मंगळवार, ३० जुलै, २०२४

नागपूर मेट्रो..निबंध स्पर्धा





नागपूर सारख्या शहराला मेट्रो सेवेची गरज काय?पासून सुरू झालेली चर्चा..2012 साली नागपूर शहराला मेट्रो रेल्वेची गरज आहे...इथे येऊन थांबली...2014 मध्ये,केंद्र शासनाने नागपूर मेट्रोला तात्विक मंजुरी दिली... मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 ऑगस्ट 2014 ला नागपूर मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी केली... व खऱ्या अर्थाने मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामाची सुरुवात 31 मे 2015 ला झाली...पुढे देशातील सर्वात वेगाने उभारला जाणारा मेट्रो प्रकल्प म्हणून नागपूर मेट्रोची नोंद झाली...30 सप्टेंबर 2017 ला नागपूर मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली.. ८ मार्च 2019 ला नागपूर मेट्रो नागपूरकरांच्या सेवेत दाखल झाली...व नागपूर मेट्रो भारतातील 13 वी कार्यरत असणारी मेट्रो सेवा बनली... एवढचं नाही तर आज नागपूर मेट्रो एकूण ऊर्जेपैकी 60% सौरऊर्जा वापरून भारतातील सर्वात हरीत रेल्वे म्हणून नावाजली गेलेली आहे... नागपूर मेट्रोचा हा सर्व प्रवास स्वप्नवत असा आहे. 

  मेट्रोचा हा प्रवास आठवण्याचे कारण म्हणजे,ज्यावेळी छत्रपती चौकातला जुना उड्डाणपूल मेट्रो प्रकल्पासाठी पाडला जाणार होता,त्यावेळी नागपूर मेट्रोद्वारे उड्डाणपुलाची आठवण म्हणून व मेट्रो प्रकल्पाला शुभेच्छा देण्यासाठी भल्या मोठ्या बॅनरवर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती.त्यावेळेस शुभेच्छा संदेश लिहिताना स्वप्नवत वाटणारी मेट्रो,एवढ्या लवकर प्रत्यक्षात उतरेल असं कधी वाटलं नव्हतं. मात्र नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर असो,मेट्रोस्टेशनची निर्मिती करताना विचारात घेतलेली स्थानिक संस्कृती व युनिक अशा थीमचा केलेला वापर असो,सतत नाविन्याचा ध्यास धरून, मेट्रोने नागपूर शहराला चार चाँद लावले आहेत,असं म्हणणं वावगं ठरणार नाही.नागपूर शहरातील उष्ण हवामानाचा विचार करता,नागपूर मेट्रो नागपूरकरांच्या आयुष्यात थंडगार वाऱ्याची झुळूक घेऊन आली आहे.मिहान,हिंगणा एमआयडीसी, पारडी,गांधीबाग,सीताबर्डी इत्यादी अत्यंत गर्दीच्या ठिकाणांना सुलभरीत्या जोडण्याचे शिवधनुष्य महामेट्रोने लीलया पेललं आहे. येत्या काळात मेट्रो रिच दोन टप्पा पूर्ण झाल्यास नागपूर सभोवतालचा जवळपास 20-25 किलोमीटर पर्यंतचा भाग मेट्रोशी जोडला जाणार आहे.अशाप्रकारे येणाऱ्या काळात नागपूर शहराच्या विकासाच्या प्रवासात,नागपूर मेट्रो मैलाचा दगड ठरल्यापासून राहणार नाही.

   'नागपूर' हे भारत देशाच्या हृदय स्थानी वसलेलं शहर आहे.त्यामुळे नागपूर शहराला विकासाच्या अमाप संधी आहेत.अतिशय वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीत नागपूर अग्रस्थानी आहे .लॉजिस्टिक हब, टायगर कॅपिटल ऑफ इंडिया,ऑरेंज सिटी.. यांसारख्या अनेक बिरुदांनी यापूर्वी नागपूरला अलंकृत केलेलं आहे.या सर्व कारणांनी नागपूरच्या लोकसंख्येचा वाढता वेग लक्षात घेता,नागपूर शहराला मेट्रोसिटी बनविण्यात मेट्रो नक्कीच हातभार लावत आहे. जसजशी शहराची लोकसंख्या वाढत जाईल, तसतशी वाहने प्रचंड संख्येने रस्त्यांवर उतरतील आणि यामुळे वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण वाढीस लागेल.याला रोखायचं असेल तर जास्तीत जास्त लोकांनी मेट्रोचा वापर करायला हवा,याचा आदर्श नागपूरकरांनी,1 जानेवारी 2023 ला,एकाच दिवशी तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त संख्येने मेट्रोने प्रवास करून घालून दिला.

  नागपूर मेट्रोने व्यक्तिशः मला प्रवासाचा नित्य,निखळ आनंद दिला आहे.एक नोकरदार म्हणून मला नियमितपणे लोकमान्य नगर ते कस्तुरचंद पार्क यादरम्यान प्रवास करावा लागतो. शिवाय बऱ्याचदा गांधीबाग,पारडी, मिहान,एम्स,खापरी येथे वेगवेगळ्या कारणांसाठी मेट्रोने प्रवास करण्याचे प्रसंग येतात. मात्र मेट्रो असल्याने प्रवासाचा शीण जाणवत नाही.मेट्रो स्टेशनवर मिळणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा, कर्मचाऱ्यांची वागणूक व सुरक्षित प्रवासाची हमी या सर्व गोष्टी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत.मेट्रोने केलेला प्रवास म्हणजे आपण पर्यावरण संवर्धनास हातभार लावत आहोत, याचंही मला मानसिक समाधान देऊन जातो. मेट्रोने गरीब-श्रीमंत,विविध जाती-धर्माची लोकं,एकत्रित प्रवास करतात व यामुळे सामाजिक ऐक्याला सुद्धा बळकटी मिळते. अतिशय माफक दरात मिळणारा आनंददायी प्रवास कधी संपूच नये,असं मला नेहमी वाटतं.दररोजचे प्रवास करणारे सहप्रवासी,कधी सुखदुःखाचे साथीदार बनलेत,हे माझं मलाच कळलं नाही. मेट्रोने प्रवास करून केलेल्या आर्थिक बचतीची, कुटुंबाच्या सुखात गुंतवणूक करून, मी मेट्रो प्रवासाचा आनंद द्विगुणीत केला आहे. 

  बोलण्यासाठी मेट्रो विषयी तक्रार करावी, असे काहीच नाही.कारण अलीकडे तर व्हाट्सॲपवर तिकीट काढण्याची सेवा सुध्दा मेट्रोने उपलब्ध करून दिलेली आहे. प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा कशी देता येईल, असाच प्रयत्न कायम मेट्रोने केलेला आहे.शेवटी एवढंच सांगावसं वाटतं की, मेट्रोचा दुसरा टप्पा लवकरात लवकर पूर्ण व्हावा,जेणेकरून नागपूर शहराचा मोठा भाग मेट्रोसेवेच्या कक्षेत येईल.शिवाय रिंग रेल्वेद्वारे नागपूरचा उर्वरीत भाग,कसा जोडला जाईल,यादृष्टीने मेट्रो प्रशासनाने प्रयत्न करावे.

    मेट्रोचा नियमित प्रवासी म्हणून मेट्रोने प्रवासाचा आंतरराष्ट्रीय दर्जा भविष्यातही असाच कायम ठेवावा,ही मेट्रो प्रशासनाला नम्र विनंती व महामेट्रोला पुढील वाटचालीस मनःस्वी शुभेच्छा.

    

रविवार, १६ जून, २०२४

'बाप'माणूस


 एक हात जन्मापासून कायम तुमच्या पाठीशी असतो..तुम्ही रडता-पडता,तेव्हा कदाचित तो तुमच्याजवळ नसतो.. पण जेव्हा जेव्हा तुम्ही अडता- नडता,तेव्हा मात्र त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो.. अंगाई गीते तो तुमच्यासाठी गात नाही.. पण तुमचे सर्व लाड पुरवल्याशिवाय मात्र तो राहत नाही.. सबंध आयुष्य खर्ची घालतो कुटुंबासाठी.. नसतोच त्याच्याकडे वेळ  स्वतःसाठी... व्यक्त होतांना तो कदाचित कमी पडतो.. जीवनाच्या संघर्षात मात्र पुरेपूर लढतो.. ज्यांच्या फक्त असल्याने घराला घरपण येतं .. ज्याचं वागणंही तुम्हाला शहाणपण देतं.. ज्याला वाटतं,तुम्ही त्याच्यापेक्षाही मोठं व्हावं,असं वाटणारी जगातली एकमेव व्यक्ती,तो असतो..

जीवनात हार मानायची नाही,हे तो कायम मनी ठसतो..रुसतो, भांडतो बऱ्याचदा... न पटताही मांडतो म्हणणे अनेकदा.. तरी तुमच्यासाठी बऱ्याचदा माघार घेतो...न मागताही आधार देतो.. डोळ्यांत स्वप्न ठेवून तो जगत असतो.. शाश्वती नसतांनाही आपलं सर्वस्व उधळून देणारा केवळ तोच असतो..  चार व्यावहारिक गोष्टी,काळानुरूप शिकतो.. तुम्हाला खाजगी स्पेस देणारा कुटुंबात तोच पहिला असतो.. तटस्थ व स्थितप्रज्ञ राहून आपल्या अंगावर उचलून धरतो घर सबंध आयुष्यभर...सुखाचे चार दिवस यावे,मिळावी विश्रांती क्षणभर..हा असा बापमाणूस प्रत्येकात दडला आहे..ज्याच्यावाचून कुटुंबाचा गाडा अडला आहे..

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३

दिवाळी गावाकडची

 🎇दिवाळी गावाकडची



दिवाळी सणाची चाहूल लागताच,गावात घरोघरी साफसफाई व सारवणाची लगबग सुरू होते.घरातील स्त्रिया या दिवसांत जणू 'स्वच्छता अभियान' नेटाने राबवितांना दिसतात.पुरुषमंडळी आपापल्या परीने यात हातभार लावत असतात.पूर्वी चुन्याने घराच्या भिंती सारवल्या जायच्या.त्यानंतर डीसटेंपर व हल्ली पेंटचा सुद्धा यासाठी वापर होतांना दिसतो.एकंदरीत, गाव दिवाळीत स्वच्छ, लखलखीत व नवंकोरं झालेलं असतं.


गावाकडची दिवाळी ही खऱ्या अर्थाने असते कष्टकऱ्यांची.. शेतकऱ्यांची.यात शहरी बडेजाव व दिखाऊपणा नसतो.तर तो असतो, निसर्गाच्या संपन्नतेचा सोहळा. रूढअर्थाने  दिवाळी पाच दिवसांची असली, तरी अलीकडच्या काळात, लक्ष्मीपूजन, गायगोंदण व भाऊबीज, हे तीन दिवस नागपूर जिल्ह्यात विशेषत्वाने साजरे केले जातात.


 हिवाळ्यातली थंडी या दिवसांत स्थिरावलेली असते.ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने बच्चे कंपनीच्या आनंदाला उधाण आलेलं असतं. बाहेरगावी शहरांमध्ये नोकरीनिमित्त कामाला असणारे चाकरमानी, गावाकडची वाट धरतात. विदर्भात प्रामुख्याने कपाशीचे पीक असल्याने शेतातल्या पांढऱ्या सोन्याकडे बघून शेतकरी समाधानी आणि तृप्त झालेला असतो. इकडे शेतात कापूस वेचणीचा हंगाम असल्याने दिवाळीपूर्वी शेतमजुरांच्या हातात अल्पसा का असेना पैसा खुळखुळत असतो. वर्षभर कफल्लक आयुष्य जगणाऱ्या कष्टकऱ्यांच्या घरी हा दिवाळी सण संपन्नतेची स्वर्णीम लकेर घेऊन येत असतो. 


घरापुढच्या ऐसपैस अंगणात, सडा-सारवण करून सकाळी रांगोळी घातली जाते.वर्षभर एकाच रंगाची रांगोळी घालणाऱ्या स्त्रिया, दिवाळीच्या दिवसांत मात्र आवर्जून रांगोळीत विविध रंग भरतांना दिसतात. सायंकाळी तर अंगणात रांगोळी घालण्याची जणू स्पर्धाच लागलेली दिसते.कुणाची रांगोळी मोठी,कुणाची रांगोळी अधिक सुंदर,याची चर्चा गावातील तमाम स्त्रिवर्गात असते.


बहुतेक घरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, सर्वार्थाने दिवाळी सण साजरा केला जातो.गावात या दिवसाला "मोठी दिवाळी"असंही म्हटलं जातं.घरात असलेल्या पैशा-अडक्याची व दाग -दागिन्यांची पूजा निष्ठेने व श्रद्धेने केली जाते.लहान थोर नवीन कपडे घालून मिरवतात.घरात गोडधोड केलं जातं.यात प्रामुख्याने, कोहळ्याचे बोंडं,अनारसे,रव्याचे वा बुंदीचे लाडू, शंकरपाळे इत्यादींचा समावेश होतो. शिवाय चकल्या,शेव,चिवडा व तत्सम फराळी पदार्थांची रेलचेलही असते. जिभेचे सर्व लाड या दिवसांत पुरविले जाते. दारात व अंगणात दिव्यांची आरास मांडली जाते. संपूर्ण गाव दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते. आकाशातले तारेच जणू अंगणी विराजमान झाल्यासारखे भासतात.गावाकडच्या या दिव्यांच्या प्रकाशाची सर, शहरातल्या झगमगाटाला नाही,हे मात्र खरं.लहान मुलं,टिकल्या,रीळ, फुलझड्या तर मोठी मंडळी,लक्ष्मीबॉम्ब, सुतळीबॉम्ब,झाड,चकरी इत्यादी च्या साह्याने फटाके फोडून दिवाळीचा आनंद साजरा करतात. 


गायगोंदणाच्या दिवशी शेतकरी वर्ग घरातील दुभत्या जनावरांना गेरूने रंगवितात.पूजा करून त्यांची वाजत-गाजत  मिरवणूक काढली जाते. भाऊबीज हा दिवस,बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला दिवस.या दिवसाला गावात विशेष महत्त्व असते.लग्न झालेल्या गावातील मुली,माहेरच्या ओढीने सहकुटुंब गावात येतात.एकमेकांची ख्यालीखुशाली विचारली जाते. सुखदुःखाची देवाणघेवाण होते.बहीण भावाला ओवाळते.घरी लहान मुलांचा जणू कल्लाच असतो.आनंदाला उधाण आलेलं असतं.अनेक गावात मंडई उत्सव आयोजित केला जातो. करमणुकीचे कार्यक्रम, नात्यागोत्यातल्या, जुन्या जाणत्या मंडळींची भेट, घरोघरी पाहुणचार..असा भरगच्च आनंदोत्सव घेवून दिवाळी गावात येते."दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा"ही म्हण सार्थ करत,गावाकडची दिवाळी सर्व गावकऱ्यांच्या मनात आनंदाची पेरणी करून जाते,यात तिळमात्र शंका नाही.


     


Dt.10/11/2023

रविवार, १० सप्टेंबर, २०२३

घर

 🏠घर




उन्हाळ्याचे दिवस होते.मे महिन्यातली दुपारची वेळ होती. मी माझ्या घराच्या मागच्या दारात उभा होतो.माझी नजर घराजवळील रिकाम्या प्लॉटकडे गेली. तिथे काही माणसं हाती टेप, दोरी व चूना,घेऊन मार्किंग करताना दिसली.ती माणसं प्लॉटची मोजणी करत होती. तेवढ्यात एक बिल्डर कारमधून खाली उतरला.त्याने प्लॉटवर नजर फिरवली.माणसांशी थोडेफार बोलून तो त्याच्या कारमधून निघून गेला.त्यानंतर ती माणसं सुद्धा  त्यांचं काम आटोपून निघून गेली. 


यादरम्यान दुपार टळून गेली होती. सायंकाळी पाच-सहाच्या सुमारास मोजणी झालेल्या प्लॉट पुढील रिकाम्या जागेत, एका घराच्या भिंतीच्या शेजारी, बांबू, तट्ट्या व लाकडी बल्ल्या, घेऊन एक टेम्पो आला. थोड्याच वेळात तिथे एक बिऱ्हाड आलं. नवरा बायको व मुलगी असलेलं छोटसं कुटुंब. आल्या- आल्या, कुटुंबातल्या पुरुषाने, त्या रिकाम्या जागेवर खड्डे खोदायला सुरुवात केली. बांबू, बल्ल्या व तट्ट्यांच्या मदतीने, त्याने तासाभरात तिथे एक झोपडी तयार केली. तिकडे त्याच्या बायकोने, दिडेक वर्षाच्या मुलीला, आडोशाला निजवून, आपल्या गाठोड्यातून रात्रीच्या जेवणासाठी,आवश्यक जिन्नस बाहेर काढले.दगडांची चूल मांडली.काड्या गोळा केल्या.चुलीवर पातेले ठेवून ती पोटाची आग शमविण्याच्या कामाला लागली. काम करता-करता अंधार दाटून आला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसभर रखरखतं ऊन होतं.मात्र रात्री काहीसा थंड वारा वाहू लागला.


बिल्डरने आधीच भिंतीला इलेक्ट्रिक मीटर व पाण्यासाठी बोरवेलच्या मशीनचे कनेक्शन लावलेले होते.त्यामुळे झोपडीत लाईटची व्यवस्था झालेली होती. दिवसभराच्या प्रवासाने व कष्टाने तिनही जीव, निवांतपणे झोपडीत झोपी गेले. मी कुतूहलाने त्यांच्या हालचाली टिपत होतो.दुसऱ्या दिवशी त्यांनी काही तट्ट्या व कापडाच्या मदतीने आंघोळीसाठी एक आडोसा तयार केला.त्यांची झोपडी भरवस्तीत असल्याने व आजूबाजूला पक्की घरे असल्याने,त्या तरुण जोडप्याला लहानशा लेकरासोबत साप-विंचवाची पर्वा न करता, टीनाच्या छताखाली,भर उन्हाळ्यात राहावं लागणार होतं. त्यांच्यासाठी कदाचित ते नवीन नसावं.म्हणून ते तिघेही सहजपणे वावरत होते. मला मात्र राहून राहून त्यांचं अप्रूप वाटायचं.


दुसऱ्या दिवशी,सकाळी दहाच्या सुमारास एक कार झोपडीजवळ आली.गाडीतून बिल्डर, "राम.. ए राम.. " अशी हाक मारु लागला. झोपडीतल्या पुरुषाचे नाव राम आहे,हे माझ्या लगेच लक्षात आलं. राम बाहेर आला.बिल्डरने त्याला कामाविषयी काही सांगितलं.त्याने मानेनेच होकार दिला. बिल्डर निघून गेला. मोजणी झालेल्या प्लॉटवर जेसीबीने खड्डे करायला सुरुवात झाली. आता मजुरांची गजबज वाढू लागली. राम त्यांच्यासोबत काम करू लागला. 



त्याच्या बायकोने दिवसागणिक झोपडी नीटनेटकी केली.ती तिच्या मुलीला दिवसभर सांभाळायची. गरज पडल्यास, रामला मदत करायची. अशाप्रकारे त्यांचा उघड्यावरचा संसार सुरू झाला. हाहा म्हणता उन्हाळा पार पडला. इमारतीचे फाउंडेशन, पहिला स्लॅब, दुसरा स्लॅब पूर्ण झाला.चार मजली इमारत होणार असल्याने ही इमारत पूर्ण होण्यास अवकाश होता.

आता पावसाळा सुरु झाला. पाऊस धो-धो कोसळत होता. झोपडी शेजारी पाणी साचू लागलं. रिकाम्या प्लॉटवर गवत वाढू लागलं.रात्री बेडकांचा आवाज ऐकू येऊ लागला. अशा परिस्थितीत ते तीन जीव,साप -विंचवाची पर्वा न करता, खरबडीत जमिनीवर झोपून रात्र काढू लागले. काही दिवसांनी रामने एक लहानसा कुलर खरेदी केला. एक लोखंडी पलंग आणला. पावसाळ्यानंतर हिवाळा सुरू झाला.कडाक्याची थंडी पडू लागली.झोपडीमध्ये टिनाच्या छिद्रातून, तट्ट्यांमधून,बोचरे वारे आत येऊ लागले.अशाही परिस्थितीत, दिवसभर अंग- मेहनतीचे काम करून,चटणी -भाकर खाऊन, त्यांनी रात्रीच्या थंडीचा सामना केला. एव्हाना इमारतीचे चार स्लॅबच काम पूर्ण झाले.भिंती उभ्या झाल्या. राम सकाळी नऊ वाजतापासून इमारतीच्या भिंतीवर पाणी मारणे, बिल्डरने सांगितलेली, छोटी-मोठी कामे करणे इत्यादी कामे करायचा.


जणू ही इमारत नाही तर त्याचं स्वतःचं घर आहे, याप्रमाणे तो आपुलकीने काम करायचा.अधेमधे तो एकटक इमारतीकडे पाहत बसायचा. आता हिवाळा संपायला आला. इमारतीचे काम जवळपास पूर्ण होत आलं.इलेक्ट्रिक फिटिंग, प्लंबिंग, खिडक्या, दारं बसवून  झाली. गावाकडे काही काम असल्याने त्याने बायकोला व मुलीला गावी पाठवलं.आता तो इकडे एकटाच राहू लागला.त्याला एकटेपणा जाणवू लागला.


 बिल्डरने आता त्याला इमारतीच्या पार्किंगच्या जागेत राहायला सांगितलं.सबंध वर्षभर सांभाळलेल्या झोपडीवजा घराला मोडताना त्याला काहीच वाटलं नाही.अगदी सहजपणे इमारतीच्या पार्किंगच्या जागेत आडोसा तयार करून तो राहू लागला. हळूहळू इमारतीच्या पेंटिंगचं काम पूर्ण होत आलं.बिल्डर दररोज कामाची पाहणी करायला यायचा. रामही त्याच्यासोबत इमारतीला न्याहाळायचा.तो स्वतः मालक असल्याप्रमाणे इमारतीच्या बांधकामासंदर्भात बारीकसारीक बाबींकडे लक्ष द्यायचा. कालांतराने इमारतीचे काम पूर्ण झाले. त्यातले,आठही फ्लॅट विकले गेले. प्रत्येक फ्लॅटमध्ये एक-एक कुटुंब राहायला आलं. 

आता पार्किंग एरियात, चारचाकी, दुचाकी गाड्या उभ्या राहू लागल्या.पार्किंगची जागा अपुरी पडू लागली.आज पुन्हा एकदा बिल्डर आला.तो रामला म्हणाला," राम,लक्ष्मीनगरमे अपना नया काम शुरू हो रहा है. वहाके प्लॉट के पास, कल अपनी झोपडी बना लेना."




.. रात्रीच्या अंधारात लायटिंगने न्हाऊन निघालेल्या नव्याकोऱ्या इमारतीकडे डोळे भरून पाहत," हा! ठीक है." असं म्हणत, राम त्या रात्री इमारतीच्या पार्किंगच्या जागेत, नवीन झोपडी उभारण्याचा,विचार करता-करता, कधी झोपी गेला,त्याचं त्यालाच कळलं नाही.


      

शनिवार, १४ जानेवारी, २०२३

बादल व सुरज

 

Courtesy-Unsplash~Auron Burden

मी बँकेत कामानिमित्त गेलो असता, मला सतरा-अठरा वर्षाचा एक मुलगा भेटला .तो माझ्याजवळ आला व  मला म्हणाला, "सर, ओळखलंत का ?"मी त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं व आठवू लागलो..काही क्षणातच मला त्याची ओळख पटली आणि आठवलं.'अरे,हा तर बादल आहे.'मी त्याला म्हटलं,"काय बादल ,इकडे कसा काय?  तो म्हणाला,"सर,माझं बँकेत थोडं काम आहे, म्हणून मी इकडे आलेलो आहे.""बरं -बरं "म्हणत मी त्याच्याशी संवाद साधला." तू आता काय करतोस? ..शिक्षण कोणत्या वर्गापर्यंत घेतलंस ???इत्यादी.. बाबत मी त्याची चौकशी केली.त्यावर बादल म्हणाला," सर दहावीत माझे दोन विषय राहिले, त्यामुळे मी पुढचं शिक्षण सोडून दिलं व आता एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहे.यावर मी म्हटलं," काय बादल,बाकी सगळं ठीक आहे ना?  बादलने स्मित हास्य करत,कामाबाबत समाधानी असल्याचं सांगितलं. त्यानंतर बादल व मी, दोघेही आपापलं बँकेतलं काम आटोपून निघून गेलो. 


घरी आल्यानंतर मात्र माझ्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं व मला आठवला, सहाव्या वर्गात शिकणारा बादल... त्यावर्षी प्रथमच माझ्याकडे बादलचा वर्ग शिकविण्यासाठी आलेला होता.. त्याच्या वर्गात एकूण आठ मुले होती व त्या आठ मुलांपैकी एक.. बादल होता...याच वर्गातला बादलचा जोडीदार असणारा दुसरा मुलगा म्हणजे.. सुरज..जोडीदार अशा अर्थाने की, दोघांचीही अभ्यासाची पातळी सारखीच.. अगदी बाराखडीही वाचता न येण्याइतपत.. सहावीतले विद्यार्थी म्हटल्यावर त्यांना साधी बाराखडी वाचता येत नाही.. ते बघून माझ्या मनात विचार आला की, ही मुलं पुढे, व्यावहारिक जगात कशी काय टिकाव धरतील?ती स्वतःच्या पायावर उभी होतील की नाही?त्याचं भवितव्य कसं असेल?...काळाच्या पोटात काय दडलंय,याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. साधी मराठी बाराखडी वाचता येत  नसूनही, बादल व सुरज शाळेत कधीही नियमित यायचे नाहीत.. त्यामागे त्यांची कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमी  कारणीभूत होती.  तशी दोघांची परिस्थिती हलाखीची असल्याने बादल व सूरज दोघेही, छोट्या-मोठ्या शेतीच्या कामाला जात असत..

 नावाप्रमाणेच बादल हा वर्णाने काळासावळा  तर सुरज निमगोरा होता. त्यांच्याकडे बघून मला नेहमी वाटायचं की त्यांच्या रंगांनी दोघांच्याही नावाला सार्थ केलेलं आहे.. बऱ्याचदा असाही योगायोग असायचा की,जेव्हा दिवसा ढगाळ वातावरण असायचं(ज्याला आमच्या नागपुरी भाषेत"बादल" म्हणतात) नेमकं, त्याच दिवशी बादल शाळेत यायचा. याउलट ज्या दिवशी स्वच्छ प्रकाश(ऊन) असायचं,त्या दिवशी सुरज शाळेत हजर असायचा तर बादल शाळेला दांडी मारायचा. ..मी नेहमी या विषयावर त्यांची गंमत करायचो..  एकंदरीत दोघेही अभ्यासात अगदी प्राथमिक स्तरावर होते आणि एवढं असूनही दोघे शाळेत नेहमी गैरहजर असायचे.

ज्या दिवशी दोघेही किंवा दोघांपैकी एक जरी शाळेत उपस्थित असला, की मी त्यांना बाराखडी शिकवायचो,त्यांच्याशी गप्पा करायचो. हळूहळू बादल व सुरज या दोघांना कुठेतरी वाटायला लागलं की, वाचता-लिहिता येणं, फार गरजेचं आहे. त्यामुळे बादल व सूरज शाळेत आल्यानंतर बाराखडी गिरवू लागले. पुढे टप्प्याटप्प्याने त्यांना "आ"ची मात्रा.".इ"ची मात्रा.. असं करत-करत, पुढचं वाचन मी त्यांना शिकूवू लागलो. कदाचित याआधी त्यांना एवढं आपुलकीने जवळ घेऊन कोणी बाराखडी शिकवली नसेल किंवा त्यांनी स्वतः त्याकडे फारसं  लक्ष दिलं नसेल. सहावीत आल्यानंतर मात्र त्यांनी बाराखडी व वाचन शिकण्याचा थोडाफार प्रयत्न सुरू केला. सहावी व सातवी या दोन वर्षांमध्ये बादल व सूरज दोघेही कामापुरते काअसेना,वाचन करू लागले. सातवीनंतर जेव्हा दोघांची जिल्हा परिषदेच्या शाळेतून पुढे, खाजगी शाळेमध्ये आठव्या वर्गात जाण्याची वेळ आली, तेव्हा मी बादल व सुरज दोघांना जवळ बोलावून विचारले," आता तुम्हा दोघांना लिहित- वाचता येते ना,तर मग तुम्ही कोणत्या वर्गापर्यंत शिकणार? यावर बादल म्हणाला," बघू सर.." मी म्हटलं," बादल, बघू नाही... तर तुला कोणत्याही परिस्थितीत बारावीपर्यंत शिकायचं आहे आणि असं तू मला आज प्रॉमिस करायचं आहे." त्या बालवयात कदाचित त्याच्या बुद्धीला  माझं म्हणणं पटल असेल.. म्हणून बादलने सातवीनंतर पुढे बारावीपर्यंत शिकण्याचं मला प्रॉमिस केलं..पुढे बादल व सुरजने आठवीसाठी एका खाजगी शाळेत प्रवेश घेतला.

मध्यंतरी बादलशी संपर्क झाला नाही.. मग अचानक इयत्ता आठवीत असताना.. शाळेतून घरी येतांना मला, बादल दिसला.. मी त्याला आवर्जून हाक मारली. बादलला विचारलं," काय बादल, काय म्हणते नवी शाळा?.. अभ्यास करतो की नाही? यावर बादलचं उत्तर विचार करायला भाग पडणारं होतं. तो म्हणाला ,"सर, त्या शाळेत मला कुणीच विचारत नाही. शिक्षकही मला जवळ बोलवत नाहीत. तुम्ही  मला जवळ बोलवून एक- एक गोष्ट शिकवायचे, तिथे कोणी माझी साधी दखलही घेत नाही." बादलचे हे उत्तर ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला... वाटलं की,जर या मुलांना थोडं आपुलकीनं वागवलं, तर कदाचित ही मुलं फार नाही.. परंतु स्वतःच्या पायावर उभी  होण्याइतपत शिक्षण.. नक्कीच घेवू शकतील.. त्यानंतर मी बादलला समजावलं," अरे बादल, त्या शाळेत जास्त मुलं असल्यामुळे कदाचित तिथले शिक्षक तुझ्याकडे वैयक्तिक लक्ष देत नसतील." त्यावर बादलने नेहमीप्रमाणे स्मितहास्य केलं व  घराच्या दिशेने निघून गेला. 

 त्यानंतर बऱ्याच दिवसांनी बादलशी बँकेत झालेली ही माझी भेट..  सुरज बद्दल चौकशी केली असता तो नववी नंतर पुढे शिकला नाही,असं बादलने मला सांगितलं. बादल आजच्या स्पर्धेच्या व व्यवहारी जगात छोटं-मोठं का असेना काम करून स्वतःचं आयुष्य इमाने-इतबारे जगतो आहे ..फार उच्च शिक्षण जरी त्याने घेतलं नसलं तरी तो स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा आहे...तशाही त्याच्या स्वतःच्या आयुष्याकडून फार अपेक्षा नव्हत्याच... कदाचित त्यामागे त्याची आर्थिक-सामाजिक परिस्थिती असेल किंवा त्याला कुणी तसं,स्वप्न बघायला शिकवलं नसेल..काही का असेना.. परंतु बादल प्रामाणिकपणे काम करून, समाजामध्ये चांगला नागरिक म्हणून जगतो आहे,याचं मला समाधान वाटलं.  


मागे वळून बघितल्यावर वाटतं की, असे कित्येक बादल व सूरज आपल्या समाजात आहेत की ज्यांचे मूलभूत शिक्षण,अनेक कारणांनी होत नाही... याचा अर्थ त्यांची शिकायची इच्छा नसते किंवा ते जीवनात काहीच करू शकत नाहीत असे नाही... आपण थोडंजरी त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघितलं तर ही मुलं समाजासाठी त्यांच्या परीने योगदान देऊ शकतील... एकंदरीत शिक्षक व समाजाचा एक संवेदनशील घटक म्हणून अशा बादल आणि सूरज,यांना  प्रोत्साहित करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे,असं मला वाटतं.. 

रविवार, २५ डिसेंबर, २०२२

नवरंग



Courtesy:Unsplash.. Mohammed Shamma

दरवर्षी येणाऱ्या नववर्षाकडे बघून मनात विचारांची भाऊगर्दी होते...मागे वळून बघताना आठवतात ..गेल्या वर्षी केलेले नानाविध संकल्प.. मात्र काळाच्या ओघात ते धुसर होत जातात ..व पुन्हा कधी नवीन संकल्प करण्याची वेळ येते..ते आपलं आपल्यालाच कळत नाही..जुन्या व नव्या संकल्पादरम्यान होतात..आपल्या हातून कळत-नकळत असंख्य चुका..

 यश-अपयश ..उत्साह- निराशा ..विश्वास-विश्वासघात..प्रेम- द्वेष ..आपले-परके..डाव-प्रतिडाव..अशा दोन ध्रुवांदरम्यान डोलत असतो..आपण.. दोलकासारखे.. सबंध वर्षभर.. कधी या तीरावर तर कधी त्या ..

परंतु एकंदरीत गोळाबेरीज केली असता, यापेक्षा आणखी चांगलं जगता आलं असतं..अशी हुरहुर मनात दाटून येते..हे मात्र नक्की ..


प्रत्येक वर्ष आपल्याला अनुभवाची नवी शिदोरी देऊन जातं..परंतु आपली भुक कायमच वाढत असल्याने.. तृप्तीची ढेकर आपण देऊ शकत नाही. ..


कुणी किती पैसा कमावला यापेक्षा त्याने किती माणसं कमावली, हे महत्वाचे नाही काय ?माणसे मोठ्या हुद्द्यावर गेली की त्यांची जमिनीशी नाळ तुटताना दिसते.. कधीही न संपणाऱ्या शर्यतीत ते धावत असतात अधाशासारखे.. ऊर फाटेस्तोवर.. क्षणाचीही उसंत घेण्याची त्यांना गरज वाटत नाही ..दुसरीकडे उघड्या आकाशाखाली बिनधास्तपणे जगणारी माणसं बघितली की वाटतं ..या दोघांपैकी कोण जास्त सुखी? 

या दोन टोकांच्या आयुष्यांव्यतिरिक्त ,जीवन जगण्याचा मध्यम मार्ग शोधणारीही काही मंडळी असतात.. चौकटीत इमानेइतबारे आयुष्य जगताना, समाजासाठी चार-दोन गोष्टी करता आल्या तर त्यांची त्याला ना नसते ..

रंगीबेरंगी या दुनियेत अशी अनेक रंगी आयुष्य जगणारी माणसं असणारच ..त्यात आपल्याला कसे आयुष्य जगायला आवडेल हा ज्याचा - त्याचा प्रश्न आहे..

 परंतु येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा व सुखाचा जावो,यापेक्षा जीवनाचा वेगळा अर्थ तो काय? म्हणून वाटतं,येणारे नववर्ष प्रत्येकासाठी,असावे सृजनाचे..नावीन्याचे.. आंतरिक समाधानाचे ....!!

शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

ऑनलाइन शिक्षण:दशा आणि दिशा



    @ऑनलाइन शिक्षण दशा आणि दिशा @


   "विद्येविना मती गेली | मतीविना नीती गेली |                नीतीविना गती गेली | गतीविना वित्त गेले | वित्ताविना शूद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले |"

                    -महात्मा ज्योतिराव फुले

 महात्मा फुले यांच्या वरील ओळी माणसाच्या जीवनात असलेलं,शिक्षणाचे महत्त्व अचूकपणे दर्शवितात."शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे,जो हे प्राशन करील,तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही".असे म्हणत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा शिक्षणाचं महत्त्व , अधोरेखित केलेलं आहे.कारण शिक्षणामुळेच दलित,पीडित,शोषित समाजाला विकासाच्या  नवनवीन संधी उपलब्ध होत असतात.व हा मागास समाज शिक्षणाच्या मूळ प्रवाहात येत असतांना अचानक,कोरोना,या महामारीमुळे संपूर्ण जग थांबलं. आर्थिक व सामाजिक व्यवहार ठप्प झाले.त्याचसोबत महत्प्रयासाने,गरीब- मागास समाजासाठी उघडलेली शिक्षणाची दारं बंद झाली.या महामारीच्या भीतीने शाळांना कुलुप लागलं व गरीब- मागास समाजातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून अलगदपणे बाहेर फेकले गेले.परिणामी,गेल्या दीड वर्षापासून हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.

    या सर्वांवर तोडगा म्हणून 'ऑनलाइन शिक्षण' हा जणू 'रामबाण उपाय 'असल्याचे चित्र निर्माण करण्यात आलेलं आहे.मुळात हे 'ऑनलाइन शिक्षण' म्हणजे आहे तरी काय? "जेव्हा अँड्रॉइड मोबाईल, कॉम्प्युटर/ लॅपटॉप, टीव्ही,विविध ऍप्स इत्यादी साधनांचा, इंटरनेटच्या माध्यमातून वापर करून शिक्षण दिलं जातं,तेव्हा त्या शिक्षणाला आपण 'ऑनलाइन शिक्षण म्हणत असतो."परंतु या ऑनलाईन शिक्षणाची दशा आपल्या देशात व जगात काय आहे,हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला 'यूएन रिपोर्ट -2020" वर नजर टाकावी लागेल.

 संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासाची 17 ध्येये घोषित केलेली आहेत.यामधील 4 थे ध्येय म्हणजे "सर्वांना सर्वसमावेशक, न्याय्य व दर्जेदार शिक्षण देण्याचं आहे."मात्र याच संयुक्त राष्ट्राची रिपोर्ट सांगते की, जगातील दोन तृतीयांश मुलांकडे इंटरनेटची सुविधा नाही.शिवाय,15 ते 24 वयोगटातील 63 टक्के युवकांकडे सुद्धा ही सुविधा नाही.गरीब व विकसनशील देशांच्या दहापैकी नऊ मुलांकडे इंटरनेट नाही.याउलट श्रीमंत देशात दहापैकी नऊ मुलांकडे इंटरनेट सुविधा आहे. शहरी भागात 60 टक्के मुलांकडे तर ग्रामीण भागात 75 टक्के मुलांकडे इंटरनेटची सुविधा नाही.शिवाय ज्यांच्याकडे इंटरनेट सुविधा आहे त्यापैकी अनेकांकडे इंटरनेटचा वापर करण्याकरिता लागणारी साधने नाहीत. व जिथे ती साधने आहेत,तिथे मुलांना मुलींपेक्षा त्याचा वापर करण्याची सवलत व सुलभता जास्त आहे.या सर्वांमुळे ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली "डिजिटल डिव्हाइड"ही एक दरी निर्माण झाल्याचं चित्र आहे व यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असमानता वाढीस लागली आहे व वंचित व मागास समाजातील जवळपास 91 टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य धारेतून बाहेर पडलेले आहेत. ज्याप्रकारे शिक्षण हे गरिबी निर्मूलनाचे प्रभावी माध्यम ठरू शकले असते,आज ते निष्प्रभ ठरतांना आपल्याला दिसत आहे. म्हणून जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ व भारताच्या रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर, रघुराम राजन म्हणतात,

  " कोरोनामुळे भारतात सर्वात जास्त गरिबांचं नुकसान झालेलं आहे.गरीब मुलांना ऑनलाईन शिक्षणाचा उपभोगही घेता आला नाही. जर तुम्ही मुलांना दीड वर्षे शाळेपासून दूर ठेवत असाल तर असं समजा की ती मुलं तीन वर्षे मागे जातील. शाळा पुन्हा सुरू झाल्या नाहीत तर एक संपूर्ण पिढी आपण हरवून बसू."


 परंतु असं असलं तरी, शासनाने ऑनलाईन शिक्षणासाठी काहीच केलं नाही,असे नाही.शासनाने टीव्ही, मोबाईल,रेडीओ यांसारख्या माध्यमातून ग्रामीण,गरीब, तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न कोरोनाच्या काळात केलेला आहे. मग तो सह्याद्री वाहिनीवरील "टीली मिली'हा शैक्षणिक कार्यक्रम असो,' शाळा बंद,शिक्षण सुरू 'हा व्हाट्सएप्प वरील उपक्रम असो,' दीक्षा ॲप' च्या माध्यमातून दिलेलं शिक्षण असो.परंतु एवढे पुरेसे नाही.ऑनलाईन शिक्षणाची दशा बदलून त्याला दिशा द्यायची असेल तर, शासनाला 'डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर 'उभारावं  लागेल.

 शिक्षक,विद्यार्थी व पालक यांना प्रशिक्षित व सशक्त करावं लागेल. अभ्यासक्रम लवचिक बनवून तो सहजपणे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा लागेल. नवनवीन तंत्रे ,पद्धती व माध्यमांचा वापर करावा लागेल.

केवळ कोरोनाच्या काळातच नाही तर, भविष्यातील आव्हानांचा वेध घेऊन" डिजिटल डिव्हाइड" ही दरी कशी कमी करता येईल यावर कायमस्वरूपी उपाय योजावे लागतील.अन्यथा आपण संयुक्त राष्ट्राचे शाश्वत विकासाचे 4थे ध्येय कधीच गाठू शकणार नाही,हेही तितकंच खरं..



 

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

Rich Dad Poor Dad

 



"Rich Dad Poor Dad"हे 'Personal finance' या विषयावरील कदाचित जगातील पहिलं पुस्तकअसावं. लेखक आहेत -जपानी मूळ असलेले अमेरिकी नागरिक- रॉबर्ट कियोसाकी.या पुस्तकात त्यांनी पैशाबद्दल एक आगळावेगळा दृष्टीकोन मांडलेला आहे.शिवाय फक्त साक्षर नव्हे तर अर्थसाक्षर असणं  आजच्या काळात किती गरजेचं आहे, हे त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून सांगितलेलं आहे.

     नावाप्रमाणेच ,पुस्तकात "Rich Dad"व "Poor Dad" या दोघांची तुलना लेखकाने केलेली आहे."Rich Dad"म्हणजे, लेखकाच्या मित्राचे वडील.ते पेशाने व्यावसायिक आहेत व त्यांचं जेमतेम शिक्षण झालेलं आहे.याउलट "Poor Dad"आहेत,स्वतः लेखकाचे वडील. जे उच्चशिक्षित असून शिक्षक आहेत. दोघांचेही वडील आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत.दोघांची मिळकत जवळपास सारखी आहे.असं असूनही लेखकाच्या वडिलांना नेहमीच पैशाची चणचण भासते व ते सबंध आयुष्य डोक्यावर कर्जाचं ओझं वाहतात. तर मित्राचे वडील,त्यांच्या पुढील आयुष्यात,चर्चला भरपूर देणग्या देऊनही,अमाप संपत्ती जमवितात.

     जवळपास सारखी मिळकत असणारे हे दोघं,आर्थिकदृष्ट्या दोन विरुद्ध टोकं का गाठतात ??याचाच अनुभवसंपन्न प्रवास म्हणजे.. "Rich Dad Poor Dad". लेखक स्वतःच्या वडिलांना "Poor Dad"व मित्राच्या वडिलांना "Rich Dad" का म्हणतात? ते पुस्तकात त्यांनी सकारण सांगितलेलं आहे. लेखक बालपणापासून स्वतःच्या वडीलांना "Follow"न करता, मित्राच्या वडिलांना "Follow" करतात,त्यांना आदर्श मानतात. व त्यांच्याकडूनच आर्थिकदृष्ट्या संपन्न बनण्याचा मूलमंत्र शिकून,ते श्रीमंत होतात.

   "Rich Dad"म्हणतात...

1)"The poor and middle class work for money.The rich have money work for them."

गरीब व मध्यमवर्गीय पैशांसाठी काम करतात तर श्रीमंतांसाठी पैसा काम करतो. 

 2)"It's not how much money you make, It's how much money you keep." 

तुम्ही किती पैसा कमविता यापेक्षा किती टिकवून ठेवता हे महत्त्वाचे आहे. कारण पैशाचे नियोजन न जमल्यामुळे करोडो रुपये असणारे आज रंक झालेले दिसतात.

3)"Rich people acquire asset.The poor and middle class acquire liabilities that they think are assets."

श्रीमंत हे मालमत्ता घेतात तर गरीब व मध्यमवर्गीय दायित्व विकत घेतात किंवा दायित्व मिळवतात व त्या दायित्वालाच ते मालमत्ता समजतात. 

4)"An asset puts money in my pocket.A liability takes money out of my pocket." 

जेव्हा तुम्ही मालमत्ता विकत घेता,तेव्हा तुमच्या खिशात पैसा येत असतो.परंतु जेव्हा तुम्ही दायित्व विकत घेता तेव्हा पैसा तुमच्या खिशातून बाहेर जात असतो.

5)"A person can be highly educated, professionally successful and financially illiterate."

" एखादी व्यक्ती उच्चशिक्षित व व्यावसायिकदृष्ट्या  यशस्वी असूनही आर्थिकदृष्ट्या निरक्षर असू शकते,असं लेखकाला वाटतं.म्हणून,Rich Dad,यांच्या म्हणण्यानुसार,आजच्या पिढीला शालेय शिक्षणासोबतच आर्थिक शिक्षण देणे गरजेचे झालेले आहे.

6)"The single most powerful asset we all have is our mind.If it is trained well,it can create enormous wealth."

 जगातली सर्वात उत्तम व शक्तिशाली मालमत्ता म्हणजे आपला मेंदू.जर आपण आपल्या मेंदूला व्यवस्थितरित्या प्रशिक्षित केलं,तर आपण आपल्या मेंदुचा(डोक्याचा) वापर करून अमाप संपत्ती निर्माण करू शकतो.

7)"Great opportunities are not seen with your eyes.They are seen with your mind."

महान संधी फक्त डोळ्यांनी दिसत नाही तर त्यासाठी डोकं वापरावं लागतं.

8)"Work to learn, don't work for money."

सर्वप्रथम, शिकण्यासाठी काम करा,केवळ पैशासाठी काम करू नका.कारण, काम शिकून तुम्ही आयुष्यभर पैसा कमवू शकता.

9)"The primary difference between a rich person and a poor person is how they manage fear."

 श्रीमंत व्यक्ती त्यांच्या जीवनात रिस्क घेत असतात.ते व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये रिस्क घेण्यास अजिबात घाबरत नाहीत .याउलट गरीब व मध्यमवर्गीय भीतीपोटी रिस्क घेण्यात मागे पडतात आणि त्यामुळेच ते संपत्ती निर्माण करू शकत नाहीत .

10)"The most people, the reason they don't win financially,is because the pain of losing money is far greater than the joy of being rich."

जगात जास्तीत जास्त लोक आर्थिकदृष्ट्या संपन्न यासाठी होत नाहीत कारण त्यांना श्रीमंत होण्याच्या आनंदापेक्षा पैसे गमावण्याची भीती जास्त वाटते.

11)Rich dad believed that the words,"I can't afford it."shut down your brain."How can I afford it."open up opportunities.

"Rich dad"एखादी वस्तू मी विकत घेऊ शकत नाही"यावर विश्वास ठेवत नाहीत.कारण यामुळे मेंदू काम करणे थांबवितो. याउलट "मी कशा पद्धतीने ती वस्तू घेऊ शकेल"यावर विश्वास ठेवतात. कारण, हे वाक्य तुमच्यासाठी पैसे कमविण्याच्या अनंत संधी निर्माण करू शकतं.

12) "There is gold everywhere,most people are not trained to see it." सगळीकडे संधी असते परंतु काही लोकांना त्या दिसत नाहीत. कारण त्यांनी ती दृष्टी विकसित केलेली नसते. 

..म्हणून या पुस्तकात रॉबर्ट कियोसाकी काही खास गोष्टी सांगून जातात.

 @तुम्ही कोणतीही नवीन गोष्ट किंवा कौशल्य शिका.त्यानंतरच तुम्ही संपत्ती निर्माण करू शकता .

@तुम्ही काळजीपूर्वक तुमचे मित्र निवडा की जेणेकरून तुम्हाला संपत्ती निर्माण करण्यात त्यांची मदत होऊ शकेल.

@तुम्ही स्वयंशिस्त पाळा व पैसा स्वतःच्या गुंतवणुकीवर आधी खर्च करा.त्यानंतर इतरांचे देणे द्या. 

@ Use asset to buy luxuries. तुम्हाला जर काही चैनीच्या गोष्टी घ्यायच्या असतील तर तुमच्या मालमत्ते मधून येणाऱ्या पैशाने त्या चैनीच्या वस्तू घ्या.कर्ज घेऊन चैनीच्या वस्तू घेऊ नका. 

@तुमच्या समोर एखादा आदर्श व्यक्ती ठेवा की ज्या पासून तुम्ही प्रेरणा घेऊ शकाल.

@ नवीन नवीन संकल्पना किंवा आयडियाचा शोध घ्या व त्या संकल्पनेवर काम करून त्यामधून संपत्ती निर्माण करता येते काय,याचा विचार करा.

@मार्केटमध्ये प्रत्येक गोष्टीवर बार्गेनिंग केले जाऊ शकते म्हणून कोणतीही मालमत्ता किंवा वस्तू घेताना तुम्ही बार्गेनिंग  करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला ती मालमत्ता कमी पैशात मिळू शकेल.

@ एखादी वस्तू तुम्हाला जर विकायची असेल तर आधी घेणारे शोधा आणि मग ती वस्तू खरेदी करा.

@ आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे मोठी स्वप्नं बघा. तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात संपत्ती निर्माण करू शकता. नाहीतर सबंध आयुष्य तुम्हाला कर्जाच्या ओझ्याखाली घालवावं लागेल.

 अशा प्रकारे "Rich dad, Poor dad"या पुस्तकामध्ये रॉबर्ट कियोसाकी आपल्याला श्रीमंत होण्याचा एक पासवर्ड देऊन जातात एवढं मात्र नक्की.

To buy a book:

"Rich Dad Poor Dad"

Touch the link below:-

https://amzn.to/3sy1Lap


.......©मराठी अनुवाद(Review)©...By.. https://glocalmarathi.blogspot.com



रविवार, १ ऑगस्ट, २०२१

विहीर

 

Courtesy:Pixabay


सकाळचे साडेसात वाजले असतील,विशालला आज जरा उशीराच जाग आली."आई,ये आई!असं म्हणून त्याने कमलाबाईला आवाज दिला.प्रतिसाद न मिळाल्यामुळे घरातल्या दोन्ही खोलीत त्याने तिला शोधले. शेजारीपाजारी सगळीकडे शोधाशोध केली. तरीही तिचा पत्ता लागला नाही. गावातल्या नातेवाईकांकडे जाऊन त्याने विचारणा केली. शिवाय ओळखीतल्या कास्तकारांकडेही तो जाऊन आला. त्यांनीही कमलाबाई आल्याचं सांगितलं नाही. आता मात्र विशाल पार गोंधळून गेला. 'कमलाबाई घर सोडून गेली.'ही बातमी हळूहळू वणव्यासारखी सबंध गावात पसरली.

जो-तो आपापल्या परीने निष्कर्ष काढू लागला. कुणी म्हणे,'ती टेन्शनमुळे घर सोडून निघून गेली असेल'.तर कुणी म्हणे,'चकव्याने तिला नेलं असेल'. काही बहाद्दर तर,'तिला कोणी चेटूक केलं असेल',असेही बरळू लागले.या-ना त्याप्रकारे कमलाबाईच्या नसण्याविषयी चर्चांना उधाण आलं होतं. विशालला मात्र काय करावं, काय नाही,असं झालं होतं.

तसाही तो फार शिकला नव्हता व त्याचाही काही प्रमाणात का असेना,या सार्‍या अंधश्रद्धांवर विश्वास होताच. म्हणून त्याच्या मनाची फार घालमेल होत होती.वडिलांच्या निधनानंतर व दोन्ही बहिनींच्या लग्नानंतर, तो व कमलाबाई हेच एकमेकांच्या सुखदुःखाचे साथीदार होतेे.मोहल्ल्यातल्या एकानेही या मायलेकांना एकमेकांशी भांडताना किंवा वाद घालतांना कधीही बघितलं नव्हतं. कमलाबाई शेतीच्या कामाला जायची तर विशाल घरच्या जुन्या टाटा सुमो, या सवारी गाडीने छोट्या-मोठ्या ट्रीप न्यायचा. कमलाबाईच्या कष्टीकपणामुळे पैशाची तशी फारशी चणचण त्यांना नसायची. एकंदरीत अगदीच सुखी नाही तरी, समाधानकारक असं,आयुष्य कमलाबाई जगत होती.

...कमलाबाईच्या घरामागे पडीक जमीन होती व तिथनं, एक पायवाट 'सनराइज' नावाच्या कंपनीच्या लेआउटकडे  गेली होती. हिवाळ्याची चाहूल लागली असल्याने सगळीकडे हिरवळ होती. शेतात कामाला जाणाऱ्या महिलांनी या हिरवळीतून पायवाट तयार केली होती. कमलाबाई सुद्धा या पायवाटेने बऱ्याचदा मजुरीला जायची. काही वर्षांपूर्वी सनराइज् कंपनीच्या लेआउटच्या जागी एकनाथरावांची शेती होती.कमलाबाईंनी शेतमजूर म्हणून अनेकवेळा या शेतात काम केलं होतं. शेतात मोठी विहीर असल्याने, बारमाही पिकं घेतली जायची.हल्ली लेआऊट बनल्यामुळे, तिकडं कुणी फारसं भटकत नसे.
   ....   कालच्या रात्री विशाल व कमलाबाईंनी सोबत जेवण केलं.जेवताना गप्पाही केल्या.'उद्या  प्रभाकररावांच्या शेतात लवकर कामाला जायचं आहे',असं म्हणून कमलाबाई लवकर झोपायला गेली.तिकडे विशालही जेवणानंतर फेरफटका मारून आला व लगेच झोपी गेला.झोपताना उद्याच्या दिवशी नशिबात काय वाढून ठेवलं आहे, याची कदाचित दोघांनाही कल्पना नव्हती.

...मध्यरात्री दोनच्या सुमारास, अचानक कमलाबाईला जाग आली.सगळीकडे निरव शांतता पसरलेली होती.कमलाबाईने जणू भारावलेल्या अवस्थेत घराचं दार उघडलं. पायात चप्पल घातली. मागे वळून विशालकडे बघितलंही नाही.घरामागच्या पायवाटेला तुडवीत, साप, विंचू,व काट्यांची पर्वा न करता, ती पुढे-पुढे जात होती.तिची दिशा स्पष्ट होती.वाटेत आडवे-उभे रस्ते असणारी सपाट जागा लागली.तिला ती जागा परिचयाची वाटली.कुणीतरी आपल्याला बोलवत आहे,या ओढीने ती पुढे अंधारात जणू गायब झाली...
.... आता मात्र सकाळचे नऊ वाजले होते. काही केल्या कमलाबाईचा पत्ता लागत नव्हता. गावातले तरुणही या शोधमोहिमेत सामील झाले. चारही दिशा, लहान-थोर धुंडाळू लागले. बाहेरगावच्या नातलगांना फोन करून,विचारून झालं.आजूबाजूच्या गावखेड्यातुनही मागोवा घेण्यात आला.आता मात्र कमलाबाईंच्या  घरून जाण्यावर नाही,तर कमलाबाईच्या जिवंत असण्या व नसण्यावर चर्चा होऊ लागली.अवघ्या बावीस-तेवीस वर्षाच्या विशालपुढे,'आईविना पुढचं आयुष्य कसं जगावं'? हा प्रश्न राहून-राहून उभा ठाकू लागला.या घटनेमुळे एरवी शांत असणारं गाव, अचानक खडबडून जागं झालं होतं.
..

..अकरा वाजले, रमेश नावाचा गावातला तरुण मासेमारीसाठी गावच्या बंधाऱ्याच्या दिशेने जायला निघाला. कमलाबाईच्या घटनेबद्दल त्यांने ऐकलं होतं.वाटेत 'सनराइज् लेआउट' लागल्याने व तेथील विहिरीत भरपूर पाणी असल्याने त्याची,पोहायची इच्छा झाली. रमेश तसा पट्टीचा पोहणारा होता. लगेच त्याने पायातली चप्पल काढली व अंगातले कपडे काढले...बघतो तर काय? त्याला विहिरीच्या पायरीवर दोन चपला दिसल्या."अरे वा!पोहायला सोबती आहे वाटतं",असं मनातल्या मनात बोलून, तो आनंदला.विहिरीच्या थडीवर उभं राहून उडी मारणार..तोच त्याला विहिरीत बाईचं प्रेत  तरंगताना दिसलं. प्रेत पाठमोरं  असल्यानं,ते कुणाचं असावं,याचा त्याला अंदाज आला नाही.मात्र गावातल्या चर्चेवरून ते कमलाबाईचं प्रेतअसावं,असं त्याला वाटलं.
  ..... तो तडक गावात आला.लागलीच विशालच्या घरी गेला.गावातली माणसं तिथे होतीच. रमेशच्या सांगण्यावरून संपूर्ण गाव विहिरीच्या दिशेनं निघाला.हौशे-गौशे गोळा झाले. गावातल्या जुन्या- जाणत्या माणसांनी पोलिसांना कळवलं.पोलिसांची गाडी आली.प्रेत विहिरीतून बाहेर काढलं. पोस्टमार्टमला पाठवण्यात आलं. विशाल मात्र धाय मोकलून रडत होता. लगोलग नातेवाईकांना फोन गेले. संपूर्ण गावावर शोककळा पसरली. आता मात्र कमलाबाईच्या जिवंत नसण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.
                      परत गावात चर्चांना उधाण आलं.. .."कमलाबाईला चकव्याने तर विहिरीत ढकललं नसेल.." "तिला भूतानं तर झपाटलं नसेल.".."तिने आत्महत्या तर केली नसेल"..असंख्य तर्क-वितर्कानंतरही, कमलाबाईंच्या मृत्यूचं गूढ आजतागायत कायम आहे...मात्र अजूनही..रात्री अपरात्री.. त्या विहिरीच्या दिशेनं जातांना,कित्येकांना कमलाबाई दिसल्याच्या अफवा वरचेवर गावात पसरत असतात..

शुक्रवार, ४ जून, २०२१

आम्ही नागपूरकर,भाग-3 (नागपूरचं हवामान)


"नागपूर" नाव घेताच, नागपूर बाहेरच्या लोकांची एकच प्रतिक्रिया येते,ती म्हणजे नागपूरचं "कडक उन्ह"."बोले तो एकदम कड$$क".तसं बघायला गेल्यास,नागपूरचा उन्हाळा,पुणे-मुंबई वाल्यांच्या नेहमीच चेष्टेचा विषय होतो. 'काय राव,तुमच्या नागपूरला किती कडक उन्हाळा ?तुम्ही राहतातच कसे ?असे डायलॉग वारंवार ऐकून आम्हा नागपूरकरांचे कान विटलेले आहेत.बरं, पण असे म्हणणारे मुंबईकर, पुणेकर,दुबई व अरब देशांमध्ये जेव्हा आनंदाने, विनातक्रार कामानिमित्त जातात,तेव्हा आम्हा नागपूरकरांना हसावं की रडावं, हेच समजत नाही. तसा उन्हाळा आमच्यासाठीही कठीण पण विपरीत परिस्थितीत जगतो, तोच तर खरा नागपूरकर. मुंबईच्या दमट,कोंदट हवेपेक्षा आम्हाला नागपूरची कोरडी हवा जरा जास्तच भावते. त्याला तुम्ही आमचं नागपूरवरचं आंधळं प्रेमही म्हणू शकता.उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना नागपुरी भाषेत "झाका"म्हणतात.यामुळे भर उन्हात फिरल्यास "उन्हाळी"(उन्हामुळे होणारा त्रास) लागल्यावाचून राहत नाही,व 'उन्हाळी"हा त्रास काय असतो,"हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे",या पठडीतला अनुभव.


पण या उन्हावर उपाय न शोधतील तर ते नागपूरकर कसले..उगाच नाही नागपूरला डेझर्ट कूलरची जननी म्हणून संबोधतात.कारण अशाप्रकारच्या कुलर्सचा शोध आमच्या नागपुरात लागला,अशी माहिती आहे. शिवाय सबंध भारताला हे "डेझर्ट कुलर्स" पुरविण्याचे काम नागपुरातून होत असते.म्हणून हा नागपुरी थंडावा आम्ही नागपूरकरांनी देशात पोहचविला,हेही नसे थोडके.हल्ली बाईकच्या  विशेष प्रकारच्या सीट्स आमच्या नागपुरात मिळतात,त्यामुळे भर उन्हात जरी तुमची  बाईक उभी असेल,तरी सीट गरम होत नाही,असे नवनवीन संशोधन नागपूरकर नेहमीच करीत असतात.मे महिन्यात तापमान 47-48 डिग्री सेल्सिअस ठरलेलं.अशाही तापमानात टपरीवर उकळता चहा पिणारे अवलिया तुम्हाला नागपुरातच भेटतील.


हल्ली फेसबुक व व्हाट्सएपच्या दुनियेत नागपूरच्या उन्हावर मिम्स प्रचंड प्रमाणात वायरल होताहेत.अशाप्रकारे "नागपूरचा उन्हाळा" social media वर हास्याचा ओलावा पसरवीत आहे,हे मात्र नक्की.

                   


 हिवाळ्यात आमच्याकडे 

"गुलाबी -बिलाबी" थंडी हा प्रकार नसतो. कडाक्याची थंडी पडल्याशिवाय आम्हा नागपूरकरांना हिवाळा आल्यासारखा वाटत नाही.तापमान जेव्हा 5 ℃ च्या खाली येतं तेव्हा,अंगात हुडहुडी भरल्यावर टपरीवरील"तर्री पोह्यांच्या" आस्वाद घेतांना व अद्रकवाली "चाय"पितांना ,दोस्तांसोबत "मेहफिल" जमविण्याची मजा काही औरच.भल्यापहाटे व्यायाम करण्याच्या नावावर मस्तपैकी शेकोटी पेटवून रमणारे बिलंदर सुद्धा तुम्हाला आमच्या नागपूरच्या मातीतच भेटतील.शिवाय, रात्रीच्या जेवणानंतर,गप्पांच्या ओघात मध्यरात्रीच्या चंद्राची साथसंगत करणारेही नागपूरकरच.असा हा "नागपूरी हिवाळा",बच्चे कंपनी ते आबालवृद्ध सर्वांनाच हवाहवासा वाटतो.

     


नागपुरात "पाऊस" मुंबईप्रमाणे अचानक येत नाही.तो येतो,ढगांच्या गडगडाटासह व विजेच्या कडकडाटासह.. आम्हा नागपूरकरांसारखं तोही वातावरणनिर्मिती--म्हणजेच आमच्या नागपुरी भाषेत"माहोल"केल्याशिवाय येत नाही.आमच्या नागपुरात तसा समाधानकारक पाऊस पडतो.दुष्काळ म्हणाल तर सहसा नसतोच.कधीकधी पाऊस असा काही बरसतो की,एरवी मृतप्राय असलेली,आमची 'नाग नदी' ओसंडून वाहू लागते व ती अजूनही जिवंत आहे,याची आम्हाला 'हा पाऊस' जाणीव करून देतो.पावसात भिजल्यावर गरमागरम मुंग पकोड्यांवर ताव मारण्यात आम्ही नागपूरकर अजिबात फिकीर करीत नाही.


फुटाळा तलावावर रिमझिम पावसात भिजत "भूट्टा"खाणारी तरुणाई,अंबाझरी ओव्हरफ्लो पॉईंटवर मॉन्सून celebrate करण्याची नवलाई,रामटेकच्या खिंडसी तलावाच्या दिशेने सुसाट पळण्याची घाई..


हे आम्हा नागपूरकरांचे मॉन्सून मधले "हॉट डेस्टिनेशन्स"..पावसाळ्यात आम्ही नागपूरकर नागपूरजवळच्या तमाम तलावांवर मनसोक्त भटकंती करतो.त्याच्या जोडीला नागपूर नजीकच्या हिरवाईचाही आनंद घेतो.



पावसाळ्यात अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याशिवाय आम्हा नागपूरकरांना 
पुरेपूर पाऊस झाला,याची खात्री पटत नाही.मग हवामान शास्त्रज्ञ कितीही अचूक अंदाज देवोत,अंबाझरी तलाव हा आम्हा नागपूरकरांचं पाऊस मोजण्याचं हक्काचं व विश्वासाचं "परिमाण" आहे.

थोडक्यात काय,तर,केवळ उन्हाळाच नाही तर, हिवाळा व पावसाळा हेही ऋतू आमच्या स्वभावाप्रमाणेच कडक असतात.ऋतूंचा हा राकटपणा,रांगडेपणा व बिनधास्तपणा आम्हा नागपूरकरांच्या स्वभावातही उतरलेला आहे व यातच आम्हा नागपूरकरांच्या "जिंदादिल"जगण्याचं रहस्य दडलेलं आहे.

रविवार, ४ एप्रिल, २०२१

Positive

Courtesy:Unsplash-Miguel Bruna

 होस्टेलच्या रुमचं दार उघडून विरेंद्र म्हणजेच आमचा 'वीरू' आत आला.वीरूच्या चेहऱ्यावर नेहमीचं तेज दिसत नव्हतं.तो अतिशय खिन्न व उदास वाटत होता. त्याला अशा अवस्थेत बहुदा होस्टेलच्या एकाही मुलानं आजवर बघितलं नव्हतं.म्हणून आम्हा सर्वांना त्याचं प्रचंड आश्चर्य व कुतूहल वाटत होतं.वीरू आल्या- आल्या आपल्या बेडवर लोटला व अंगावर चादर पांघरूण झोपी गेला. झोपतो कशाचा..झोपेचं सोंगच करत होता. असं असलं तरी त्यानं काही केल्या पांघरूण डोक्यावरून काढलं नाही व रुममधल्या कुणाशीही चकार शब्द तो बोलला नाही.

    वीरूबद्दल सांगायचं झाल्यास,वीरू हा विशीतला देखणा,हँडसम, चार्मिंग..वगैरे वगैरे.. मुलगा.नागपूर जिल्ह्यातील नरखेड या गावचा.बारावीची परीक्षा विज्ञान शाखेतून पास झालेला.अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धिमत्तेचा धनी.घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याला बारावी नंतर शिक्षण बंद करून मोलमजुरीची कामे करावी लागली.यात त्याचा संबंध मजूर व कष्टकरी वर्गाशी आला.व त्यांच्यासोबत काम करता-करता,जीवनाकडे डोळसपणे बघण्याची  दृष्टी त्याला प्राप्त झाली. कष्टकऱ्यांच्या जगण्याची धडपड पाहून त्याला शिक्षणाचं महत्त्व जाणवलं व तब्बल वर्षभर कष्टाची,अंगमेहनतीची कामे केल्यानंतर, स्थानिक आमदाराच्या शिफारशींच्या आधारे,स्पेशल केसद्वारे तो उशिराच शासकीय हॉस्टेल मध्ये दाखल झाला.

     


बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असूनही त्याने एलएलबीला प्रवेश घेतला.कमी वयात जास्त कटू अनुभव घेणारा, वीरू मूलतः चंचल, अस्थिर स्वभावाचा होता. तरी,प्रसंगी अतिशय प्रगल्भ वाटायचा..कधीही परिस्थितीशी हार न मानणारा..होस्टेलच्या लहान मोठ्यांशी नेहमी खोड्या..चेंगळ.. मस्ती करणारा वीरू,आज मात्र पार हादरून गेल्यासारखा भासत होता.अचानक त्यानं सर्वांशी बोलणं सोडून दिलं.हल्ली तो दिवसभर रूममधून गायब असायचा.कॉलेजची लेक्चर्स तो बंक करू लागला.एकटाच विनाकारण रस्त्याने फिरत बसायचा.जणू तो आम्हा सर्वांना किंबहुना अवतीभवतीच्या जगाला टाळत होता.त्याच्यातला तो आधीचा आत्मविश्वास.. कुछ भी कर जाने की जिद..डोळ्यातली ती चमक कुठेतरी हरवली होती.आता त्याचं जेवणही कमी होऊ लागलं होतं.त्याच्या वागण्या, बोलण्यात,दिसण्यात व असण्यात झालेला आमूलाग्र बदल सर्वांना बोचत होता.त्याला चिडवणारी सिनियर मुलं व त्याच्याशी मस्ती करणारी ज्युनियर मुलं वीरूच्या अशा वागण्याने पार कोड्यात पडली होती.हसावं की रडावं,अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती.                                                      वीरूचा जिवलग मित्र सुमित, यामुळे अधिकच बेचैन झाला.वीरू व सुमित म्हणजे लंगोटी यार.. दो जिस्म एक जान ..म्हणून वीरूच्या या अवस्थेचे कारण केवळ सुमितच जाणून घेऊ शकेल,यात कुणालाच तिळमात्र शंका नव्हती .

रूममध्ये एकांतात सुमितने वीरुला विचारलं,

"यार वीरू, काय झालं?सांगशील की नाही ?"

"कसं सांगू ?काय सांगू?काहीच सुचत नाही."  वीरू बोलला."अरे सांग एकदाचं, डोक्यावरचं ओझं हलकं कर.मैं हूं ना!टेक ईट ईझी!सुमितने त्याला धीर दिला.वीरूही हे ओझं दोन दिवसांपासून वाहत होता. त्यालाही आपलं मन मोकळं करायचं होतं.सुमितच्या बोलण्याने 

त्याला हिम्मत आली.व तो सांगू लागला," सुमित तुला आठवतं, मी गेल्या आठवड्यात ब्लड डोनेशन करायला एका ब्लड बँकेत गेलो होतो."

सुमित -"हो आठवतय ना.त्याचं काय ?"

वीरू-"अरे मला वाटलं, माझं रक्त 

कुणा गरजू व्यक्तीच्या कामी येईल,म्हणून मी ब्लड डोनेट केलं.व रूमवर आलो.थोडी विश्रांती घेतली व आपल्या कामाला लागलो."

सुमित-" त्यात काय एवढं उदास होण्यासारखं. तू तर एक उत्तम काम केलं आहेस.

वीरू-"तुला माहिती आहे का? आपण जेव्हा ब्लड डोनेट करतो तेव्हा आपल्या रक्ताची संपूर्ण चाचणी केली जाते.व त्यानंतरच ते लाभार्थी रुग्णाला दिलं जातं."

सुमित-"हो,मग त्यात काय एव्हढं."

वीरू-"त्यातच तर खरी गोम आहे.त्या ब्लड बँकेतून मला परवा फोन आला.व त्यांनी मला तुमचं रक्त एचआयव्ही इंफेक्टेड असल्याचं सांगितलं व  तुम्ही एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे तुमचं रक्त ब्लड डोनेशनसाठी रिजेक्ट करण्यात आल्याचही सांगितलं.आता मात्र सुमितही पार हादरून गेला. त्याला काय बोलावं हेच सुचेना. काही वेळ दोघेही नि:शब्द होते.मग स्वतःला सावरून सुमित बोलला, "यार वीरू,तु कसा काय एचआयव्ही पॉझिटिव्ह असू शकतो ?कारण एच आय व्ही एड्स, दूषित रक्त, असुरक्षित यौनसंबंध यांसारख्या कारणाने होतो.तुझ्या बाबतीत मात्र यापैकी काही घडलं असेल असं मला वाटत नाही".

Courtesy:Unsplash-Sergey Mikheev

वीरू मात्र रडक्या आवाजात सुमितला सांगू लागला."सुमित,मलाही असच वाटत होतं.

मग मी खूप विचार केला. माझ्या जीवनातले अनेक बरेवाईट प्रसंग आठवू लागलो.विचार करता-करता एका प्रसंगाजवळ येऊन थांबलो.

सुमित-"कोणता प्रसंग वीरू?,तु कधी सांगितलं नाहीस."

वीरू-" हो यार, राहूनच गेलं सांगायचं.बरं,आता सांगतो.तुला ठाऊक आहे,मी बारावीनंतर वर्षभर मोलमजुरीची कामं केली, मिळेल ते काम केलं.मजुरांसोबत काम करताना माझं भावविश्व पार बदलून गेलं होतं. तिथे मला पक्या भेटला. तो तिशीतला तरी असेल. त्याला बाई-बाटलीचा भारी नाद होता.मेहनत करून कमावलेली कमाई तो या दोन गोष्टींवर उधळायचा. एक दिवस पक्या मला म्हणाला,

"काय वीरू चालतो का GJमध्ये.मला काही कळेना.हे GJम्हणजे काय?त्यावर पक्या म्हणाला,वीरू नागपूरला चल, तुला दाखवतो गंगा - जमुना.तूझी भेट घडवून देतो एखाद्या बाईशी.नाहीतर असाच राहशील बिनकामाचा!!"

तेव्हा उत्सुकतेपोटी मी गेलो त्याच्यासोबत,

एका रविवारी त्या वैश्या वस्तीत.

मला त्याने एका अंधाऱ्या खोलीत ढकलून दिलं व  काम झाल्यावर दोनशे रुपये देण्याचंही सांगितलं.भांबावलेल्या अवस्थेत मी पंधरा-वीस मिनिटात तेथून बाहेर पडलो.व पक्याची वाट न बघता सरळ आपलं गाव गाठलं.हीच काय ती चूक, माझ्या हातून झाली असावी,असं मला राहून-राहून वाटतं.

सुमित वीरूचं बोलणं, निर्विकार चेहऱ्याने ऐकत होता. आता त्यालाही वीरू एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं पटलं होतं.वीरुचं दुःख दूर करण्याच्या प्रयत्नात,सुमितही अंत:र्बाह्य दुखावला गेला.त्याच्या मित्रावर ओढवलेलं, हे अरिष्ट कसं दूर होईल, याचाच तो आता विचार करू लागला.                                          दोन दिवसानंतर....

वीरू त्याच्या नेहमीच्या हसर्‍या चेहर्‍याने सुमितच्या रूमवर आला.त्याच्या चेहर्‍यावरील आनंद गगनात मावत नव्हता. सुमितला आश्चर्य वाटलं,काल-परवापर्यंत दुःखाच्या महासागरात बुडालेला वीरू, आज इतका आनंदी कसा?परंतु काही का असेना,याचं त्यालाही बरं वाटलं.

सुमित-"वीरू,आज तू एकदम खुश दिसतोय, झालं तरी काय?"

वीरू-"यार सुमित,आत्ताच मला त्या ब्लड बँकेतून फोन आला.त्यांच्याशी बोलून मी धावत-पळत तुझ्याकडे आलो बघ."

सुमित-"अरे,असं काय बोलणं झालं तुझं फोनवर?"

वीरू-"त्या ब्लड बँकेत म्हणे ..भलताच घोळ झाला.त्याचं झालं असं, माझी ब्लड रिपोर्ट व दुसऱ्या एचआयव्ही पॉझिटिव्ह पेशंटची ब्लड रिपोर्ट एकाखाली एक असल्यामुळे,

तिथल्या कंप्यूटर ऑपरेटरने त्या पॉझिटिव पेशंटची रिपोर्ट,माझी रिपोर्ट समजून मला कॉल केला. मग नंतर त्यांनी त्याचा जेव्हा follow up घेतला तेव्हा त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी लगेच मला कॉल करून माझी माफी मागितली. मी मात्र त्यांना चांगलच खडसावलं.पण शेवटी,'अंत भला तो सब भला' म्हणून विषय सोडून दिला.गेल्या दोन दिवसापासून माझ्या जीवाची जी घालमेल होती ती संपली एकदाची..आज मला जणू पुनर्जन्म मिळाला असं वाटतंय.आज मी एचआयव्ही पॉझिटिव्ह जरी ठरलो नसलो,तरी विचारांनी मात्र पॉझिटिव्ह झालो हे नक्की!!"असं म्हणून वीरूने आनंदाच्या भरात सुमितला मिठी मारली. 

Best of glocal marathi

गनिमीकावा

        गनिमीकावा संकटे बहु येतील, हरणे तुला ठाव नाही.. कोंडीत सापडाया, गड्या तू कुणाचा साव नाही..!!     भेटतील सरडे,      पदोपदी तुला रे.. ...