शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३

दिवाळी गावाकडची

 🎇दिवाळी गावाकडची



दिवाळी सणाची चाहूल लागताच,गावात घरोघरी साफसफाई व सारवणाची लगबग सुरू होते.घरातील स्त्रिया या दिवसांत जणू 'स्वच्छता अभियान' नेटाने राबवितांना दिसतात.पुरुषमंडळी आपापल्या परीने यात हातभार लावत असतात.पूर्वी चुन्याने घराच्या भिंती सारवल्या जायच्या.त्यानंतर डीसटेंपर व हल्ली पेंटचा सुद्धा यासाठी वापर होतांना दिसतो.एकंदरीत, गाव दिवाळीत स्वच्छ, लखलखीत व नवंकोरं झालेलं असतं.


गावाकडची दिवाळी ही खऱ्या अर्थाने असते कष्टकऱ्यांची.. शेतकऱ्यांची.यात शहरी बडेजाव व दिखाऊपणा नसतो.तर तो असतो, निसर्गाच्या संपन्नतेचा सोहळा. रूढअर्थाने  दिवाळी पाच दिवसांची असली, तरी अलीकडच्या काळात, लक्ष्मीपूजन, गायगोंदण व भाऊबीज, हे तीन दिवस नागपूर जिल्ह्यात विशेषत्वाने साजरे केले जातात.


 हिवाळ्यातली थंडी या दिवसांत स्थिरावलेली असते.ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने बच्चे कंपनीच्या आनंदाला उधाण आलेलं असतं. बाहेरगावी शहरांमध्ये नोकरीनिमित्त कामाला असणारे चाकरमानी, गावाकडची वाट धरतात. विदर्भात प्रामुख्याने कपाशीचे पीक असल्याने शेतातल्या पांढऱ्या सोन्याकडे बघून शेतकरी समाधानी आणि तृप्त झालेला असतो. इकडे शेतात कापूस वेचणीचा हंगाम असल्याने दिवाळीपूर्वी शेतमजुरांच्या हातात अल्पसा का असेना पैसा खुळखुळत असतो. वर्षभर कफल्लक आयुष्य जगणाऱ्या कष्टकऱ्यांच्या घरी हा दिवाळी सण संपन्नतेची स्वर्णीम लकेर घेऊन येत असतो. 


घरापुढच्या ऐसपैस अंगणात, सडा-सारवण करून सकाळी रांगोळी घातली जाते.वर्षभर एकाच रंगाची रांगोळी घालणाऱ्या स्त्रिया, दिवाळीच्या दिवसांत मात्र आवर्जून रांगोळीत विविध रंग भरतांना दिसतात. सायंकाळी तर अंगणात रांगोळी घालण्याची जणू स्पर्धाच लागलेली दिसते.कुणाची रांगोळी मोठी,कुणाची रांगोळी अधिक सुंदर,याची चर्चा गावातील तमाम स्त्रिवर्गात असते.


बहुतेक घरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, सर्वार्थाने दिवाळी सण साजरा केला जातो.गावात या दिवसाला "मोठी दिवाळी"असंही म्हटलं जातं.घरात असलेल्या पैशा-अडक्याची व दाग -दागिन्यांची पूजा निष्ठेने व श्रद्धेने केली जाते.लहान थोर नवीन कपडे घालून मिरवतात.घरात गोडधोड केलं जातं.यात प्रामुख्याने, कोहळ्याचे बोंडं,अनारसे,रव्याचे वा बुंदीचे लाडू, शंकरपाळे इत्यादींचा समावेश होतो. शिवाय चकल्या,शेव,चिवडा व तत्सम फराळी पदार्थांची रेलचेलही असते. जिभेचे सर्व लाड या दिवसांत पुरविले जाते. दारात व अंगणात दिव्यांची आरास मांडली जाते. संपूर्ण गाव दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते. आकाशातले तारेच जणू अंगणी विराजमान झाल्यासारखे भासतात.गावाकडच्या या दिव्यांच्या प्रकाशाची सर, शहरातल्या झगमगाटाला नाही,हे मात्र खरं.लहान मुलं,टिकल्या,रीळ, फुलझड्या तर मोठी मंडळी,लक्ष्मीबॉम्ब, सुतळीबॉम्ब,झाड,चकरी इत्यादी च्या साह्याने फटाके फोडून दिवाळीचा आनंद साजरा करतात. 


गायगोंदणाच्या दिवशी शेतकरी वर्ग घरातील दुभत्या जनावरांना गेरूने रंगवितात.पूजा करून त्यांची वाजत-गाजत  मिरवणूक काढली जाते. भाऊबीज हा दिवस,बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला दिवस.या दिवसाला गावात विशेष महत्त्व असते.लग्न झालेल्या गावातील मुली,माहेरच्या ओढीने सहकुटुंब गावात येतात.एकमेकांची ख्यालीखुशाली विचारली जाते. सुखदुःखाची देवाणघेवाण होते.बहीण भावाला ओवाळते.घरी लहान मुलांचा जणू कल्लाच असतो.आनंदाला उधाण आलेलं असतं.अनेक गावात मंडई उत्सव आयोजित केला जातो. करमणुकीचे कार्यक्रम, नात्यागोत्यातल्या, जुन्या जाणत्या मंडळींची भेट, घरोघरी पाहुणचार..असा भरगच्च आनंदोत्सव घेवून दिवाळी गावात येते."दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा"ही म्हण सार्थ करत,गावाकडची दिवाळी सर्व गावकऱ्यांच्या मनात आनंदाची पेरणी करून जाते,यात तिळमात्र शंका नाही.


     


Dt.10/11/2023

रविवार, १० सप्टेंबर, २०२३

घर

 🏠घर




उन्हाळ्याचे दिवस होते.मे महिन्यातली दुपारची वेळ होती. मी माझ्या घराच्या मागच्या दारात उभा होतो.माझी नजर घराजवळील रिकाम्या प्लॉटकडे गेली. तिथे काही माणसं हाती टेप, दोरी व चूना,घेऊन मार्किंग करताना दिसली.ती माणसं प्लॉटची मोजणी करत होती. तेवढ्यात एक बिल्डर कारमधून खाली उतरला.त्याने प्लॉटवर नजर फिरवली.माणसांशी थोडेफार बोलून तो त्याच्या कारमधून निघून गेला.त्यानंतर ती माणसं सुद्धा  त्यांचं काम आटोपून निघून गेली. 


यादरम्यान दुपार टळून गेली होती. सायंकाळी पाच-सहाच्या सुमारास मोजणी झालेल्या प्लॉट पुढील रिकाम्या जागेत, एका घराच्या भिंतीच्या शेजारी, बांबू, तट्ट्या व लाकडी बल्ल्या, घेऊन एक टेम्पो आला. थोड्याच वेळात तिथे एक बिऱ्हाड आलं. नवरा बायको व मुलगी असलेलं छोटसं कुटुंब. आल्या- आल्या, कुटुंबातल्या पुरुषाने, त्या रिकाम्या जागेवर खड्डे खोदायला सुरुवात केली. बांबू, बल्ल्या व तट्ट्यांच्या मदतीने, त्याने तासाभरात तिथे एक झोपडी तयार केली. तिकडे त्याच्या बायकोने, दिडेक वर्षाच्या मुलीला, आडोशाला निजवून, आपल्या गाठोड्यातून रात्रीच्या जेवणासाठी,आवश्यक जिन्नस बाहेर काढले.दगडांची चूल मांडली.काड्या गोळा केल्या.चुलीवर पातेले ठेवून ती पोटाची आग शमविण्याच्या कामाला लागली. काम करता-करता अंधार दाटून आला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसभर रखरखतं ऊन होतं.मात्र रात्री काहीसा थंड वारा वाहू लागला.


बिल्डरने आधीच भिंतीला इलेक्ट्रिक मीटर व पाण्यासाठी बोरवेलच्या मशीनचे कनेक्शन लावलेले होते.त्यामुळे झोपडीत लाईटची व्यवस्था झालेली होती. दिवसभराच्या प्रवासाने व कष्टाने तिनही जीव, निवांतपणे झोपडीत झोपी गेले. मी कुतूहलाने त्यांच्या हालचाली टिपत होतो.दुसऱ्या दिवशी त्यांनी काही तट्ट्या व कापडाच्या मदतीने आंघोळीसाठी एक आडोसा तयार केला.त्यांची झोपडी भरवस्तीत असल्याने व आजूबाजूला पक्की घरे असल्याने,त्या तरुण जोडप्याला लहानशा लेकरासोबत साप-विंचवाची पर्वा न करता, टीनाच्या छताखाली,भर उन्हाळ्यात राहावं लागणार होतं. त्यांच्यासाठी कदाचित ते नवीन नसावं.म्हणून ते तिघेही सहजपणे वावरत होते. मला मात्र राहून राहून त्यांचं अप्रूप वाटायचं.


दुसऱ्या दिवशी,सकाळी दहाच्या सुमारास एक कार झोपडीजवळ आली.गाडीतून बिल्डर, "राम.. ए राम.. " अशी हाक मारु लागला. झोपडीतल्या पुरुषाचे नाव राम आहे,हे माझ्या लगेच लक्षात आलं. राम बाहेर आला.बिल्डरने त्याला कामाविषयी काही सांगितलं.त्याने मानेनेच होकार दिला. बिल्डर निघून गेला. मोजणी झालेल्या प्लॉटवर जेसीबीने खड्डे करायला सुरुवात झाली. आता मजुरांची गजबज वाढू लागली. राम त्यांच्यासोबत काम करू लागला. 



त्याच्या बायकोने दिवसागणिक झोपडी नीटनेटकी केली.ती तिच्या मुलीला दिवसभर सांभाळायची. गरज पडल्यास, रामला मदत करायची. अशाप्रकारे त्यांचा उघड्यावरचा संसार सुरू झाला. हाहा म्हणता उन्हाळा पार पडला. इमारतीचे फाउंडेशन, पहिला स्लॅब, दुसरा स्लॅब पूर्ण झाला.चार मजली इमारत होणार असल्याने ही इमारत पूर्ण होण्यास अवकाश होता.

आता पावसाळा सुरु झाला. पाऊस धो-धो कोसळत होता. झोपडी शेजारी पाणी साचू लागलं. रिकाम्या प्लॉटवर गवत वाढू लागलं.रात्री बेडकांचा आवाज ऐकू येऊ लागला. अशा परिस्थितीत ते तीन जीव,साप -विंचवाची पर्वा न करता, खरबडीत जमिनीवर झोपून रात्र काढू लागले. काही दिवसांनी रामने एक लहानसा कुलर खरेदी केला. एक लोखंडी पलंग आणला. पावसाळ्यानंतर हिवाळा सुरू झाला.कडाक्याची थंडी पडू लागली.झोपडीमध्ये टिनाच्या छिद्रातून, तट्ट्यांमधून,बोचरे वारे आत येऊ लागले.अशाही परिस्थितीत, दिवसभर अंग- मेहनतीचे काम करून,चटणी -भाकर खाऊन, त्यांनी रात्रीच्या थंडीचा सामना केला. एव्हाना इमारतीचे चार स्लॅबच काम पूर्ण झाले.भिंती उभ्या झाल्या. राम सकाळी नऊ वाजतापासून इमारतीच्या भिंतीवर पाणी मारणे, बिल्डरने सांगितलेली, छोटी-मोठी कामे करणे इत्यादी कामे करायचा.


जणू ही इमारत नाही तर त्याचं स्वतःचं घर आहे, याप्रमाणे तो आपुलकीने काम करायचा.अधेमधे तो एकटक इमारतीकडे पाहत बसायचा. आता हिवाळा संपायला आला. इमारतीचे काम जवळपास पूर्ण होत आलं.इलेक्ट्रिक फिटिंग, प्लंबिंग, खिडक्या, दारं बसवून  झाली. गावाकडे काही काम असल्याने त्याने बायकोला व मुलीला गावी पाठवलं.आता तो इकडे एकटाच राहू लागला.त्याला एकटेपणा जाणवू लागला.


 बिल्डरने आता त्याला इमारतीच्या पार्किंगच्या जागेत राहायला सांगितलं.सबंध वर्षभर सांभाळलेल्या झोपडीवजा घराला मोडताना त्याला काहीच वाटलं नाही.अगदी सहजपणे इमारतीच्या पार्किंगच्या जागेत आडोसा तयार करून तो राहू लागला. हळूहळू इमारतीच्या पेंटिंगचं काम पूर्ण होत आलं.बिल्डर दररोज कामाची पाहणी करायला यायचा. रामही त्याच्यासोबत इमारतीला न्याहाळायचा.तो स्वतः मालक असल्याप्रमाणे इमारतीच्या बांधकामासंदर्भात बारीकसारीक बाबींकडे लक्ष द्यायचा. कालांतराने इमारतीचे काम पूर्ण झाले. त्यातले,आठही फ्लॅट विकले गेले. प्रत्येक फ्लॅटमध्ये एक-एक कुटुंब राहायला आलं. 

आता पार्किंग एरियात, चारचाकी, दुचाकी गाड्या उभ्या राहू लागल्या.पार्किंगची जागा अपुरी पडू लागली.आज पुन्हा एकदा बिल्डर आला.तो रामला म्हणाला," राम,लक्ष्मीनगरमे अपना नया काम शुरू हो रहा है. वहाके प्लॉट के पास, कल अपनी झोपडी बना लेना."




.. रात्रीच्या अंधारात लायटिंगने न्हाऊन निघालेल्या नव्याकोऱ्या इमारतीकडे डोळे भरून पाहत," हा! ठीक है." असं म्हणत, राम त्या रात्री इमारतीच्या पार्किंगच्या जागेत, नवीन झोपडी उभारण्याचा,विचार करता-करता, कधी झोपी गेला,त्याचं त्यालाच कळलं नाही.


      

शनिवार, १४ जानेवारी, २०२३

बादल व सुरज

 

Courtesy-Unsplash~Auron Burden

मी बँकेत कामानिमित्त गेलो असता, मला सतरा-अठरा वर्षाचा एक मुलगा भेटला .तो माझ्याजवळ आला व  मला म्हणाला, "सर, ओळखलंत का ?"मी त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं व आठवू लागलो..काही क्षणातच मला त्याची ओळख पटली आणि आठवलं.'अरे,हा तर बादल आहे.'मी त्याला म्हटलं,"काय बादल ,इकडे कसा काय?  तो म्हणाला,"सर,माझं बँकेत थोडं काम आहे, म्हणून मी इकडे आलेलो आहे.""बरं -बरं "म्हणत मी त्याच्याशी संवाद साधला." तू आता काय करतोस? ..शिक्षण कोणत्या वर्गापर्यंत घेतलंस ???इत्यादी.. बाबत मी त्याची चौकशी केली.त्यावर बादल म्हणाला," सर दहावीत माझे दोन विषय राहिले, त्यामुळे मी पुढचं शिक्षण सोडून दिलं व आता एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहे.यावर मी म्हटलं," काय बादल,बाकी सगळं ठीक आहे ना?  बादलने स्मित हास्य करत,कामाबाबत समाधानी असल्याचं सांगितलं. त्यानंतर बादल व मी, दोघेही आपापलं बँकेतलं काम आटोपून निघून गेलो. 


घरी आल्यानंतर मात्र माझ्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं व मला आठवला, सहाव्या वर्गात शिकणारा बादल... त्यावर्षी प्रथमच माझ्याकडे बादलचा वर्ग शिकविण्यासाठी आलेला होता.. त्याच्या वर्गात एकूण आठ मुले होती व त्या आठ मुलांपैकी एक.. बादल होता...याच वर्गातला बादलचा जोडीदार असणारा दुसरा मुलगा म्हणजे.. सुरज..जोडीदार अशा अर्थाने की, दोघांचीही अभ्यासाची पातळी सारखीच.. अगदी बाराखडीही वाचता न येण्याइतपत.. सहावीतले विद्यार्थी म्हटल्यावर त्यांना साधी बाराखडी वाचता येत नाही.. ते बघून माझ्या मनात विचार आला की, ही मुलं पुढे, व्यावहारिक जगात कशी काय टिकाव धरतील?ती स्वतःच्या पायावर उभी होतील की नाही?त्याचं भवितव्य कसं असेल?...काळाच्या पोटात काय दडलंय,याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. साधी मराठी बाराखडी वाचता येत  नसूनही, बादल व सुरज शाळेत कधीही नियमित यायचे नाहीत.. त्यामागे त्यांची कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमी  कारणीभूत होती.  तशी दोघांची परिस्थिती हलाखीची असल्याने बादल व सूरज दोघेही, छोट्या-मोठ्या शेतीच्या कामाला जात असत..

 नावाप्रमाणेच बादल हा वर्णाने काळासावळा  तर सुरज निमगोरा होता. त्यांच्याकडे बघून मला नेहमी वाटायचं की त्यांच्या रंगांनी दोघांच्याही नावाला सार्थ केलेलं आहे.. बऱ्याचदा असाही योगायोग असायचा की,जेव्हा दिवसा ढगाळ वातावरण असायचं(ज्याला आमच्या नागपुरी भाषेत"बादल" म्हणतात) नेमकं, त्याच दिवशी बादल शाळेत यायचा. याउलट ज्या दिवशी स्वच्छ प्रकाश(ऊन) असायचं,त्या दिवशी सुरज शाळेत हजर असायचा तर बादल शाळेला दांडी मारायचा. ..मी नेहमी या विषयावर त्यांची गंमत करायचो..  एकंदरीत दोघेही अभ्यासात अगदी प्राथमिक स्तरावर होते आणि एवढं असूनही दोघे शाळेत नेहमी गैरहजर असायचे.

ज्या दिवशी दोघेही किंवा दोघांपैकी एक जरी शाळेत उपस्थित असला, की मी त्यांना बाराखडी शिकवायचो,त्यांच्याशी गप्पा करायचो. हळूहळू बादल व सुरज या दोघांना कुठेतरी वाटायला लागलं की, वाचता-लिहिता येणं, फार गरजेचं आहे. त्यामुळे बादल व सूरज शाळेत आल्यानंतर बाराखडी गिरवू लागले. पुढे टप्प्याटप्प्याने त्यांना "आ"ची मात्रा.".इ"ची मात्रा.. असं करत-करत, पुढचं वाचन मी त्यांना शिकूवू लागलो. कदाचित याआधी त्यांना एवढं आपुलकीने जवळ घेऊन कोणी बाराखडी शिकवली नसेल किंवा त्यांनी स्वतः त्याकडे फारसं  लक्ष दिलं नसेल. सहावीत आल्यानंतर मात्र त्यांनी बाराखडी व वाचन शिकण्याचा थोडाफार प्रयत्न सुरू केला. सहावी व सातवी या दोन वर्षांमध्ये बादल व सूरज दोघेही कामापुरते काअसेना,वाचन करू लागले. सातवीनंतर जेव्हा दोघांची जिल्हा परिषदेच्या शाळेतून पुढे, खाजगी शाळेमध्ये आठव्या वर्गात जाण्याची वेळ आली, तेव्हा मी बादल व सुरज दोघांना जवळ बोलावून विचारले," आता तुम्हा दोघांना लिहित- वाचता येते ना,तर मग तुम्ही कोणत्या वर्गापर्यंत शिकणार? यावर बादल म्हणाला," बघू सर.." मी म्हटलं," बादल, बघू नाही... तर तुला कोणत्याही परिस्थितीत बारावीपर्यंत शिकायचं आहे आणि असं तू मला आज प्रॉमिस करायचं आहे." त्या बालवयात कदाचित त्याच्या बुद्धीला  माझं म्हणणं पटल असेल.. म्हणून बादलने सातवीनंतर पुढे बारावीपर्यंत शिकण्याचं मला प्रॉमिस केलं..पुढे बादल व सुरजने आठवीसाठी एका खाजगी शाळेत प्रवेश घेतला.

मध्यंतरी बादलशी संपर्क झाला नाही.. मग अचानक इयत्ता आठवीत असताना.. शाळेतून घरी येतांना मला, बादल दिसला.. मी त्याला आवर्जून हाक मारली. बादलला विचारलं," काय बादल, काय म्हणते नवी शाळा?.. अभ्यास करतो की नाही? यावर बादलचं उत्तर विचार करायला भाग पडणारं होतं. तो म्हणाला ,"सर, त्या शाळेत मला कुणीच विचारत नाही. शिक्षकही मला जवळ बोलवत नाहीत. तुम्ही  मला जवळ बोलवून एक- एक गोष्ट शिकवायचे, तिथे कोणी माझी साधी दखलही घेत नाही." बादलचे हे उत्तर ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला... वाटलं की,जर या मुलांना थोडं आपुलकीनं वागवलं, तर कदाचित ही मुलं फार नाही.. परंतु स्वतःच्या पायावर उभी  होण्याइतपत शिक्षण.. नक्कीच घेवू शकतील.. त्यानंतर मी बादलला समजावलं," अरे बादल, त्या शाळेत जास्त मुलं असल्यामुळे कदाचित तिथले शिक्षक तुझ्याकडे वैयक्तिक लक्ष देत नसतील." त्यावर बादलने नेहमीप्रमाणे स्मितहास्य केलं व  घराच्या दिशेने निघून गेला. 

 त्यानंतर बऱ्याच दिवसांनी बादलशी बँकेत झालेली ही माझी भेट..  सुरज बद्दल चौकशी केली असता तो नववी नंतर पुढे शिकला नाही,असं बादलने मला सांगितलं. बादल आजच्या स्पर्धेच्या व व्यवहारी जगात छोटं-मोठं का असेना काम करून स्वतःचं आयुष्य इमाने-इतबारे जगतो आहे ..फार उच्च शिक्षण जरी त्याने घेतलं नसलं तरी तो स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा आहे...तशाही त्याच्या स्वतःच्या आयुष्याकडून फार अपेक्षा नव्हत्याच... कदाचित त्यामागे त्याची आर्थिक-सामाजिक परिस्थिती असेल किंवा त्याला कुणी तसं,स्वप्न बघायला शिकवलं नसेल..काही का असेना.. परंतु बादल प्रामाणिकपणे काम करून, समाजामध्ये चांगला नागरिक म्हणून जगतो आहे,याचं मला समाधान वाटलं.  


मागे वळून बघितल्यावर वाटतं की, असे कित्येक बादल व सूरज आपल्या समाजात आहेत की ज्यांचे मूलभूत शिक्षण,अनेक कारणांनी होत नाही... याचा अर्थ त्यांची शिकायची इच्छा नसते किंवा ते जीवनात काहीच करू शकत नाहीत असे नाही... आपण थोडंजरी त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघितलं तर ही मुलं समाजासाठी त्यांच्या परीने योगदान देऊ शकतील... एकंदरीत शिक्षक व समाजाचा एक संवेदनशील घटक म्हणून अशा बादल आणि सूरज,यांना  प्रोत्साहित करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे,असं मला वाटतं.. 

Best of glocal marathi

गनिमीकावा

        गनिमीकावा संकटे बहु येतील, हरणे तुला ठाव नाही.. कोंडीत सापडाया, गड्या तू कुणाचा साव नाही..!!     भेटतील सरडे,      पदोपदी तुला रे.. ...