताच.मी म्हटलं,"मी पुण्याला एका खाजगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतो, झालेत आठ-नऊ वर्ष,गावाला थोडं काम होतं ,म्हणून इथे आलोय"."बरं आहे". प्रकाश म्हणाला. औपचारिकता म्हणून मी त्याला विचारलं ,"तू कुठे काम करतोस,प्रकाश?"त्यावर तो म्हणाला, 

"मी नागपूरला कामाला जातो,परंतु मला वेळेचं काही बंधन नाही. पगाराचं म्हणशील,तर त्याची काही लिमिट नाही". प्रकाश म्हणाला. मला आश्चर्य वाटलं, की हा असं कोणतं काम करतो की याला वेळेचं व  पगाराचं बंधन नाही? 

अनलिमिटेड पगार देणारी कोणती नोकरी या सातवी नापास पोराला मिळाली? गाई-म्हशींच्या मागे फिरणारा हा, आज इतक्या मोठमोठ्या गोष्टी कशा काय करतोय? यासारखे अनेक प्रश्न माझ्या मनात पिंगा घालू लागलेे.उत्सुकतेपोटी मी त्याला आणखी विचारलं,"प्रकाश तरी किती हजार महिना पगार मिळतो तुला ?"प्रकाश म्हणाला,"कधी पंधरा ,कधी चाळीस हजार, कधी लाख रुपये महिना,माझी कमाई आहे".आता तर नक्कीच हा थापा मारतोय, असे मला वाटले.ठीक आहे, ऐकूया गाव येईपर्यंत याच्या थापा, आपलंही तेवढचं मनोरंजन.म्हणून मीही त्याच्या प्रत्येक गोष्टीला दुजोरा देऊ लागलो. 


 "उमेश तू किती कमावतो महिन्याला पगार?" अशी गुगली प्रकाशने टाकली.त्याच्या लाख रुपयांपुढे मी माझा पगार सांगणं,मला क्षणभर संकोचल्यासारखं वाटलं.'सातवी नापास लाखोंनी पैसा कमावतोय व आपण ग्रॅज्युएट असून, पंधरा हजारात घासतोय आठ वर्षापासून..'मन घट्ट करून त्याला सांगितलं, 

"पंधरा हजार रुपये फक्त ,मिळतात मला महिन्याला". 'फक्त 'यासाठी ,कारण गावापासून सातशे-आठशे किलोमीटर अंतरावर राहून 

हजारात कमावणारा मी व गावातच राहून लाखोंची कमाई करणारा प्रकाश,दोघांच्या कमाईत जमीन अस्मानाचा फरक होता. त्याच्या वागण्यात एक वेगळीच ऐट मला दिसत होती.श्रीमंती माणसाला आत्मविश्वास देत असते,पण तो नैतिक आत्मविश्वास नसून पैशांचा, क्षणिक आत्मविश्वास असतो,हे मला ठावूक होते.हाच आत्मविश्वास प्रकाशच्या ठाई मला दिसत होता.

"तुझा मित्र अजय,कुठे नोकरीला आहे ?त्याने इंजिनीअरिंग केलं होतं ना?" असा दुसरा प्रश्न प्रकाशने मला केला.हा इथेही अजयशी स्वतःची तुलना करणार,हे मला लगेच समजलं.

"अजय मुंबईला 'एशियन पेंट'या पेंट कंपनीत केमिकल इंजिनीयर आहे.कमावतोय साठ-सत्तर हजार रुपये महिन्याला".मी त्याला उत्तर दिलं ."फक्त साठ-सत्तर हजार !मग अजयही माझ्यापेक्षा कमीच कमावतोय की."प्रकाश म्हणाला."माझ्याकडे बघ.मी कसा प्रॉपर गावी राहून, मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत राहून, तुम्हा दोघांपेक्षा जास्त यशस्वी आयुष्य जगतोय,असे नाही का वाटत तुला?" पुन्हा एकदा प्रकाशने स्वतःचं गुणगान केलं.' पैसा म्हणजे यश. ज्याच्याजवळ जास्त पैसा ,तोच खरा यशस्वी. मध्यमवर्गीय व कष्टकरी मजूर हे तर या दुनियातले सर्वात अयशस्वी व निरुपयोगी जीव. नाही का?आपणही त्यातलेच. प्रकाश मात्र यांच्या पलीकडचा.असंच काहीसं, प्रकाशच्या 'भौतिकवादी'बोलल्याने ,काही क्षण माझं मत झालं. बालपणी शाळेत शिकलेली मूल्ये पाठ्यपुस्तकात बंदिस्त झालेली मला दिसली. हाच निकष सर्वांना लावला, तर महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस.. एवढेच नाही तर आजच्या काळातील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम.. यांच्यासारखे महान व्यक्ती यशस्वी कुठे ठरतात?? पैशानेच यश मोजायचे झाल्यास, बिल गेट्स,अंबानी, टाटा,बिर्ला.. एवढेच बोटावर मोजण्याइतके आजवरचे यशस्वी जीव.पण नाही, हे वास्तव नाही. 'जगात यशस्वी होणे म्हणजे सुखी-समाधानी आयुष्य जगणं.' मग खरचं, प्रकाश सुखी, समाधानी आयुष्य जगतोय का ??जरा डोकावून पाहायलाच हवं, नाहीतर त्याच्याशी तुलना करून  मला माझं आयुष्यचं निरुपयोगी व टाकाऊ वाटायचं.

म्हणून मी प्रकाशच्या खासगी आयुष्याची सखोल चौकशी करण्याचे ठरवले. 

 



Courtesy:Unsplash-Deepak Kumar

मी प्रकाशला म्हटलं ,"प्रकाश,तू नागपुरला व गावाला नेमकं कोणतं काम करतोस?", त्यावर प्रकाश म्हणाला,"मी प्रॉपर्टी एजंट आहे. साध्या शब्दात सांगायचं झाल्यास, मी एक दलाल आहे.मिहानमुळे आपल्या गावातील जमिनींचे भाव गगनाला भिडले .मोठमोठाल्या शहरातील 'पार्ट्या',(श्रीमंत लोकं) आपल्या गावातील जमिनीत गुंतवणूक करायला उत्सुक होत्या.

मी फक्त आपल्या गावातील शेतकर्‍यांना,त्यांची शेती बड्या पार्ट्यांना विकायला प्रवृत्त केलं. 

जमिनीला 'वीस ते पन्नास लाख रुपये एकर 'या दरम्यान किंमत मिळवून दिली.दोन्ही पक्षांकडून 2% ने मला कमिशन मिळालं. यात मी लाखोंची कमाई केली व अजूनही करीत आहे.गावातील कास्तकारही खुश आहेत.कोरडवाहू जमिनीत राब-राब राबून,पुरेसं उत्पन्न न देणाऱ्या जमिनीला,लाखोंचा भाव मिळाल्यामुळे, 

ते धडाधड शेती विकत आहेत. यात माझ्यासारख्या दलालांना भरपूर पैसा मिळाला. मी माझी शेतीही अशीच विकली. वर्धा जिल्ह्यात वीस एकर ओलिताची शेती त्याच पैशात घेतली. बघ ,मला तरी निदान यात तोटा दिसत नाही. माझ्याकडे बघून आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांनी, मला शेती विकून देण्यासाठी आग्रह धरला.मी माझी शेती ज्या पार्टीला विकली,त्याच पार्टीकडे शेतकऱ्यांच्या शेतीचा सौदा केला.शेतकऱ्यांना बक्कळ पैसा मिळवून दिला व मीसुद्धा लाखोंची कमाई केली.यात वावगे ते काय? मला सांग." प्रकाशला मी उगाचच म्हटलं ,"काहीच नाही.अजिबात वावगं नाही."                                                    "तर बरं ,सर्व शेतकऱ्यांनी असं केलं नाही.काही बसलेत आपल्या मातीला चिकटून. तूच बघ, आज त्यांची दशा काय आहे ?त्यांना दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण आहे आणि शेती विकलेले बघ,कसे बंगल्यासारखा घरात राहत आहेत.फोर व्हीलर, मोबाईल, टीव्ही, फ्रिज ई.सर्व चैनीच्या वस्तू त्यांच्याकडे आहेत. काम काहीच करीत नाहीत .मस्त मौज करीत आहेत. दररोज ते तुला बियरबार नाहीतर ढाब्यावर नक्कीच भेटतील. त्यांची मुलेही सीबीएसई शाळेत शिकत आहेत. सर्व काही आलबेल आहे. ते सोड, माझ्याकडे बघ काय होते? गाई-म्हशींच्या मागे हिंडायचो.आज,दोन  फोर- व्हीलर,मोठं घर,वर्धा जिल्ह्यात 20 एकर ओलिताची शेती लाखोंचा बँक बॅलन्स, सर्वकाही आहे .ही सगळी मिहानची कृपा म्हणायची."प्रकाश म्हणाला.                 "आपल्या गावासाठी 'मिहान' म्हणजे चमत्कारच म्हणायला पाहिजे .जादूची कांडी फिरवावी तसा बदल यामुळे आपल्या गावात झाला. याआधी,दोन-चार तुमच्या सारखी पोरं, शिकून नोकरीवर लागायची.बाकीचे आपलं संपूर्ण आयुष्य शेतात राबत घालवायचे.खरचं, हा न्याय होता का ?"प्रकाश म्हणाला. 

मी निमुटपणे त्याचे शब्द कानात साठवत होतो. 

'जगात बेकायदेशीर काम करूनआत्मविश्वासाने जगणारे कमी नाहीत. आपल्या पापांचं,एवढं उघड प्रदर्शन करणं,त्यांना जमत तरी कसं ?आम्हाला तर आमच्या खऱ्या गोष्टींचेही समर्थन करणे जमत नाही. पुन्हा एकदा आपण सर्वसामान्य असल्याची मला जाणीव झाली. पण असेही लोकं सामान्य असतात ना?मग ते असामान्य असल्याचा आव, थोडे पैसे आल्यानंतर का आणतात?? मानव हा दानव कसा होतो? हे त्याचे त्यालाच कळत नाही.पैसा संवेदनांना मारून टाकतो.हे मला प्रकर्षाने जाणवू लागले.मिहानचे कित्येक राजकीय पक्षांनी व त्यांच्या पुढाऱ्यांनी भांडवल केले.मात्र आजतागायत मिहान प्रकल्प पूर्ण झाला नाही.तिकडे मात्र मिहानचे भूत, खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेले मला दिसले.     

Courtesy:Unsplash-Femker Ongena

गावाजवळची जमीन 

दलालांनी 'बिल्डर व लँड डेव्हलपर्स'यांच्या घशात ओतली. शेतकरी लाखो रुपये घेऊन खूश झाले. काही लुबाडले गेले, काही नागवले गेले,काही सुखी झाले, काही दुःखी झाले. ही सारी प्रॉपर्टी एजंट व बड्या पार्ट्यांची,तसेच मिहानची कृपा.कोणाच्या शेतीला वीस लाख रुपये, कुणाच्या तीस लाख,तर कुणाच्या शेतीला चाळीस लाख रुपये एकरी,असा भाव मिळाला.आपल्या शेजारच्या शेतकऱ्यांपेक्षा आपल्या शेतीला कमी भाव मिळाला म्हणून काहीजण पश्चाताप करू लागले .जास्त भाव मिळालेले,आणखी जास्त भाव मिळाला नाही म्हणून आणखी पश्चाताप करू लागले .शेवटी काय,सारेच अतृप्त.मिहानने, गावातील काही बेरोजगारांना एजंट बनवून श्रीमंत केलं. त्यांच्याजवळ सर्व चैनीच्या वस्तू आल्या .

 त्यांनी आपल्या गावातील,आपल्याच नात्यातील- मैत्रीतील- संबंधातील ,लोकांना लुबाडले ,लुटले, एवढेच नाही तर,अक्षरशः ओरबडले. त्यांनी शहरातील लँड डेव्हलपर्सना यासाठी मोलाची मदत केली. असे दलाल,पैसा म्हणजे यश, पैसा म्हणजे सुख, पैसा म्हणजे समाधान,मानू लागले .प्रत्येकाशी आपल्या पैशाने तुलना करू लागले. वरकरणी सुखी दिसणारे मात्र आतून अतृप्तच राहिले. प्रकाशही या साखळीतला एक .मिहानने त्याला भरभरून दिलं, पण त्याने पोशिंद्या शेतकऱ्याला देशोधडीला लावलं. मिहान,हे विदर्भासाठी वरदान आहे की माहीत नाही मात्र ही पैशाची तहान आहे, हे  मला प्रकाशकडे पाहून वाटलं .

अश्यात,गाव आलं,मी प्रकाशला गाडी थांबवायला लावली. 

"अरे,थांब,थांब.माझं घर आलं",असे म्हणून मी खाली उतरलो .

"बरं मी निघतो आता. मला रामभाऊकडे जायचं आहे .तो शेती विकायची आहे ,असे म्हणत होता." प्रकाश म्हणाला."अरे ,घरीतरी ये."मी त्याला म्हटलं .

"नाही ,पुन्हा कधी येईल." असं म्हणून ,

तो रामभाऊला भेटायला निघून गेला .

 

Courtesy:Unsplash-Jordan Opel

  दहा-बारा दिवसानंतर..., 

आज मी पुण्याला परत जाणार होतो. 

गावातलं काम झालं होतं. बसस्टॉपवर बसची वाट बघत उभा होतो. 

तेवढ्यात,दुरून ,प्रकाश येतांना दिसला .

मी दिसताच, तो माझ्याकडे आला." पुण्याला जातोय वाटतं." मी ,"हो "म्हटलं .

"बरं ,जमल्यास ये पुन्हा गावाला". प्रकाश म्हणाला .

"आता मी घाईत आहे.मला रामभाऊच्या शेतीचा सौदा करायला जायचा आहे .पार्टी वाट बघत आहे.येतो ,भेटू पुन्हा"असं म्हणत प्रकाशने मला निरोप दिला.

त्याचं बोलणं ऐकून 

मी काही वेळेसाठी बेचैन झालो ."आज पुन्हा एकदा 

एक शेतकरी फसविला जाणार..!"...

"रामभाऊचा  व त्याच्यासारख्या शेतकऱ्यांचा मिहानने खरंच विकास झाला का??"हा प्रश्न मात्र आजतागायत अनुत्तरीत आहे....??


सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

स्वदेस

 

Courtesy:Unsplash-Antoine-pluss-Msk

मित्रांनो,                   
एकेकाळी 'गाव'ही एक स्वतंत्र अशी व्यवस्था होती.ज्यात गावातील प्रत्येक घटक परस्परांवर अवलंबून असायचे.मात्र ब्रिटिशांचे दीर्घकाळ असलेले शासन व जागतिकीकरणाच्या रेट्याने ही व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली. व गावातून माणसांचे लोंढेच्या लोंढे शहरांकडे रोजगारासाठी जाऊ लागले.यामुळे झालेले बरे-वाईट परिणाम, आज आपण अनुभवत आहोत.     
Courtesy:Unsplash-Sylvester- desouza

कामधंद्यानिमित्य,आपण आज, जगाच्या कोणत्याही भागात स्थायिक झालो असलो तरी,"गड्या,गाव आपुला बरा!"याची प्रचीती आल्यावाचून राहत नाही."आपली माती-आपली माणसं",नेहमी आपल्याला खुणावत असतात. असाच योग आम्हा मित्रांना आला.


आमचे ज्येष्ठ मित्र व मार्गदर्शक,यांचं गाव.. 'बिछवा'..,
या गावी जाण्याचा.नाव वाचून दचकून जाण्याचं कारण नाही.नाव 'बिछवा'असलं तरी, त्याचा साध्या सुईशीही संबंध नाही,  एवढं मात्र खरं!


नागपूर जिल्ह्यातील 
सावनेर तालुक्यात,खेकडानाला परिसरात, जंगलकपारीत वसलेलं हे टुमदार गाव.'खापा'गावानजीक असलेल्या 'बडेगाव'या गावापासून जेमतेम आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेलं.अगदी एम.पी.बॉर्डरच्या नजीक.

हिंगणा ते बिछवा'अंतर अंदाजे 75 किलोमीटर असल्याने, घरीच न्याहारी करून,आम्हा पाच मित्रांची टोळी,कारने सकाळी 9 वाजता, बिछव्याच्या वाटेने रवाना झाली.गाडीत जुन्या-नव्या गाण्यांचा,आस्वाद घेत, त्याचसोबत आमच्या ज्येष्ठ मित्राने 'स्टार मेकर'या ॲपवर स्वतः गायलेल्या सुमधुर गाण्यांच्या साथीने आमचा प्रवास सुरु झाला.                               

हिंगण्याहून 
वडधामना मार्गे,नागपूर -अमरावती हायवेवर,आम्ही अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात पोहचलोटोलनाका ओलांडल्यानंतर कळमेश्वर मार्गे 'मोहपा'शहराकडे जाणार्‍या रस्त्याने,रंगीबिरंगी फुलझाडांनी व विविध फळ झाडांनी नटलेल्या 'नर्सरींना'न्याहाळत व हिरवळीचा आनंद घेत,आम्ही मार्गक्रमण करीत होतो. काही मिनिटांनी आम्ही 'उबाळी'या गावी,

एका परिचिताच्या दुकानाजवळ थांबा घेतला. त्याने चहापाणी करून आमचे आदरातिथ्य केले. त्याच्याकडून आवश्यक साहित्य घेऊन व आमच्यासाठी काही संत्र्यांची व मोसंबीची रोपे नर्सरीतून आणून ठेवण्याचे त्याला सांगून,
आम्ही पुन्हा एकदा बिछव्याकडे वाटचाल करू लागलो.         

 
पुढे,'सावनेर','खापा'ही शहरे ओलांडत आम्ही 'बडेगाव'या गावी पोहोचलो. भूक लागली असल्याने कुठे नाश्त्याचे दुकान दिसते का? याचा शोध घेऊ लागलो. लागलीच एक नाश्त्याचं दुकान दिसलं.काय मिळतंय?म्हणून सहज विचारणा केली,तर तिथे गरमागरम समोसे आमच्या स्वागतासाठी हजर असल्याचे दिसले.आम्ही पाच पांडवांनी समोस्यांवर यथेच्छ ताव मारला.'बडेगाव' सारख्या दुरच्या गावी चाखलेल्या समोस्यांची चव काही औरच होती.ती कायम जिभेवर रेंगाळत राहणार, एवढे मात्र नक्की! नाष्ट्यानंतर,चहा प्यायचा असल्याने,त्या दुकानात विचारणा केली असता, समोस्यांचा खपच एवढा जास्त आहे की,त्याला चहा विकण्याची गरज वाटत नाही, असे दुकानदाराने सांगितले.मग त्यालाच चहाचे दुकान कुठे आहे?असे विचारले असता,दुकान बाजूलाच असल्याचे त्याने सांगितले. चहाच्या दुकानात चहाची ऑर्डर दिली.चहाच्या पहिल्याच घोटात तृप्त झाल्याचा आनंद मिळाला.नागपूर सारख्या शहरात अमृततुल्य चहाच्या नावाने सुरु झालेल्या बाजारूवृत्तीपेक्षा  बडेगावचा हा चहा कमी नाही असे राहून-राहून वाटले. बडेगावच्या अमृततुल्य चहाची किंमत केवळ पाच रुपये हाफ,अशी होती. 


                                 

 त्यानंतर पुढे,आम्ही बिछव्याच्या दिशेने रवाना झालो. मधे खेकडानाला परिसर असल्याने,तिकडे गाडी वळवली.रस्त्याने जाताना एमटीडीसी रिसॉर्ट,विविध ढाबे,हॉटेल्स, जणू आमच्या स्वागतासाठीच सज्ज असल्याचे जाणवले.डोंगर-दऱ्या,
आडवळणाच्या वाटा, पार करत आम्ही खेकडानाल्याजवळ पोहोचलो.खेकडानाल्याचे बॅकवॉटर आजूबाजूच्या गावांना पाणीदार करीत असल्याचे दिसून आले.

अतिशय नयनरम्य, वृक्षवेलींनी लगडलेला, हिरवाकंच, देखणा, असा हा परिसर.आम्हां हौशी फोटोग्राफरना फोटोसाठी आमंत्रित करू लागला. मग काय प्रत्येकजण एखाद्या फिल्मी नटाच्या भूमिकेत शिरला.       


मनसोक्त फोटोग्राफी केल्यानंतर 'बिछवा'या गावाकडे प्रवास सुरू झाला. अवघ्या काही मिनिटात आम्ही बिछव्याला पोहोचलो. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव, प्रत्येकाला त्याच्या गावाची, माणसांची,आठवण करून देत होतं.                         

 लगेच आम्ही 
गावाशेजारी असलेल्या आमच्या मित्राच्या शेतात गेलो. शेती कपाशीची होती.या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने व अवघ्या तीस वर्षानंतर पहिल्यांदा शेतीत पीक घेतल्याने,पऱ्हाटीची वाढ उत्तम झाली होती. पाचही जणांनी शिवाराला फेरी मारली.                                   

दरम्यान जुन्या-नव्या गाण्यांचा,आस्वाद घेणे सुरू होतेच. एवढ्यात धो-धो करत पावसाच्या सरी कोसळू लागल्या. आम्ही लगबगीने गाडीत बसलो.



पाऊस थांबल्यावर,आम्ही विठ्ठल-रखुमाईच्या मंदिराला भेट दिली.हे मंदिर १९६७ साली, बांधण्यात आल्याचे समजले.शिवाय, गावात या मंदिरात दरवर्षी मोठा सप्ताह आयोजित केला जातो,असे कळले.     

पुढे,मित्राच्या जुन्या घराला भेट दिली. तिथे कोणीच राहत नसल्याने घराची दुरावस्था झाली होती. घर अगदी मोडकळीला आले होते.मात्र, या वडिलोपार्जित वास्तूचा जीर्णोद्धार करणार असल्याचे आमच्या मित्राने आम्हाला सांगितले.

त्यानंतर गावातल्या एका परिचिताच्या घरी गेलो.त्याच्याकडे यापूर्वीच शेतातली ६.५ एचपी क्षमतेची मोटार आणून ठेवली होती. तिला पाईप जोडून विहिरीतून पाणी काढण्याचे प्रात्यक्षिक आम्हाला करावयाचे होते.


मात्र मोटार नवी असूनही काही केल्या सुरु होईना? आमचे अनेक प्रयत्न वाया गेले. नेहमीप्रमाणे गावात गर्दी जमली.प्रत्येकाने आपापले उपदेशाचे डोज पाजले.मात्र शेवटी, एका सभ्य गृहस्थाचा सल्ला कामी आला. एकदाची मोटार सुरू झाली.पण, ती पाणी काही बाहेर फेकेना? शेवटी,मोटार आहे त्या अवस्थेत ठेवून,दुसर्‍या दिवशी,बडेगावच्या मेकॅनिक कडून दुरुस्त करण्याचे निश्चित करून, आम्ही जवळपास रात्री सात वाजताच्या सुमारास आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो.



दरम्यान,भूक लागल्याने,'आपलं शिवार'या टुमदार, सुसज्ज अशा ढाब्यावर जेवणासाठी थांबलो.प्रत्येकाने,आवडीनुसार 'अंडाकरी''दाल-तडका' या व्यंजनांवर  मनसोक्त ताव मारून तृप्तीची ढेकर दिली. रस्त्यात पुन्हा एकदा 'बडेगाव'आमच्या स्वागतास हजर होतेच.तिथे रसरशीत मसाला पान खाल्ल्यानंतर,खरोखरचं,नावाप्रमाणे बडेगावात "बडेपणा"असल्याची जाणीव झाली. पुन्हा एकदा,' खापा -सावनेर' पार करत, 'उबाळी' येथे परिचिताकडे ठरल्याप्रमाणे थांबलो.नर्सरीतून आणलेल्या 'संत्र्याच्या-मोसंबीच्या' कलमा गाडीत ठेवल्या व रात्रीच्या काळोखात 'मंद-धुंद' गाण्यांचा आस्वाद घेत,हिंगण्याला कधी पोहोचलो, हे आमचे आम्हालाच कळलं नाही.                                
Courtesy:Unsplash-Provokar Pramanik

रात्री झोपी जाताना,या एका दिवसाच्या प्रवासाने काय मिळवलं? याचा क्षणभर विचार केला... तर जाणवलं..." आमची गावाशी,तिथल्या मातीशी,माणसांशी असलेली नाळ अधिकच घट्ट झाली होती.

Best of glocal marathi

गनिमीकावा

        गनिमीकावा संकटे बहु येतील, हरणे तुला ठाव नाही.. कोंडीत सापडाया, गड्या तू कुणाचा साव नाही..!!     भेटतील सरडे,      पदोपदी तुला रे.. ...