🍁प्रितम
..बऱ्याच दिवसानंतर,मला रवीचा फोन आला. गाव सोडून सात - आठ वर्षे झाले असतील.यादरम्यान रवीने फोन केल्याचे मला तरी आठवत नव्हते.कधी गावाला गेलो तर त्याची भेट व्हायची. गावाकडच्या मित्रांचं कसं चाललंय, याबाबत मी त्याच्याशी चौकशी करायचो.तोही त्याच्यापरीने सगळ्यांविषयी सांगायचा.आज मात्र त्याच्या आवाजावरून काहीतरी विपरीत घडल्याचं मला जाणवलं."अरे, आपला प्रीतम गेला.."असे म्हणत तो रडू लागला. मीही काहीक्षण नि:शब्द झालो. काय बोलावे,मला काही सुचत नव्हतं. माझेही डोळे पाणावले.काय व कसं घडलं,हे विचारण्याचं मी धाडस करू शकलो नाही.
...अचानक प्रितमचं देखणं रूप माझ्या नजरेपुढे उभं राहीलं.वयाच्या अवघ्या तिशीत तो या जगाचा निरोप घेईल,असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. एका दलित शिक्षक दांपत्याच्या पोटी जन्मलेला प्रितम, नावाप्रमाणेच दोस्ता-मित्रांत प्रेमाची पेरणी करणारा होता. आई-वडिलांच्या नोकरीच्या अडचणींमुळे, बालपणापासूनच त्याला आजोळी ठेवण्याचे त्याच्या पालकांनी ठरविले. सुरुवातीचे काही दिवस वगळता, तो जास्तीत जास्त वेळ आजी-आजोबांच्या मायेच्या सावलीत वाढला.रूढार्थाने त्याला आई-वडिलांचे प्रेम काही लाभले नाही. आजी-आजोबा सुद्धा शिक्षक, शिवाय ते वारकरी संप्रदायाला मानणारे.त्यामुळे प्रितमवर बुद्धांच्या विचारांपेक्षा,विठ्ठल भक्तीचा प्रभाव कायमच जास्त राहिला.भूगावातील जिल्हा परिषद शाळेत त्याचं प्राथमिक शिक्षण झालं.आजी- आजोबांच्या अतिशय लाडात वाढलेला प्रितम, तसा अभ्यासात हुशार.वर्गात प्रथम येणारा नसला,तरी थोड्या अभ्यासाने उत्तम मार्क्स घेणारा.
..मात्र यादरम्यान त्याच्यात काहीतरी विचित्र बदल घडू लागला.त्याच्या वर्गमित्रांना हा बदल जाणवू लागला. अलीकडे प्रितम, काहीसा मुलींप्रमाणे वागतो..बोलतो.. व चालतो..,असे सगळ्यांना वाटू लागले.कदाचित प्रितमला हे जाणवत नसावं.शिवाय आजी-आजोबा त्याच्यावरील प्रेमापोटी त्याकडे दुर्लक्ष करू लागले. दिवसांमागून दिवस जात होते.प्रितम आता सातवीत गेला.मित्रांच्या गळ्यात कारण नसताना हात घालणं..त्यांच्या गालांना हाताने स्पर्श करणं.. केसावरून हात फिरवणं.. यांसारख्या गोष्टी तो करू लागला.त्याला याचं काहीच वावगं वाटत नव्हतं.मित्रही त्याची याबाबत टिंगल-टवाळी करू लागले.वर्गातील मुलीही त्याला हसायच्या.असं असलं तरी मुलींशी प्रितम अदबीनं वागायचा.त्याच्या आवाजात वेगळंच आर्जव होतं.वर्गातील मुली त्याच्याशी बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या.जणू प्रितम आपल्यातलाच एक आहे,असं त्यांना वाटायचं...दुसरीकडे मुलांना मात्र हा गडी आपल्यातला नाही, असं वाटायचं. आयुष्याच्या या वळणावर प्रितमचा, जगावेगळा संघर्ष सुरू होता.
..आता प्रितमने किशोर वयात प्रवेश केला.दहावीचं वर्ष होतं.प्रितमचं असणं.. म्हणजे फुल टाइमपास, असं समीकरण या काळात झालं होतं. तोही हे सगळं हसण्यावारी न्यायचा.एव्हाना त्याला त्याच्यातल्या वेगळेपणाची स्पष्ट जाणीव झाली होती.त्याचा त्याने खुलेपणाने स्वीकार केला होता.त्यामुळे एखाद्याने त्याची चेष्टा केली तर तो दुप्पट प्रतिसाद द्यायचा व समोरच्याला चार लोकांत खजील करायचा.याच टप्प्यावर माझी व प्रितमची ओळख झाली.सुरुवातीला मला त्याच्या वागण्या- बोलण्याबद्दल पुरेशी कल्पना नव्हती. मात्र मित्रांनी, सर्वप्रकार सांगितल्यानंतर, त्याच्यातलं वेगळेपण मीही स्वीकारलं.अधेमधे तो भेटायचा.बऱ्याच गोष्टींवर आम्ही भरभरून बोलायचो.
..दरम्यान प्रितम दहावी उत्तीर्ण झाला.अकरावीला त्याने तालुक्याच्या गावी प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये प्रितम आहे म्हटल्यावर, धमाल होणारच.. तोही त्याच्या वागण्या- बोलण्यातून त्याचं वेगळेपण दाखविण्याची एकही संधी सोडायचा नाही. वर्गातील मित्र- मैत्रिणी जरी त्याची चेष्टा करीत असले, तरी तो सगळ्यांच्या गळ्यातील ताईत होता.प्रेमाच्या धाग्यात सर्व मित्रांना प्रितमने बांधले होते. एरवी मित्रांनाही त्याची सवय झाली होती.ग्रामीण भागात लहानाचं मोठं होताना,प्रितम आपलं भावविश्व घेऊन जगत होता.
... प्रितमला वाचनाचा प्रचंड वेड होतं.मराठी साहित्य त्याच्यासाठी जीव की प्राण.पुढे बीएला मराठी साहित्य हा विषय घेतल्याने,त्याच्या वाचनात वैविध्य आलं.वि.स.खांडेकर, व.पु.काळे,ना.सी. फडके,पु.ल.देशपांडे, केशवसुत इत्यादी. साहित्यिकांच्या साहित्याचा त्याने अभ्यास केला. त्यामुळे त्याच्या भाषेला वेगळीच धार आली.तो आता लिखाण करू लागला..,कविता लिहू लागला.., परिसंवाद- वादविवाद स्पर्धांमध्ये विद्यापीठस्तरावर भाग घेऊ लागला.., पारितोषिके मिळवू लागला.. त्याच्यातल्या तरल मनाला कवितेमुळे एक ऊब मिळाली. कोणत्याही विषयावर बोलण्या इतपत,त्याने वाणीवर हुकूमत मिळवली.
.. प्रितम मला पुन्हा भेटला.निमित्त होतं,नागपूरातील एका संस्थेने आयोजित केलेल्या काव्यलेखन स्पर्धेचं.. वीस- बावीस वर्षांची तरुण मुलं या स्पर्धेत सहभागी होती.त्यामुळे त्यांच्या कवितेत वैविध्य व प्रगल्भता जाणवत नव्हती. इथे मात्र प्रितमने, 'गणिका ' नावाची कविता सादर केली. एका वैश्येचं दुःख त्याने कवितेतून मांडलं. त्याच्या रसाळ व हळुवार वाणीतून ती कविता ऐकताना,सर्व श्रोत्यांचं मन गलबलून आलं.जणू प्रितमने या कवितेच्या माध्यमातून,स्वतःच जीवनच उलघडलं होतं.स्पर्धेचा निकाल जाहीर झाला व अर्थातच प्रितमला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.मला वाटलं,इथून पुढे प्रितम,एक प्रख्यात कवी होणार.मात्र नियतीला काही औरच मंजूर होतं..
.. बीएच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला, पेपर सोडवतांना, त्याच्याजवळ कागदाचा एक चिटोरा सापडला व याकारणाने पर्यवेक्षकांनी त्याला पेपर सोडवू दिला नाही.त्यामुळे तो, त्यावर्षी बीए पूर्ण करू शकला नाही. हळव्या प्रितमसाठी हा मोठा आघात होता.त्याने त्याक्षणी ठरवलं की,मी यापुढे शिक्षण घेणार नाही.घरी आल्यानंतर त्याने आजी-आजोबा व आई-वडिलांना याबाबत सांगितलं. "मी आता कीर्तनकार होणार.. व आळंदीला जाऊन कीर्तनाचं प्रशिक्षण घेणार" त्याच्या हट्टापोटी,अनिच्छेने का असेना,घरच्यांनी त्यासाठी होकार दिला.आळंदी येथे रीतसर कीर्तनाचं प्रशिक्षण प्रितमने पूर्ण केलं.अनेक अभंग त्याला तोंडपाठ होते. रामायण- महाभारतातील किस्से,तो त्याच्या रसाळ वाणीने रंगवून सांगायचा. मराठी भाषेवर त्याचं तसंही प्रभुत्व होतच.आता प्रीतम ह.भ.प.प्रितम महाराज म्हणून पंचक्रोशीत ओळखला जाऊ लागला.गावातील मंडळांमध्ये त्याची कीर्तनं होऊ लागली.नव्या पिढीतील असल्याने,प्रितमने त्याच्या कीर्तनात आधुनिक काळातील प्रश्नांची सांगड घातली. गमतीदार किस्स्यांच्या संगतीने तो समाज प्रबोधन करू लागला. त्याच्या कीर्तनाला गर्दी होऊ लागली. विदर्भातील अनेक जिल्ह्यातून लोकं त्याला कीर्तनासाठी बोलवू लागले.हजारो गावांमध्ये त्याचं कीर्तन होऊ लागलं. गावातील मोठमोठाले आसामी व नेते त्याच्या पायांवर माथा टेकवू लागले. प्रितम आता खुश होता. जनमाणसाच्या गराड्यात वावरणं, त्याला तसंही आवडत होतं.त्याला आता अध्यात्माची ओढ लागली होती. अगदी मध्यप्रदेशातल्या मराठी भागामधूनही प्रीतमला बोलावणे येऊ लागले.त्याची लोकप्रियता आता महाराष्ट्राची सीमा ओलांडू लागली. आता पुन्हा मला वाटलं की,प्रितम महाराष्ट्र गाजवणार.. एक नामवंत कीर्तनकार होणार.. इथे पुन्हा नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.
...अचानक प्रितमची एका प्रसंगी इस्कॉनच्या कृष्णभक्ताशी भेट झाली व तो इस्कॉन संप्रदायाकडे आकर्षित झाला.स्वामी प्रभुपाद यांनी स्थापन केलेल्या इस्कॉन संप्रदायाची शिकवण त्याला आवडू लागली. कृष्णभक्तीची ओढ खुणावू लागली. कृष्ण सर्वव्यापी आहे.तो सर्व शक्तिमान आहे,ही त्याची पक्की समज झाली. तो इस्कॉन संप्रदायाशी जोडला गेला.कृष्णमंदिरात तो नित्यनेमाने जाऊ लागला.तो आता जेव्हा भेटायचा तेव्हा कृष्णाविषयी भरभरून बोलायचा.मी आता माझं उर्वरित आयुष्य कृष्णाच्या चरणी समर्पित करणार आहे,असं सांगायचा.मी त्याच्याशी याबाबत वाद घालायचो.तो माझं म्हणणं खोडायचा.तू स्वतः अनुभवल्याशिवाय या विषयावर बोलू नकोस,असं म्हणायचा. मित्रप्रेमापोटी मी विषय बदलायचो. यानंतर मात्र माझी व प्रितमची कधीच प्रत्यक्ष भेट झाली नाही.मित्रांना त्याच्याविषयी विचारायचो.ते त्यांना माहीत असलेलं सांगायचे. एक तिशीतला तरुण अचानक शिक्षण सोडतो काय.. आध्यात्मिक मार्ग निवडतो काय.. व पुढे कृष्णभक्ति कडे वळतो काय.. सगळंच कसं अकल्पनीय वाटायचं. प्रितम मात्र त्याच्या धुंदीत जगत होता.हा मार्ग त्याने स्वतः निवडला होता.एरवी त्याच्या वेगळेपणामुळे, त्याच्याकडे यापेक्षा सुरक्षित व सन्मान देणारा मार्गही त्याच्या दृष्टीने नसावा.म्हणूनच त्याने हा मार्ग निवडला असावा,अशी मी माझी समजूत करून घेतली.
..आज जेव्हा रवीचा फोन आला व प्रितम या जगात नाही,असं समजल्यावर प्रितमचा संपूर्ण जीवन प्रवास डोळ्यांसमोर नकळत तरळून गेला.गावाकडे चौकशी केली तेव्हा कळलं.. प्रितमच्या पायाला गँगरीन झालं होतं.त्याने त्याकडे बरेच दिवस दुर्लक्ष केलं.दुर्लक्ष का केलं?हे अजूनही माझ्यासाठी अनुत्तरीत कोडं आहे.पुढे इन्फेक्शन वाढलं.त्याला बॉडी शॉक येऊन,त्याचा मृत्यू झाला.प्रितमच्या वादळी आयुष्याचा असा अनपेक्षित शेवट होईल,असं वाटलं नव्हतं. अजूनही प्रितम 'गणिका ' या त्याच्या कवितेतून.. त्याच्या मधाळ कीर्तनातून..त्याच्या हसण्यातून.. वागण्यातून.. बोलण्यातून.. त्याच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला खुणावत असतो.. सुखावत असतो.. हे मात्र नक्की...!
✍️श्री.चंद्रभान अरुण शोभणे
Dt.12/10/2025
